सामाजिक बांधिलकी जपणारा ‘संपर्क बाजार सेल’

Sampark Bazar : आपल्या घरात अनेक वस्तू अशाच न वापरता पडून राहिलेल्या असतात. अशा वस्तू ज्या गरजवंताना द्यायच्या आहेत, त्यांनाही ते स्वाभिमानाने कमी किंमतीत विकत घेता येतील, या विचाराने आयोजित केला जाणारा संपर्क संस्थेचा 'संपर्क बाजार.'
[gspeech type=button]

सकाळ झाली की, कामासाठी किंवा कोणत्या कार्यक्रमाला जाताना प्रत्येक घरातला संवाद असतो की, अरे माझ्याकडे घालायला काही कपडेच नाहीत. कपाट उघडताच कपडे अंगावर पडतात. तरिही, कपडे नसल्याची तक्रार सुरू असते. घरातल्या प्रत्येक वस्तू संदर्भात असं घडत असतं. अलिकडे वरचेवर शॉपिंग करण्याचा ट्रेंड आहे. कुठे ही गेलो काही आवडलं की लगेच विकत घेतलं जातं. त्यामुळे अनेक वस्तू या घरात न वापरताच पडून असतात. 

अशा वस्तूचं करायचं काय? याचं उत्तर एकच असतं कोणाला तरी देऊन टाकू. पण कोणाला? आणि ज्यांना द्यायचं आहे त्यांना ते हवं आहे का किंवा त्यांना ते आवडेल का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. यावर संपर्क संस्थेच्या प्रकल्प प्रमुख मृणालिनी जोग यांनी सुवर्णमध्य साधत चांगला पर्याय निर्माण करुन दिला, तो म्हणजे ‘संपर्क बाजार सेल’. त्यांची थीम लाईन आहे, ‘व्हेअर ऑल्ड थिंग्ज फाइंड न्यू होम’. 

काय आहे संपर्क बाजार सेल ?

एखादी वस्तू आवडली म्हणून आपल्याकडे ती वस्तू असूनही नवीन घेण्याची आर्थिक क्षमता असल्यामुळे आपण सहज घेतो. पण समाजातील अनेक असे घटक आहेत ज्यांना एखाद्या वस्तूची गरज आहे, पण पैशा अभावी घेता येत नाही. तर कधी बजेटमध्ये बसत नाही म्हणूनही त्या वस्तू घेण्याचं टाळलं जातं. 

गृह मदतनीस, ड्रायव्हर अशा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या घटकांतील लोकांसोबत असं अनेकदा घडतं. त्यांनाही चांगले कपडे, स्वयंपाकघरात काही चांगल्या वस्तू, मुलांसाठी कपडे, खेळणी हव्या असतात. अनेकदा या लोकांना ते ज्या घरी काम करत असतात ती लोकं किंवा आजूबाजूच्या परिचयातली लोक कपडे, वस्तू देत असतात. पण या वस्तू त्यांना आवडतात की नाही, त्यांना ते मापाला होतील की नाही,  याचा विचार केला जात नाही. 

तेव्हा मृणालिनी जोग यांना ही कल्पना सुचली की, अशा वस्तू एकत्र करुन त्याचा बाजार भरवावा. या बाजारामध्ये या घटकातील लोकांना बोलावून ते त्यांना हव्या असलेल्या वस्तू विकत घेतील. 

वस्तू दान करण्याऐवजी विकत देणं

सामान्यत: आपण आपल्याला नको असलेल्या वस्तू गरज असलेल्यांना देतो. पण अशा सगळ्यांच लोकांना कोणी देऊ केलेल्या वस्तू घ्यायला आवडतचं असं नाही.  त्यामुळे अशा वस्तू त्यांनी विकत घेत त्यांचाही स्वाभिमान उंचावावा यासाठी या वस्तूंची नाममात्र किंमतील विक्री केली जाते. यामध्ये साधी साडी, ड्रेस, टॉप्सची किंमत ही 20 रुपये असते. भरजरी साडीची किंमत 50 रुपये असते. पुरुषांच्या शर्टाची किंमत 15 रुपये तर पँटची किंमत 50 रुपये असते. 10 रुपयांना लहान मुलांचे कपडे दिले जातात. यासह स्वयंपाकघरातल्या वस्तू, घरात लागणाऱ्या इतर वस्तूंची सुद्धा विक्री केली जाते. 

या उपक्रमामुळे दुहेरी फायदा होतो. सुस्थितीत असलेल्या पण आपल्याला नको असलेल्या वस्तू ज्यांना गरज आहे त्यांना मिळतात. तसंच या गरजूंना मोठ-मोठ्या किंमतींना या वस्तू खरेदी करणं शक्य नाही. पण कमी किंमतीत मिळाल्यामुळे त्यांनाही या वस्तू खरेदी करुन वापरता येतात. शिवाय कमी किंमतीत मिळाल्यामुळे त्यांचीही पैशांची बचत होते. 

बाजारसाठी जमलेल्या सगळे कपडे तपासून त्या व्यवस्थित घड्या करुन ठेवल्या जातात. तर गृहोपयोगी वस्तू सुद्धा तपासून घेतल्या जातात.  

बरं, या वस्तू आणून देणाऱ्यांना आर्थिक मोबदला दिला जात नाही. तर या विक्रीतून जो काही निधी उभा राहतो ती रक्कम पुन्हा संपर्क संस्थेच्या अन्य सामाजिक उपक्रमांसाठी वापरली जाते. 

12 वर्षापूर्वी भरलेला पहिला ‘संपर्क बाजार’

मृणालिनी जोग यांनी 12 वर्षापूर्वी स्वत:च्या घरातून या बाजाराची सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांनी मित्र परिवारातून अशा वस्तू गोळा केल्या. त्यानंतर त्यांच्या सोसायटीमध्ये येणाऱ्या मदतनीसांना आणि ड्रायव्हर्सना याबद्दलची माहिती दिली. त्यांनी ठरलेल्या दिवशी जोग यांच्या घरी येऊन त्यांना हव्या असलेल्या वस्तूंची खरेदी केली. या सगळ्या लोकांना ही संकल्पना फार आवडली. त्यांनी या संकल्पनेला खूप चांगला प्रतिसाद दिला.  त्यानंतर सलग 12 वर्ष त्यांनी संपर्क संस्थेतील स्वयंसेवकांच्या मदतीने या बाजाराचं आयोजन करत राहिल्या. 

वर्षातून दोनदा भरतो ‘संपर्क बाजार’

संपर्क संस्थेकडून वर्षातून दोनदा हा बाजार भरवला जातो. जवळपास 200 ते 300 लोकं या बाजारमध्ये येऊन खरेदी करतात. पूर्ण दिवस हा बाजार असतो. या बाजाराची मागणी पाहता मुंबईतल्या विविध ठिकाणी  महिन्या दोन महिन्याला हा बाजार भरवला पाहिजे. पण, या बाजारासाठी जागा कमी किंमतीत किंवा मोफत जागा उपलब्ध होत नाही. शिवाय वस्तू ठेवण्यासाठी लागणाऱ्या अन्य सुविधाही उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे वर्षातून दोनदाच हा बाजार भरवावा लागतो. 

वस्तूंची उपलब्धता

या बाजारामध्ये खरेदीसाठी येणाऱ्यांची गर्दी खूप असते. त्यामुळे वर्षातून जास्त वेळा जर बाजार भरवला तर तितक्या प्रमाणात वस्तू मिळतील का हा प्रश्न आपल्याला पडतोच. त्यावर जोग सांगतात की, पूर्वी कुटुंबामध्ये भाऊ किंवा बहिणीं एकमेकींचे कपडे वापरत असत. पण आता तशी परिस्थिती नाही. आता कपडे शेअरिंगची पद्धत जवळपास बंद झाली आहे. नवीन कपडे विकत घेणं तेही महिन्या महिन्याला कपड्यांची खरेदी केली जाते. कुठे प्रदर्शनाला गेलो असलो की तिथे गृहोपयोगी काही आवडलं की ते खरेदी करत असतो. त्यामुळे घरात नको असलेल्या वस्तू खूप असतात. 

जोग यांनी सांगितलं की, एकदा तर त्यांच्याकडे या बाजारासाठी एका कुटुंबाकडून घडीसुद्धा न मोडलेलं एक फॉर्मल टॉप आलं होतं. ज्याची किंमत 26 यूरो भारतीय चलनात 2,365 रुपये होती. 

बाजार भरवण्याच्या आदल्या दिवशीच व्हॉट्सॲपच्या माध्यमातून वस्तू गोळा करण्यासंबंधीत मॅसेज पाठवला जातो. दुसऱ्या दिवसापर्यंत एवढ्या वस्तू जमतात की, देणाऱ्यांना पुढच्या वेळी त्याचं सामान देण्यासाठी विनंती करावी लागते. 

3 मार्चला भरणार ‘संपर्क बाजार’

यावर्षी सोमवार दिनांक 3 मार्च रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दादर येथे हा बाजार भरणार आहे. दादर पश्चिम येथे बाबुराव परुळेकर मार्गावरील कालिका मंदिर हॉलमध्ये संपर्क बाजारचं आयोजन केलं आहे. तर या बाजारासाठी ज्यांना वस्तू द्यायच्या आहेत त्यांना दिनांक 2 मार्च सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत आणून देण्याचं आवाहन केलं आहे. 

तुमची मदत ही मोलाची ठरेल

अनेकदा मोठ्या प्रमाणावर वस्तू गोळा होतात, पण त्या विकण्यासाठी बाजाराचं आयोजन करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. तसंच एखाद्या ठिकाणी बाजार भरवला असेल तर तिकडे त्याच भागातील गृहमदतनीस, गाडीचालक वा अन्य असंघटीत क्षेत्रात काम करणारे बांधव येतात. मात्र याचा फायदा वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याऱ्या जसं की, मुंबईतल्या सगळ्या उपनगरांमध्ये विविध सोसायटींमध्ये याचं आयोजन झालं तर खूप सोईच होऊ शकतं. 

तसंच सणावाराच्या आधी जर अशा बाजाराचं आयोजन करण्यासाठी आपण मदत केली तर, समाजातील या घटकालाही चांगल्या दर्जेदार वस्तूंची कपड्यांची खरेदी करुन सण उत्साहाने साजरे करता येतील. त्यामुळे जर तुमच्या सोसायटीच्या आवारात शक्य असेल तर असा बाजार आयोजित करण्यासाठी तुम्ही संपर्क संस्थेशी संपर्क साधू शकता. 

तरी तुम्हाला सुद्धा या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी संपर्क माहिती पुढीलप्रमाणे: 

सामान आणून द्यायच्या तारखा, वेळा आणि पत्ता 

2 मार्च सकाळी 11 ते 6 

रंजना मंत्री – 98920 26077  

पत्ता : B2/10 समृद्धी सोसायटी 

बाबूराव परुळेकर मार्ग, कालिका माता मंदिर, दादर पश्चिम, 

किंवा 

3 मार्च सकाळी 9 ते 11 या वेळात 

कालिका मंदिर हॉल, बाबुराव परुळेकर मार्ग, दादर पश्चिम 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Malhar Certificate : महाराष्ट्रात 'झटका' मांस’ विक्रेत्यांसाठी 'मल्हार प्रमाणपत्र' ही नवी योजना सुरू करण्यात आली आहे. राज्याचे मत्स्य व बंदरे
World Autism Awareness Day : ऑटिझम म्हणजेच स्वमग्नता हा शब्द सध्या खूपदा ऐकायला येतो. पण ऑटिझम म्हणजे नेमकं काय, ते
Roja : रमजानच्या पवित्र महिन्यात मुसलमान रोजे ठेवतात. रोजे म्हणजे सुर्योदय ते सुर्यास्तादरम्यान काहीही न खाता-पिता उपवास ठेवणं. इस्लामी वर्ष

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ