निवडणुकीत मतदान केल्यावर शाई लावलेली डाव्या हाताची तर्जनी समोर धरून सेल्फी किंवा फोटो आपण सर्वच खूप हौसेनं काढतो. लोकशाहीत आपला सहभाग दाखवणारी ही शाई म्हैसूर मध्ये ‘म्हैसूर पेंटस् एण्ड वार्निश लिमिटेड’ या कंपनीत तयार होते. भारतातील प्रत्येक निवडणुकीकरता शाई याच कंपनीत तयार होते.
म्हैसूरच्या महाराजांनी सुरू केली कंपनी
1937 मध्ये म्हैसूरचे महाराजे कृष्णराजे ओडेयरू चौथे यांनी ही कंपनी सुरू केली. म्हैसूरच्या महाराजांच्या अनेक लोकोपोयोगी प्रकल्पामधला हाही एक प्रकल्प आहे. भारत स्वतंत्र झाल्यावर ही कंपनी पब्लिक सेक्टर म्हणजेच सार्वजनिक कंपनी झाली. सध्या कर्नाटक सरकार या कंपनीची मालक असून तेच ही कंपनी चालवतात.
1962 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदा बोटाला शाई
1962 च्या लोकसभा निवडणुकीत मत दिल्यावर मतदारांच्या बोटावर या शाईचा पहिल्यांदा वापर झाला. आणि तेव्हापासून भारतातल्या प्रत्येक निवडणुकीत ग्रामपंचायत ते लोकसभा ही शाई वापरलीच जाते.
परदेशी निवडणुकीतही भारतीय शाई
भारतीय निवडणूक आयोगासोबतच थायलंड, सिंगापूर, नायजेरीया, मलेशिया, साऊथ अफ्रिका, कंबोडीया हे देशही इथूनच शाई घेतात.
शाईचे पेनही उपलब्ध
5 मिली ते 50 मिली अशा वेगवेगळ्या साईजमध्ये या बाटल्या मिळतात. 5 मिली शाई 300 बोटांवर लावली जाते. आता तर या शाईचे पेनही वापरण्यात येतात.
विधानसभेसाठी 2 लाख 20 हजार 520 शाईच्या बाटल्या
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या निवडणुकीसाठी म्हैसूरहून 2 लाख 20 हजार 520 बाटल्या आल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या आवश्यकतेनुसार त्या त्या जिल्ह्याला या बाटल्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचं राज्य निवडणूक आयोग कार्यालयाकडून सांगण्यात आलं. प्रत्येक निवडणूक केंद्राला दोन बाटल्या देण्यात येणार आहेत. राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये 1 लाख 427 मतदानकेंद्र आहेत.