राजधानी दिल्लीमध्ये 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. 21 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी अशा तीन दिवसीय संमेलनाचा उद्धघाटन समारंभ शुक्रवार, 21 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. पहिल्याच दिवशी या साहित्य संमेलनाला साहित्य रसिकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी निघालेल्या ग्रंथ दिंडीमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातील साहित्य रसिक सहभागी झाले होते. ढोल ताशांच्या गजरात ही ग्रंथ दिंडी तालकटोला स्टेडियम या संमेलनस्थळावर पोहोचली. या संमेलनासाठी मोठ्या प्रमाणावर साहित्यप्रेमी दिल्लीमध्ये हजर झाले आहेत.
प्रथेप्रमाणे ग्रंथदिंडी
मराठी साहित्य संमेलन ही साहित्यप्रेमींसाठी मोठी पर्वणी असते. साहित्यिकांशी संवाद साधणे, त्यांची मतं ऐकणे, विविध क्षेत्रातील नवीन दुर्मिळ पुस्तकाची माहिती घेणे, परिसंवाद असे उपक्रम या संमेलनात असतात.
साहित्य संमेलनाच्या उद्धघाटन समारंभामध्ये ग्रंथ दिंडी ही सगळ्यात महत्त्वाची असते. यंदा पालखीमध्ये ग्रंथ ठेवून ही दिंडी काढली होती. यामध्ये भारताचे संविधान, ज्ञानेश्वरी, दासबोधांचा ग्रंथ, लीळाचरित्र यासह अन्य ग्रंथांना या दिंडीमध्ये स्थान दिलं होतं.
मराठमोळ्या वेशभूषेत तरुणांची उपस्थिती
संमेलनाच्या या ग्रंथदिंडीमध्ये अनेक तरुण-तरुणींनी मराठमोळा पोशाख परिधान करुन सहभाग घेतला होता. यावेळी महाराष्ट्रातील विविध संस्कृतीचं दर्शन तरुणांनी घडवलं. नऊवारी, कोळी, धनगर अशा बाराबलुतेदार संस्कृतीचं दर्शन घडवणारी वेशभुषा केली होती.
संत तुकोबा, संत ज्ञानेश्वर महाराज, वासुदेव यांची ही वेशभूषा करुण तरुण या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झाले होते.
ग्रंथदिंडीत वैविध्यपूर्ण चित्ररथ
साहित्य संमेलनात पूर्णपणे महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख होताना दिसत होती. चित्रलेखाच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती सादर केली होती. यामध्ये संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चित्ररथांचा समावेश होता. त्यामुळे या ग्रंथदिंडीची शोभा वाढली.
सीमाभागातील मराठी बांधवांचा दुमदुमला आवाज
मराठी साहित्य संमेलनात दरवर्षी बेळगावमधील सीमा भागातील मराठी भाषिकांचा आवाज उठवला जातो. यावर्षी सुद्धा मराठा, धारवाड, निपाणी बेळगाव या सीमा भागातील मराठी भाषिकांनी ‘महाराष्ट्रात समावेश केला जावा’, अशी घोषवाक्य लिहिलेल्या टोप्या डोक्यावर परिधान करून संमेलनात सहभाग घेतला आहे. दिंडीत या बांधवांनी घोषवाक्याचे पोस्टर्स हातात घेतले होते. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने सीमा भागातील मराठी भाषिकांचे म्हणणे ऐकून त्यावर लवकर तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे.