मराठी सिनेमांची वाटचाल

Source : Thisday.app
व्यवसाय म्हणूनच नव्हे तर आशयातील वैविध्यामुळे मराठी चित्रपटांनी (Marathi Cinema) आपली वेगळी ओळख जागतिक स्तरावर निर्माण केली आहे. चित्रपटाकडे मनोरंजनाच्या बरोबरीनेच एक कलामाध्यम म्हणून पाहणा-या अभ्यासू दिग्दर्शकांची एक फळी मराठी चित्रपटसृष्टीत समर्थपणे उभी राहिली आहे. या तरुण दिग्दर्शकांनी मराठी चित्रपटांना त्यांच्या पारंपारिक चाकोरीतून बाहेर काढले. या दिग्दर्शकांनी निवडलेल्या कथा मराठी माणसांच्या मराठी समाजाच्या जवळच्या आहेत.
[gspeech type=button]

‘राजा हरिश्चंद्र’ हा दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेला मूकपट मे 1993 ला प्रदर्शित झाला आणि भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रचली गेली. 1932 साली ‘प्रभात फिल्म कंपनी’ साठी व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला ‘अयोध्येचा राजा’ हा मराठी भाषेतील पहिला चित्रपट ठरला. मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन  करणा-या पौराणिक पटांपासून आजच्या समाजातील जळजळीत वास्तव टिपणारे हजारो  चित्रपट गेल्या शंभर वर्षाच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीत निर्माण झालेत. दादासाहेब फाळके व त्यांच्या समकालीन दिग्दर्शकांनी प्रेक्षकांची अभिरुची  ओळखून पौराणिक कथानकांवर आधारित चित्रपटाची निर्मिती केली. दादासाहेब फाळकेंनी चित्रपटांना कला म्हणून प्रस्थापित केलचं, पण त्याच बरोबरीने व्यवसायाचा दर्जा देण्याचं महत्त्वाचं काम देखील केलं.

वैश्विक मराठी सिनेमा

केवळ व्यवसाय म्हणूनच नव्हे, तर आशयातील वैविध्यामुळे मराठी चित्रपटांनी आपली वेगळी ओळख जागतिक स्तरावर निर्माण केली आहे. चित्रपटाकडे मनोरंजनाच्या बरोबरीनेच एक कलामाध्यम म्हणून पाहणाऱ्या अभ्यासू दिग्दर्शकांची एक फळी मराठी चित्रपटसृष्टीत समर्थपणे उभी राहिली आहे. या तरुण दिग्दर्शकांनी मराठी चित्रपटांना त्यांच्या पारंपारिक चाकोरीतून बाहेर काढले. या दिग्दर्शकांनी निवडलेल्या कथा मराठी माणसांच्या मराठी समाजाच्या जवळच्या आहेत. त्यात नाट्य आहे, मनोरंजनाचं मूल्य आहे, प्रेक्षकांना हसवण्याची, रडवण्याची ताकद आहे. पण तरीही हे चित्रपट मराठीच्या परिघापुरते सिमीत राहिलेले नाहीत. याचं कारण चित्रपट माध्यमाची स्वतंत्र अशी जी बलस्थानं आहेत ती या दिग्दर्शकांनी ओळखलीत. कॅमेरा, ध्वनी याचा अचूक वापर ते करत आहेत. आपल्या चित्रपटांतील प्रादेशिकता जपता जपता ती वैश्विक कशी होईल, याचं भान या दिग्दर्शकांनी राखलयं. त्यामुळेच आजचा मराठी सिनेमा महाराष्ट्राच्या सीमा पार करुन अमराठी प्रेक्षकांपर्यंत पोहचलाय.

संत तुकाराम व्हेनिस फिल्म फेस्टिवलमध्ये

‘अयोध्येच्या राजा’ने अभूतपूर्व यश मिळवलं व पुढे अनेक वर्षे प्रभात फिल्म कंपनीने मराठी चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवलं. माणूस, कुंकू, शेजारी (दिग्दर्शक – व्ही.शांताराम) या चित्रपटांतून सामाजिक संदेश देत असताना त्याचं कलात्मक मूल्यही जपलं गेलं. विष्णुपंत दामले आणि फत्तेलाल या दिग्दर्शक द्वयीचा संत तुकाराम (1936) हा चित्रपट व्हेनिस फिल्म फेस्टिवल मधील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक म्हणून गौरवला गेला.

विषयातील वैविध्य

मा.विनायक, आचार्य अत्रे, भालजी पेंढारकर, राजा परांजपे, राजा ठाकुर, राजदत्त, मधुकर पाठक यांनी आपापल्या विशिष्ट शैलीतले चित्रपट निर्माण केले. सामाजिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, विनोदपट असे विषयांचे वैविध्य मराठी चित्रपटातून येत राहिले. मराठीतील साहित्यिकांनी चित्रपटांच्या आशयघनतेत मोलाची भर घातली. वि.स. खांडेकर, ह.ना.आपटे, महादेवशास्त्री जोशी, विश्राम बेडेकर, ग.दि.माडगुळकर यांच्या सघन साहित्यावर मराठी चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या गेल्या.

साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार ही मिळाला. मात्र त्यानंतर हा  पुरस्कार मिळवण्यासाठी पुढची पन्नास वर्षे जावी लागली. या पन्नास वर्षाच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीने अनेक चढउतार पाहिले.

‘जय मल्हार’ या सिनेमाने मराठी चित्रपटाला ग्रामीण बाज आणि लावणीचा साज दिला. ‘सांगत्ये ऐका’, ‘केला इशारा जाता जाता’, ‘एक गाव बारा भानगडी’ यासारखे अनंत माने यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट यशस्वी झाल्यामुळे मराठी चित्रपट म्हणजे लावणीपट हे एक समीकरण तयार झाले. ग्रामीण व तमाशापटाच्या चाकोरीत कोंडलेल्या मराठी चित्रपटांना राजदत्ताच्या ‘मधुचंद्र’, राजा परांजपेंच्या ‘पाठलाग’, राज ठाकूरांच्या ‘मुंबईचा जावई’ या चित्रपटांनी  बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. 

व्ही.शांतारामांनी  ‘पिंजरा’ हा  रंगीत चित्रपट निर्माण केला. प्रवाही पटकथा व अवीट गोडीची गाणी यामुळे तो अधिक गाजला. याच सुमारास दादा कोंडके यांनी ‘सोंगाड्या’तून एका भोळ्या भाबड्या  नायकाची प्रतिमा पडद्यावर आणली. त्यांच्या बहुतेक सर्व चित्रपटांनी व्यावसायिक यश मिळवलं. पण त्यामुळे मराठी चित्रपट काळाच्या पुढे मात्र जाऊ शकला नाही.

सिनेमांतील प्रयोग आणि प्रेक्षक

सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीस हिंदीमध्ये समांतर सिनेमाचा प्रवाह सुरु झाला. मृणाल सेनांच्या ‘भुवनशोम’ ने हिंदी चित्रपटांना  वेगळी दिशा मिळाली. मराठी चित्रपटसृष्टी या प्रवाहापासून दूर राहू शकली नाही. हिंदी समांतर चित्रपटांमध्ये कार्यरत असणारे कलावंत, तंत्रज्ञ मराठी चित्रपटसृष्टीशी जोडले गेलेले होते.

विजय तेंडुलकर, सत्यदेव दुबे, अमोल पालेकर, स्मिता पाटिल या कलावंतांनी हिंदी प्रमाणेच मराठी समांतर चित्रपटांमध्येही आपलं योगदान दिलं. सत्यदेव दुबेंच्या ‘शांतता कोर्ट चालू आहे’ने मराठीत समांतर चित्रपटांची सुरुवात झाली. डॉ.जब्बार पटेलांच्या ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘जैत रे जैत’, ‘उंबरठा’ यामधून वास्तववादी मराठी चित्रपटांची नांदी झाली.

अमोल पालेकरांचा ‘आक्रित’, जयू व नचिकेत पटवर्धनांचा ‘22 जून 1897’, अरुण खोपकरांच्या ‘कथा दोन गणपतरावांची’ या चित्रपटांनी  मराठीमध्ये  वेगळे प्रयोग होऊ शकतात हे सिद्ध केलं, मात्र हा प्रवाह तितकासा जोरकस नव्हता. चित्रपटातून विनोद किंवा कौटुंबिक नाट्याची अपेक्षा करणा-या सामान्य प्रेक्षकाने या चित्रपटांची फारशी  दखल घेतली नाही. मुंबई, पुणे या शहरांतील प्रेक्षकांपुरता  हे  चित्रपट मर्यादित राहिले.

लाटेवर स्वार

याच सुमारास महेश कोठारेंचा ‘धुमधडाका’ प्रदर्शित झाला.  ‘धुमधडाका’मुळे लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ ह्या विनोदी जोडगोळीचा उदय  झाला आणि मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळंच वळण लागलं. ‘गंमत जमंत’, ‘अशी ही बनवाबनवी’ असे मोजके अपवाद वगळता या विनोदीपटांनी मराठी चित्रपटांना सुमार करुन टाकलं. आधीच मराठी चित्रपटांशी  फटकून असलेला प्रेक्षकवर्ग पार दुरावला. विजय कोंडकेच्या  ‘माहेरची साडी’ अभूतपूर्व यश मिळवलं पण कौटुंबिक कथानक असलेल्या चित्रपटांची पुन्हा एकदा  लाट आली. या चित्रपटांचा प्रेक्षक वर्ग मर्यादित होता.

मराठी सिनेमाला संजीवनी

अशा  प्रतिकूल वातावरणात सुमित्रा भावे व सुनिल सुकथनकर यांचे ‘दोघी’, ‘देवराई’, ‘वास्तुपुरुष’ व ‘दहावी फ’ हे चित्रपट आशेचा किरण बनून आले. मराठी प्रेक्षकांची नस अचूक ओळखून स्मिता तळवळकरांनी ‘कळत नकळत’, ‘सवत माझी लाडकी’ या चित्रपटांची निर्मिती केली. तरीही मराठी चित्रपटांबद्दल खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या मनात जिव्हाळा निर्माण करण्यासाठी व त्यांना थिएटर पर्यंत ओढून आणण्यासाठी 2003 साल उजाडावं लागलं. संदीप सावंतचा ‘श्वास’ व निशिकांत कामतच्या ‘डोंबिवली फास्ट’ने मराठी चित्रपटांच्या मन्वंतराची सुरुवात केली. भावस्पर्शी कथा, नेटकी पटकथा आणि उत्तम तांत्रिक बाजू यामुळे ‘श्वास’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. राष्ट्रीय पुरस्कार आणि भारतातर्फे ऑस्करसाठी मिळालेलं अधिकृत नामांकन यामुळे ‘श्वास’ ने भारतीय चित्रपटसृष्टीत हवा निर्माण केली.

फिल्म फेस्टिवल्स

याचवेळी संपूर्ण सिनेमाक्षेत्रात एकूणच बदल घडून येत होते. त्याचाही अप्रत्यक्ष फायदा मराठी चित्रपटांच्या निर्मितीसाठी झाला. भारत सरकारतर्फे भरवण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या धर्तीवर मुंबई, कलकत्ता, केरळ येथेही अशाच प्रकारचे चित्रपट महोत्सव चित्रपट कलावंत व फिल्म सोसायटीच्या माध्यमातून नियमितपणे आयोजित करण्यात येऊ लागले. फिल्म इंडस्ट्री आणि समीक्षक यांच्यापुरता मर्यादित असलेला जागतिक सिनेमा सर्वसामान्य प्रेक्षक व या क्षेत्रात करियर करु पाहणाऱ्या तरुणांपर्यंत पोहचला.

कौटुंबिक सिनेमा आणि बॉक्स ऑफिस

हिंदीमध्ये ‘हैद्राबाद ब्लूज’, ‘लगान’ सारखे प्रयोग होत असताना मराठी चित्रपटांतूनही प्रयोगशिलता वाढू लागली. सुमित्रा भावे, सुनिल सुकथनकरांना दिग्दर्शन सहाय्य करणाऱ्या सचिन कुंडलकरने ‘रेस्टारंट’ मधून मराठी चित्रपटांना अपरिचित अशी वातावरणातील एक कथा मांडली. परेश मोकाशीने दादासाहेब फाळकेंच्या कार्यकृतीला ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ मधून सलाम केला.

फिल्म्स् अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मधून दिग्दर्शनाचं प्रशिक्षण घेतलेल्या आणि ‘गिरणी’, ‘थ्री ऑफ अस’ या लघुपटांमुळे प्रकाशझोतात आलेल्या उमेश कुलकर्णीने ‘वळू’ मधून पदार्पण केलं. त्याच्या ‘विहिर’च्या निर्मितीसाठी अमिताभ बच्चनच्या कंपनीने अर्थसहाय्य केलं. कॉर्पोरेट कंपनी चित्रपट निर्मितीत रस घेऊ लागल्या. फिल्म फेस्टिव्हल मधील चित्रपटांनी प्रभावित होऊन मराठी मातीतील वास्तव टिपण्याचा प्रयत्न तरुण दिग्दर्शक करु लागले. मंगेश हाडवळेचा ‘टिंग्या’, सतीश मन्वरचा ‘गाभ्रीचा पाऊस’ या चित्रपटांची निर्मिती या प्रभावातून झाली.

इराणीयन चित्रपटांप्रमाणेच लहान मुलांचे भावविश्व टिपणारे चित्रपट अधिक संख्येने निघू  लागले. मराठी प्रेक्षक नेहमीच सहकुटुंब चित्रपटाचा आस्वाद घेत असतो. त्यामुळे स्वाभाविकच लहान मुलांचं भावविश्व चित्रपटातून पहायला त्याला आवडतं. हे चित्रपट व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा निर्मात्यांना लाभदायक ठरतात. ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘किल्ला’, ‘सलाम’, ‘ताऱ्यांचं बेट’ या चित्रपटात बालकलाकारांच्या प्रमुख भूमिका असल्या तरीही त्यातून अधोरेखित होणारी मूल्य ही मोठ्या प्रेक्षकांसाठीच होती. याच श्रेणीतले राजेश पिंजानीचा ‘बाबू बँड बाजा’, शिवाजी लोटन पाटिलचा ‘धग’, यांना राष्ट्रीय स्तरावर वाखाणले गेले. प्रादेशिक चित्रपटांच्या यादीत मराठीला प्रमुख स्थान मिळू लागले. उमेश कुलकर्णीचा ‘देऊळ’, चैतन्य ताम्हणेचा ‘कोर्ट’ आणि सुमित्रा भावे –सुनील सुकथनकर यांचा ‘कासव’ हे सुवर्णकमळाचे  मानकरी ठरले.

आशयघन सिनेमे आणि तंत्रज्ञानाचा वापर

चित्रपटाचा आशय हे नेहमीच मराठी चित्रपटाचं प्रमुख वैशिष्ट्य राहिलं आहे. स्टार्सच्या उपस्थितीपेक्षाही मराठी चित्रपटांत कथानकाला अधिक महत्त्व दिलं जातं. गेल्या दशकात अंकुश चौधरी,मकरंद अनासपुरे, भरत जाधव, स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधव यांनी मराठीत स्टारडम आणलं. यासाठी कारणीभूत ठरली ती महेश मांजरेकर, विवेक नवलाखा यासारख्या निर्मात्यांनी केलेली बिगबजेट चित्रपट निर्मिती ! महेश मांजरेकरांच्या मी ‘शिवाजी राजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाने मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालू शकतो याची निर्विवाद ग्वाही दिली. रवी जाधवच्या ‘टाईमपास’ने उत्तम व्यावसायिक चित्रपटाचं उदाहरण घालून दिलं.

झी, एस्सेल व्हिजन या कार्पोरेट कंपन्यानी सातत्याने मराठी चित्रपटांची निर्मिती करुन जोरदार प्रसिद्धी तंत्राच्या सहाय्याने मराठी चित्रपट व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी करुन दाखवले. सतीश राजवाडेने ‘गैर’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’ हे स्टायलिश चित्रपट दिले.दक्षिणेतील भडक फॉर्मुला मराठीत आजमावण्याचे अनेक मसालेदार प्रयत्न झाले तरीही मराठी प्रेक्षकांनी ‘लय भारी’ सारखा अपवाद वगळता दाक्षिणात्य चित्रपटांची छाप असलेल्या मराठी चित्रपटांना थारा दिला नाही.

‘टाईमपास’ सारखे हलके फुलके चित्रपट देणाऱ्या रवी जाधवने ‘नटरंग’, ‘बालकपालक’, ‘न्यूड’  असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट व्यावसायिक पातळीवर यशस्वी करुन दाखवणारा दिग्दर्शक अशी आपली ओळख निर्माण केली. रवी जाधवचा ‘मित्रा’ या लघुपटाचा समावेश असलेला बायोस्कोप हा मराठीतला एक अनोखा प्रयोग म्हणायला हवा. चार ख्यातनाम कवींच्या कवितांवर कथानक रचून त्यावरील लघुपटांची मालिका, एका चित्रपटात आणण्याची अभिनव रचना बायोस्कोप मध्ये करण्यात आलीय. विजू माने, रवी जाधव, गजेंद्र आहिरे आणि गिरिश मोहिते या चार दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या कथांना गुलजारांच्या अप्रतिम निवेदनाची जोड बायोस्कोप मध्ये मिळाली.

अरुण अविनाशचा ‘किल्ला’, चैतन्य ताम्हणकरचा ‘कोर्ट’, आदिश केळुस्करचा ‘कौल’ आणि नागराज मंजुळेचे ‘फॅण्ड्री’ व ‘सैराट’ यांनी मराठी चित्रपटांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. ‘किल्ला’ व ‘फॅण्ड्री’तून वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील मुलांची मानसिक स्थित्यंतरे फारच तरलतेने टिपली. चैतन्य ताम्हाणेच्या ‘कोर्ट’ आणि आदिश केळुस्करच्या ‘कौल’ ला केवळ मराठी चित्रपट म्हणणे अन्यायकारक ठरेल, कारण ह्या दोन्ही चित्रपटातून दृश्य व ध्वनी यांचा जो विलक्षण आविष्कार प्रेक्षकांना पहायला मिळाला तो केवळ मराठीतच नव्हे तर संपूर्ण भारतीयपटांसाठी अनोखा आहे. चित्रपटाच्या संकेतांना झुगारुन, कथन शैलीच्या पारंपरिक चौकटी मोडून या दोन्ही चित्रपटातून दृश्यरचनेचे नवीन प्रयोग दिग्दर्शकांनी केलेत. जे पाहताना आपल्याला प्रेक्षक म्हणून आपल्या आस्वादाच्या संकल्पना नव्याने तपासाव्या लागतात, हेच या चित्रपटांचं खरं यश आहे. ‘श्वास’ नंतर ‘कोर्ट’ सुद्धा ऑस्कर साठी नामांकित केला गेला ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक महत्त्वाची घटना आहे. नागराज मंजुळेच्या सैराटला मिळालेलं भूतो न भविष्यति व्यावसायिक यश हे देखील याच प्रकारात येतं.

ओटीटीचा परिणाम

कोविड पश्चात ओटीटीने  मनोरंजन  क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवू आणला आहे. मराठी चित्रपटांपुढे नवी आव्हाने उभी राहिली आहेत. तरीही निखील महाजन (गोदावरी), निपुण धर्माधिकारी (धप्पा, मी वसंतराव), सुहृद गोडबोले – वैभव खिस्ती (जून),  मंगेश जोशी (लेथ जोशी, कारखानिसांची वारी), भीमराव मुडे (बार्डो) हे नवीन पिढीतील दिग्दर्शक आशय घन चित्रपटांची निर्मिती करत आहेत.

व्यावसायिक गणितं

‘सैराट’, ‘बाई पण भारी देवा’ या चित्रपटांच्या यशात  प्रसिद्धी तंत्राचा मोठा हातभार होता. मराठीत वेगवेगळे प्रयोग होत असले तरीही या अभिनव प्रयोगांना जाहिरातबाजीची साथ नसेल तर व्यावसायिक यश दूर राहतं हे आजचं कटू वास्तव आहे. दरवर्षी शंभराहून अधिक मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. पण यशस्वी चित्रपटांची यादी पाहिली तर मात्र निराशाजनक चित्र समोर येतं.

चित्रपट व्यवसायाचा अजिबात अनुभव नसताना चित्रपटाच्या ग्लॅमरला भुलून निर्मितीमध्ये पैसा ओतणारे निर्माते आणि एखादा लघुपट किंवा नाट्य दिग्दर्शनाच्या बळावर चित्रपट दिग्दर्शनात उतरणारे अतिउत्साही दिग्दर्शक, यामुळे मराठी चित्रपटांची संख्या वाढली.

पण दर्जेदार चित्रपटांची संख्या मात्र मोजकीच राहिली आहे. चित्रपट ही सर्जनशील कला आहे आणि त्याचबरोबरीने व्यवसाय देखील आहे. व्यवसायाचं गणित जुळून आलं, तरच चित्रपट कलेला बळ मिळणार ही वस्तुस्थिती आहे. कला आणि व्यवसाय यांचा तोल सांभाळला गेला तर मराठी चित्रपटांना आज प्रादेशिक चित्रपटांमध्ये जे अव्वल स्थान मिळालयं ते निश्चितच टिकून राहिलं.

1 Comment

  • Makarand Joshi

    अतिशय माहितीपूर्ण आणि महत्त्वाचे टप्पे सांगणारा मराठी चित्रसृष्टीचा आढावा. अधिक तपशीलवार आणि विश्लेषक लेखाची प्रतिक्षा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

One Response

  1. अतिशय माहितीपूर्ण आणि महत्त्वाचे टप्पे सांगणारा मराठी चित्रसृष्टीचा आढावा. अधिक तपशीलवार आणि विश्लेषक लेखाची प्रतिक्षा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Malhar Certificate : महाराष्ट्रात 'झटका' मांस’ विक्रेत्यांसाठी 'मल्हार प्रमाणपत्र' ही नवी योजना सुरू करण्यात आली आहे. राज्याचे मत्स्य व बंदरे
World Autism Awareness Day : ऑटिझम म्हणजेच स्वमग्नता हा शब्द सध्या खूपदा ऐकायला येतो. पण ऑटिझम म्हणजे नेमकं काय, ते
Roja : रमजानच्या पवित्र महिन्यात मुसलमान रोजे ठेवतात. रोजे म्हणजे सुर्योदय ते सुर्यास्तादरम्यान काहीही न खाता-पिता उपवास ठेवणं. इस्लामी वर्ष

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ