महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सत्तास्थापनेचा जो काही खेळ रंगला, तो संपूर्ण देशाला चकीत करणारा ठरला. आणि त्याचे पडसाद आतापर्यंत उमटत राहिले. राज्यातली राजकारणाची दिशाच बदलत गेली. दोन प्रमुख प्रादेशिक पक्षामध्ये फूट पडणं हे आणखीन धक्कादायक होतं. 2019 च्या निवडणुकीनंतर राज्यात राजकीय क्षेत्रात झालेल्या या प्रचंड उलथापालथीमुळे राज्यात यावेळेस कोणता पक्ष आघाडीवर असू शकतो आणि कोणता पक्ष सत्तेत असू शकतो, कोणता पक्ष आघाडीत असेल कोणता युतीमध्ये अशा यासगळ्याच सत्तास्थापनेच्या गोष्टीविषयी कोणी भाकित करु शकत नाही.
सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक
या निवडणुकीमध्ये दोन प्रादेशिक पक्ष फुटल्याने त्यातील कोणता गट हा मतदारांच्या अधिकृत मान्यतेला आहे? आणि भाजपा की काँग्रेस या राष्ट्रीय अजेंडा असलेल्या पक्षांतील लढाई, भाजपा पुन्हा क्रमांक एकचा पक्षच राहील का? काँग्रेस पुन्हा राज्यात पाय रोवू शकेल का? या सगळ्या मुद्यांसाठी ही अतिशय प्रतिष्ठेची अशी निवडणूक आहे. त्यामुळे या प्रचारातील मुद्दे आणि प्रचाराचा सूर ही आक्रमक होता.
प्रचारातील घोषणा
निवडणूक म्हटलं की, मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘घोषणा’ या महत्त्वाचं काम करतात. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतल्या काँग्रेसची ‘चौकीदार चोर है’ याला उत्तर म्हणून भाजपाने ‘मैं चोकीदार हूं’ या घोषणेसह संपूर्ण प्रचार कॅम्पेन केलं होतं.
विधानसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपाची ‘मी पुन्हा येईन’ ही घोषणा खूपच चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरून सुद्धा सत्ता स्थापन करु शकला नाही, म्हणून याच ‘मी पुन्हा येईन’ या घोषणेची सगळ्याच स्तरावर खिल्ली उडवली गेली.
प्रचारासाठी दिलेल्या घोषणांचा पक्षाला, प्रचाराला एकतर फायदा होतो किंवा केवळ घोषणेमुळे निवडणूक उलटून पराभव स्वीकारावा लागतो.
यंदाच्या निवडणुकीतही महायूतीकडून आणि तिही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली घोषणा म्हणजे ‘बटेंगे तो कटेंगे’. या घोषणेनंतर दुसऱ्या दिवसापासून भाजपा – महायुती विखारी प्रचार करत असल्याचा प्रचार महाआघाडीतल्या पक्षांकडून होऊ लागला.
‘बटेंगे तो कटेंगे’ ही घोषणा महायुतीतल्या मतदारांनाही रुचली नसल्याचं लक्षात येताच राज्यातल्या भाजपा नेतृत्वाकडूनच ‘एक है, तो सेफ है’ अशी सेफ लाईन, सेफ घोषणेचं कॅम्पेन करायला सुरुवात केली.
मतदारांसोबत मित्रपक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार यांनीही त्यांच्या प्रचारात ‘बटेंगे तो कटेंगे’ ही घोषणा न वापरण्याची काळजी घेतली.
‘बटेंगे तो कटेंगे’ ते ‘इंसाफ है तो, इंडिया सेफ हैं’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या जातीय राजकारणाला प्रोत्साहन देणाऱ्या घोषणेला एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांनी प्रत्यूत्तर दिलं आहे. त्यांनी या घोषणे विरोधात ‘इंसाफ है तो इंडिया सेफ हैं, संविधान है तो सन्मान हैं, आंबेडकर जिंदा है तो गोडसे मूर्दा हैं’ अशी घोषणा दिली आहे.
जात-धर्म हेच प्रमुख मुद्दे
कोणत्याही निवडणुकीच्या प्रचाराप्रमाणे याही निवडणुकीचा प्रचार हा जात – धर्म याच मुद्द्यांवर रंगला. त्यातही मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांसाठी या दोन जातीतल्या मतदारांना आकर्षित करुन घेण्यासाठी या राजकीय पक्षात ओढाताण सुरू होती.
अलीकडे राष्ट्रीय पातळीवर आणि गेल्या निवडणुकीपासून राज्यातही ओबीसी मतदारांना केंद्रीत करणार राजकारण सर्वच पक्षाकडून खेळलं गेलं आहे. राज्यात 13 टक्के ओबीसी मतदार आहेत. पण ओबीसी समाजाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या आरपीआय, वंचित आघाडी या प्रादेशिक पक्षांना राज्यातल्या राजकारणात पुरेसं महत्त्व दिलं जात नाही. मित्रपक्ष असला तरी सत्तास्थापनेत मात्र गणलं जात नाही.