इस्लाममधील रोजाचा उद्देश

Roja : रमजानच्या पवित्र महिन्यात मुसलमान रोजे ठेवतात. रोजे म्हणजे सुर्योदय ते सुर्यास्तादरम्यान काहीही न खाता-पिता उपवास ठेवणं. इस्लामी वर्ष म्हणजे हिजरी नावानं ओळखण्यात येते. 1400 वर्षांपूर्वी दुसऱ्या हिजरीपासून रमजानची प्रथा सुरू झाली. 
[gspeech type=button]

इस्लाममधील करुणा आणि समृद्धीचा महिना रमजान सध्या सुरू आहे. इस्लाम समुदायात ईदची तयारी सुरू झाली आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात मुसलमान रोजे ठेवतात. रोजे म्हणजे सुर्योदय ते सुर्यास्तादरम्यान काहीही न खाता-पिता उपवास ठेवणं. इस्लामी वर्ष म्हणजे हिजरी नावानं ओळखण्यात येते. 1400 वर्षांपूर्वी दुसऱ्या हिजरीपासून रमजानची प्रथा सुरू झाली. 

इस्लामवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रोजा ठेवणं अनिवार्य आहे. उपवासासोबतच अल्लाहचे स्मरण करणे आणि दान-धर्म करणंही रमजानचा भाग असतो. 

हिजरी कॅलेंडरमधील नववा महिना रमजान आहे. रमजान हा अरबी शब्द आहे. हा महिना उपवासांकरता खास मानला जातो. रोजाला अरबी भाषेत सौम म्हणतात. सौम म्हणजे थांबणे.. म्हणजेच स्वतःवर ताबा किंवा नियंत्रण ठेवणे. 

तर फारसी भाषेत उपवासाला रोजा म्हणतात. भारतातील मुस्लिम समुदायावरील फारसी प्रभावामुळं उपवासाकरता फारसी शब्दाचा वापर करण्यात येतो. रमजानची सुरूवात चंद्रदर्शनाने होते. 

इस्लामच्या पाच कर्तव्य किंवा सिद्धांतामधील रोजा हे एक कर्तव्य आहे. सर्व मुसलमानांना रोजा पाळणं अनिवार्य असतं. पहिल्या कर्तव्याला ‘तौहीद’ म्हणतात. तौहीद म्हणजे कलमा. याचा अर्थ अल्लाहवर विश्वास ठेवणं आणि अल्लाने पैगंबरांना सांगितलेल्या मार्गावर चालणे. दुसरं कर्तव्य आहे, नमाज. दिवसातून पाच वेळा नमाज पढली पाहिजे. तिसरं कर्तव्य आहे जकात म्हणजेच दान देणं, चौथं कर्तव्य आहे रोजा आणि पाचवं कर्तव्य आहे हजयात्रा करणं. 

असं म्हणतात की, दुसऱ्या हिजरीपासून रोजा पाळण्याची परंपरा सुरू झाली. कुराणची दुसरी आयत (अध्याय) सूरह अल बक्रमध्ये स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की, तुमच्या आधीच्या पिढीने जसं रोजाचं कर्तव्य पार पाडलं, तसंच ते कर्तव्य तुमच्यावरही आहे. पैगंबर मोहम्मद यांच्या मक्काहून मदीनाच्या प्रयाण म्हणजेच हिजरतच्या एका वर्षानंतर मुसलमानांना रोजा पाळण्याचा आदेश देण्यात आला. जगातील सर्वच धर्मात उपवासांची स्वतःची परंपरा आहे.

सकाळी फज्र अजानच्या आधी म्हणजेच सुर्योदयापूर्वी सेहरी केली जाते. सेहरी म्हणजे सुर्योदयापूर्वीचे खाणे. सेहरीनंतर रोजा पाळणारी व्यक्ती सुर्यास्तापर्यंत म्हणजेच संपूर्ण दिवसभर काहीच खात-पित नाही. या दरम्यान या व्यक्ती अल्लाहाचं नाम जपतात किंवा आपलं नियमित काम करतात. सुर्यास्तानंतर जो आहार घेतात त्याला इफ्तार म्हणतात. रोज्यादरम्यान आपलं शरीर आणि नाडीवर नियंत्रण राखणंही जरुरी आहे. या दरम्यान आपल्या वाणीनं कुणालाही दुखावलं जाणार नाही, आपल्या हातानं कुणाचं नुकसान होणार नाही आणि आपल्या डोळ्यांनी कोणतंही चुकीचं काम करताना पाहता कामा नये. रोजाच्या दरम्यान शारीरिक संबंध ठेवणेही वर्जित आहे. आणि जर का शरीर संबंध ठेवलेच तर सेहरीच्या आधी पवित्र व्हायला पाहिजे.

पवित्र कुराणात बऱ्याच ठिकाणी रोजा पाळणे अनिवार्य सांगितलं आहे. कुराणात अल्लाह आपल्या अनुयायांना आदेश देतो की, “ईमानदार लोकांनो, रोजा तुमच्याकरता अनिवार्य आहे. कारण तुम्ही मोहापासून दूर जात स्वतःवर नियंत्रण ठेवावं”. या व्यतिरिक्त तिर्मिजी, बुखारी शरीफ, मुस्लिम, इब्नेमाजा, मिस्काट आणि अबू दाऊद शरीफ या सारख्या धार्मिक ग्रंथांमध्येही रोजा माणसांना वाईटापासून लांब ठेवतो आणि चांगल्या मार्गाने जाण्याची प्रेरणा देतो, असं म्हटलं आहे. 

रोजा प्रत्येक प्रौढ मुसलमानाकरता अनिवार्य आहे. केवळ आजारी आणि प्रवासी व्यक्तिंना यातून सूट देण्यात आली आहे. तसेच गर्भवती, मासिक पाळी सुरू असेल तर महिलांना रोजा करण्यातून सूट देण्यात आली आहे. लहान मुलांनाही रोजा पाळणं बंधनकारक नाही. पण पाळीदरम्यान जितके रोजे सुटले असतील तेवढेच रोजे नंतर पाळावे लागतात. आजारी असल्यास रोजे सोडण्याची अनुमती आहे. याशिवाय जर कोणी आजारी असताना रोजा ठेवलाच तर त्याला रक्त तपासणी व इंजेक्शन घेण्याची परवानगी आहे. पण रोजाच्या दरम्यान औषध घेण्यास बंदी आहे. अशावेळी सेहरी आणि इफ्तारच्या वेळीच औषध घ्यावे. 

इस्लामी मान्यतेनुसार या पवित्र महिन्यात अल्लाह जन्नत म्हणजेच स्वर्गाचे दरवाजे उघडतो आणि जहन्नम म्हणजे नरकाचे दरवाजे बंद करून सैतानाला कैद करतो. रमजानमध्ये स्वेच्छेने काम केल्यावर, कर्तव्य पाळल्यावर अल्लाह भक्ताच्या पदरी पुण्य घालतो. एका कर्तव्य पार पडल्यावर 70 पुण्ये पदरात पडतात. या महिन्यात अल्लाहने कुराण प्रकट केलं. यात आयुष्य कसं जगायचं, हे सांगितलं आहे.

असं म्हणतात की, रमजानचा महिना संयम आणि शांतीचा महिना आहे. या महिन्यात अल्लाहची विशेष कृपा असते. या महिन्यात केलेल्या दान धर्म आणि चांगल्या कामाचं फळ 70 पट जास्त मिळतं. 

रमजानमध्ये जकात म्हणजेच दानाला विशेष महत्त्व आहे. जर एखाद्याकडे वर्षभराच्या आवश्यकतेच्या व्यतिरिक्त 52 तोळे चांदी किंवा त्याबरोबरीनं रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू असेल तर त्याच्या 2.5 टक्के भाग जकात म्हणजेच दानाच्या रुपायत गरीब किंवा गरजवंतांना द्यायला हवं. यात गरीबांना 2 किलो 45 ग्रॅम गहू किंवा त्या भावाची रोख रक्कम गरीबांना दान करणे सामील आहे. 

समृद्धीच्या या महिन्यात सगळीकडे प्रसन्न वातावरण असते. मुस्लिम समुदायातील लोक या महिन्यात अगदी खास पक्वान्न तयार करून खातात. इफ्तारी ते सेहरीच्या काळात सगळीकडे झगमगाट असतो. ईदच्या दिवशी सर्वजण नवीन कपडे घालतात. आपल्या ऐपतीनुसार खरेदी करण्यात येते. जगभरातील प्रत्येक मुसलमान एक महिना रोजे पाळल्यावर येणाऱ्या ईदला साजरी करतो. ईदच्या सकाळी आन्हिक उरकून नवीन कपडे घालून ईदची नमाज वाचायला मुस्लीम समुदाय जमतो. या दिवशी आपापसातील हेवेदावे विसरून एकमेकांची गळाभेट घेण्यात येते. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Malhar Certificate : महाराष्ट्रात 'झटका' मांस’ विक्रेत्यांसाठी 'मल्हार प्रमाणपत्र' ही नवी योजना सुरू करण्यात आली आहे. राज्याचे मत्स्य व बंदरे
World Autism Awareness Day : ऑटिझम म्हणजेच स्वमग्नता हा शब्द सध्या खूपदा ऐकायला येतो. पण ऑटिझम म्हणजे नेमकं काय, ते
Euthanasia : दुर्धर आणि असाह्य वेदना देणारे आजार याबाबतीत इच्छामरण असावे असे आपण म्हणतो. काही देशांमध्ये असाध्य मानसिक आजारांसाठीसुद्धा हा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ