किनाऱ्यावरचे मोती : सागरी किल्ले भाग 1

महाराष्ट्राला निसर्गाने दिलेल्या अनेक वरदानांपैकी एक म्हणजे ‘सागर किनारा’. या सागर किनाऱ्यांचं सर्वात मोठं ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे इथले ‘जलदुर्ग’. सागरातून होऊ शकणाऱ्या आक्रमणाचा अंदाज घेऊनच इथल्या प्राचीन शासकांनी किनारपट्टीवर जणू जलदुर्गांची मालिकाच उभी केली.
[gspeech type=button]

किनाऱ्याचे रक्षणकर्ते

महाराष्ट्राला निसर्गाने दिलेल्या अनेक वरदानांपैकी एक म्हणजे ‘सागर किनारा’. किनाऱ्याकडे आवेगाने झेपावणाऱ्या सागराच्या लाटांनी या महाराष्ट्राच्या इतिहासातील अनमोल क्षण अनुभवले आहेत. परकियांनी केलेली बेबंद आक्रमणे आणि हल्ले या किनाऱ्याने जसे पाहिले, त्याच प्रमाणे या आक्रमकांना थोपवणारे बुलंद हात ही पाहिले. महाराष्ट्राच्या या सागर किनाऱ्यांचं सर्वात मोठं ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे इथले ‘जलदुर्ग’. सागरातून होऊ शकणाऱ्या आक्रमणाचा अंदाज घेऊनच इथल्या प्राचीन शासकांनी किनारपट्टीवर जणू जलदुर्गांची मालिकाच उभी केली.

आपल्या महाराष्ट्राला 720  किलोमीटर लांबीचा सागर किनारा लाभलेला आहे. म्हणजे भारताच्या एकूण किनाऱ्यापैकी 10 टक्के किनारा आपल्या वाट्याला आला आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे पाच जिल्हे सागराच्या काठावर वसलेले आहेत. या जिल्ह्यांच्या इतिहासात सागरी किल्ल्यांचे आगळे स्थान आहे. शेकडो वर्षांपूर्वी सागरावरील सत्ता अबाधित राखण्यासाठी, किनाऱ्यावरील गावांचे रक्षण करण्यासाठी बांधलेले हे सागरी किल्ले आज पर्यटनासाठी आदर्श स्थाने ठरले आहेत.

यातील अनेक किल्ले काळाच्या ओघात जवळपास नामशेष झाले, तर अनेक आजही भरभक्कमपणे सागराच्या लाटा झेलत उभे आहेत. घोडबंदर, विजयदुर्ग, पूर्ण गड, गोवा किल्ला असे काही किल्ले सागर किनाऱ्यालगत जमिनीवर आहेत. तर सिंधुदुर्ग, मुरुडचा जंजिरा, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग असे काही किल्ले भर समुद्रात उभे आहेत.

 

दशकोनी वसईचा किल्ला

पालघर जिल्ह्यातील वसईचा किल्ला इतिहासात गाजला तो चिमाजीआप्पांच्या शौर्याने. 7 व्या शतकापासून वसईचे संदर्भ आढळतात. गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात असलेली वसई पोर्तुगिजांनी 16 व्या शतकात जिंकली. तेव्हा इथे 15 व्या शतकात भेंडाळे (भेंगाळे) सरदारांनी बांधलेला किल्ला होता. पोर्तुगिजांनी हा किल्ला अधिक मोठा आणि भक्कम केला.

या दशकोनी किल्ल्याला दहा बुरुज आहेत. किल्ला जमिनीवर असला तरी समुद्रात शिरलेला आहे. त्यामुळे जमीन आणि समुद्र दोन्हीकडून त्याला प्रवेशद्वार आहे. 1738 मध्ये साष्टी प्रांत पोर्तुगिजांच्या जुल्मी सत्तेतून मुक्त करताना चिमाजी आप्पांनी मराठ्यांच्या सैन्यासह प्रयत्नांची शिकस्त केली आणि किल्ला जिंकून पोर्तुगिजांची राजवट समाप्त केली. पुढे हा किल्लाही इंग्रजांच्या ताब्यात गेला.

आता या किल्ल्यात पोर्तुगिजांनी उभारलेल्या इमारती, चर्चेस याचे अवशेष उरले आहेत. मराठ्यांनी मर्दुमकी गाजवून जिंकलेला हा किल्ला आता प्री वेडींग शूटस आणि रील्स करण्यासाठी वापरला जातो हे दुर्दैव.

वसईचा किल्ला

ठाण्याच्या किल्ल्यात तुरूंग

पालघर जिल्ह्यातला अर्नाळ किल्ला आणि त्याच्या अवती भवती असलेले केळवा, तारापूरसारखे किल्ले आपले अस्तित्व जेमतेम टिकवून आहेत.

ठाणे जिल्ह्यातील किल्ल्यांच्या बाबतीत फार वेगळं चित्र नाही. ठाण्यातल्या किल्ल्याचा ब्रिटिशांनी तुरुंग केला आणि आता किल्ला ही ओळखच पुसली गेली आहे. मात्र पोर्तुगिजांनी घोडबंदरला उभारलेल्या किल्ल्याला शासनाच्या योजनेत नवीन रुप मिळाल्यामुळे त्याचा पुनर्जन्म झाला, असं म्हणता येईल.

 

संभाजी महाराजांनी पूर्ण केला कुलाबा किल्ला


रायगड जिल्ह्यातील अलिबागचा किल्ला पर्यटकांमध्ये भरपूर प्रसिध्द आहे. या किल्ल्याचं नाव ‘कुलाबा किल्ला’ आणि म्हणून रायगड जिल्ह्याचं नावही पूर्वी कुलाबा होतं. कुलाबा म्हणजे ‘समुद्रात घुसलेली जमिनीची अरुंद चिंचोळी पट्टी’.

छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणावरील पकड घट्ट करण्यासाठी 1662  मध्ये हा किल्ला बांधायला सुरवात केली.  पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी 1681 मध्ये तो पूर्ण केला. या दुर्गाची बांधणी हे पुरातन वास्तूरचनेचं उत्तम उदाहरण आहे. फक्त चिऱ्यांवर चिरा ठेवून किल्ल्याची उभारणी करण्यात आली आहे. तरिही गेली साडे तीनशे वर्षे किल्ल्याची 25 फूट उंच तटबंदी समुद्राच्या लाटांचा मारा, खाऱ्या वाऱ्याचे तडाखे सोसत अभेद्यपणे उभी आहे.

पेशवाईत याच किल्ल्यात ठाण मांडून सरखेल कान्होजी आंग्रे यांनी ब्रिटिश आणि पोर्तुगिजांना जेरीस आणले होते. या किल्ल्यात आंग्रे यांचा मोठा वाडा होता, जो 1787 मध्ये लागलेल्या आगीत भस्मसात झाला. ओहोटीला कुलाबा किल्ल्यात किनाऱ्यावरुन सहज चालत जाता येतं. या किल्ल्याला दोन प्रवेशद्वारे आहेत. एक अलिबाग शहराकडे तोंड करुन आणि एक समुद्राकडे तोंड करुन. या किल्ल्याला एकूण सतरा बुरुज आहेत.

या किल्ल्यामध्ये भवानी माता, पद्मावती देवी, गुलबाई तथा महिषासूर मर्दिनी यांची आणि राघोजी आंग्रे यांनी बांधलेलं उजव्या सोंडेच्या गणपतीचं मंदिर बघायला मिळतं. 

कुलाबा किल्ला


समुद्रातल्या किल्ल्यावर गोड्या पाण्याचे साठे

कुलाबा किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे समुद्रात असलेल्या या किल्ल्यात गोड पाण्याची विहीर आणि तलाव आहे. अलिबाग लोकप्रिय पर्यटनस्थळ असल्याने इथे मोठ्या प्रमाणात लोकांचा राबता असतो आणि त्यामुळेच किल्ल्यात कचराही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. आपल्या ऐतिहासिक अभिमान स्थळांची स्वच्छता आणि पावित्र्य आपणच राखायला नको का ?  

 

लाईट हाऊस असणारा कोर्लई किल्ला

रायगड जिल्ह्यातील सागरी किल्ल्यांची मालिका कुलाबा किल्ल्यापासून सुरू होते. अलिबागवरुन पुढे निघाल्यावर रेवदंड्याला एका पुरातन किल्ल्याचे अवशेष आहेत. रेवदंड्यानंतर लागते कोर्लई गाव. या गावाच्या जवळच कुंडलीका नदी अरबी समुद्राला मिळते. तिथेच डोंगरावर कोर्लईचा ऐतिहासिक किल्ला आहे. समुद्राच्या लगत असलेल्या या किल्ल्यावर जमिनीवरुन जायला रस्ता आहे.

कोर्लईचा किल्ला 16 व्या शतकात निजामशहाने बांधलेला आहे. तेंव्हा रेवदंडा पोर्तुगिजांच्या ताब्यात होतं आणि त्यांच्या विरोधाला न जुमानता हा किल्ला बांधला गेला. पुढे तो पोर्तुगिजांच्या ताब्यात गेला. पुढे 1739 मध्ये तो मराठा साम्राज्यात आला. सात बुरुज असलेल्या या किल्ल्यावर एकूण अकरा प्रवेशद्वारे आहेत. किल्ल्यावर पोर्तुगिजांनी बांधलेल्या चर्चचे भग्नावशेष आहेत. ठिकठिकाणी तोफाही पाहायला मिळतात. काही जुने शिलालेख दिसतात. किल्ल्याजवळ लाइट हाउस म्हणजेच दीपगृह आहे. 

कोर्लइ किल्ला

मराठेशाहीची न भरलेली जखम – जंजिरा

या परिसरातला सर्वात प्रसिध्द किल्ला म्हणजे मुरुडजवळचा जंजिरा. सुमारे चारशे त्र्याऐंशी वर्षांपूर्वी बांधलेला हा पाणकोट म्हणजे मराठेशाहीच्या इतिहासातली एक न भरलेली जखम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते पेशव्यांपर्यंत कोणालाही मुरुडचा जंजिरा किल्ला जिंकता आला नाही.

जंजिरा हे नाव अरबी भाषेतील ‘झंजिरा’ म्हणजे बेट या शब्दावरुन रुढ झाले आहे. 15 व्या शतकाच्या अखेरिस या बेटावर इथल्या स्थानिक कोळ्यांचा प्रमुख राम पाटील याने मेढेकोट म्हणजे लाकडाचा किल्ला उभारला होता. या बेटाच्या भौगोलिक स्थानामुळे राम पाटील निजामशहाला जुमानेसा झाला. तेंव्हा पिरमखानची नेमणूक हा बेटावरचा किल्ला जिंकण्यासाठी करण्यात आली. पिरेमखानाने व्यापारी असल्याची बतावणी करुन किल्ल्यात प्रवेश मिळवला आणि दगा फटक्याने किल्ला जिंकला. पुढे या किल्ल्याची जबाबदारी बुऱ्हाणखानाकडे आली आणि त्याने मूळचा मेढेकोट पाडून आज दिसणारा बुलंद किल्ला उभारला. त्याचे नाव ठेवले ‘जंझिरे मेहरुब’ म्हणजे बेटावरचा चंद्र.

सन 1617 मध्ये निजामशाहीचा सूत्रधार मलिक अंबर याने सिद्दी अंबर सानक याला जंजिऱ्याचा प्रमुख नेमले. पुढे याच सिद्दी घराण्याने जंजिरा ताब्यात ठेवून किनारपट्टीवर आपली दहशत माजवली. शिवाजी महाराज, पेशवे इतकेच काय पण इंग्रजांनाही जंजिरा जिंकता आला नाही. अखेर 1948 साली भारत स्वतंत्र्य झाल्यावर मुरुड संस्थान विलीन झाले आणि जंजिरा खुला झाला.

जंजिरा किल्ला

पाचशेहून अधिक तोफा

अडीच किलोमीटरच्या परिघात पसरलेल्या या किल्ल्याला हुरमुख, बहादुरशहा, सर्जा, सरदारी, मुर्तुजा, नगिना, हैदरी असे बावीस बुरुज आहेत. या किल्ल्याचे महाद्वार पूर्वेकडे तोंड करुन आहे. या दरवाजावर बुऱ्हाणखानाने कोरुन घेतलेलं आणि जंजिरा किल्ल्याच्या ताकदीचं प्रतिक ठरलेलं शिल्प आजही पाहायला मिळतं. एका वाघाच्या चारही पायांमध्ये चार हत्ती, तोंडात आणि शेपटीत एक हत्ती असे हे शिल्प जणू सांगते की जंजिरा ( म्हणजे त्याचा स्वामी) असाच बलशाली आहे.

किल्ल्यातले सुरुलखान या सिद्दी शासकाच्या पाच मजली वाड्याचे अवशेष पाहून कधी काळी हा किल्ला म्हणजे खरोखरच बेटावरचं गाव होतं याची खात्री पटते. जंजिरा किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे इथल्या तटबंदीवर आजही ठाण मांडून बसलेल्या भल्या मोठ्या तोफा. कलाल बांगडी, चावरी आणि लांडा कासम या तोफा पंचधातूंच्या बनवलेल्या आहेत. इतिहासकाळात या किल्ल्यावर पाचशेपेक्षा जास्त तोफा होत्या अशी नोंद आहे.

भर समुद्रात असलेल्या या किल्ल्यावर गोड्या पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत. त्याच प्रमाणे पश्चिमेला ‘दर्या दरवाजा’ आहे. समजा शत्रुने जोर केलाच तर या दरवाज्याने मागच्या बाजूने पळ काढता येईल, अशी व्यवस्था होती. किल्ल्याच्या तटबंदीची रचना अशी आहे की, होडी किल्ल्याच्या अगदी जवळ येईपर्यंत महाद्वार दिसत नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांना जंजिरा जिंकता आला नाही पण सिद्दीवर जरब बसवण्यासाठी त्यांनी भर समुद्रात जंजिऱ्यापासून जवळच ‘कासा उर्फ पद्मदुर्ग’ हा किल्ला उभारला. कमळाच्या आकाराची रचना असलेला हा किल्ला आता अगदी दुर्लक्षित अवस्थेत आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षिदार असलेले हे जलदुर्ग म्हणजे इतिहासातील मानबिंदू आहेत. रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यातील सागरी किल्ल्यांची माहिती जाणून घेण्यासाठी पुढील भाग अवश्य वाचावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Malhar Certificate : महाराष्ट्रात 'झटका' मांस’ विक्रेत्यांसाठी 'मल्हार प्रमाणपत्र' ही नवी योजना सुरू करण्यात आली आहे. राज्याचे मत्स्य व बंदरे
World Autism Awareness Day : ऑटिझम म्हणजेच स्वमग्नता हा शब्द सध्या खूपदा ऐकायला येतो. पण ऑटिझम म्हणजे नेमकं काय, ते
Roja : रमजानच्या पवित्र महिन्यात मुसलमान रोजे ठेवतात. रोजे म्हणजे सुर्योदय ते सुर्यास्तादरम्यान काहीही न खाता-पिता उपवास ठेवणं. इस्लामी वर्ष

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ