विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. महायुतीला या निवडणुकीत 230 जागा मिळाल्या आहेत. तर महाआघाडीला 46 जागा मिळाल्या आहेत. अन्य स्थानिक पक्ष आणि अपक्षांना 13 जागा मिळाल्या आहेत.
भाजपाने 2019 सालचा स्वत:चाच रेकॉर्ड मोडत 132 जागा मिळवत क्रमांक एकचा पक्ष बनला आहे.
विधानसभा निवडणूक 2019 च्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. राज्यातील दोन प्रमुख प्रादेशिक पक्ष फुटल्याने त्यातील कोणत्या गटाला मतदारांची अधिकृत मान्यता आहे? भाजपा की काँग्रेस या राष्ट्रीय अजेंडा असलेल्या पक्षांतील लढाई, भाजपा पुन्हा क्रमांक एकचा पक्षच राहील का? काँग्रेस पुन्हा राज्यात पाय रोवू शकेल का? या सगळ्या मुद्यांसाठी ही अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक झाली.
महायुती |
महाआघाडी |
||||
भाजपा | शिवसेना
(शिंदे गट) |
राष्ट्रवादी काँग्रेस
(अजित पवार गट) |
काँग्रेस | शिवसेना
(उबाठा) |
राष्ट्रवादी काँग्रेस
(शरद पवार गट) |
132 |
57 | 41 | 16 | 20 |
10 |
तर समाजवादी पक्षाला 2 आणि इतर छोट्या प्रादेशिक पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी 10 जागांवर विजय मिळवला आहे.
निकालाचे अर्थ
शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे, राज ठाकरे अशा मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा आणि राजकीय कारकिर्दीची ही परिक्षा होती. त्यामुळे या निवडणुकीतला विजय हा केवळ राज्याच्या सत्ता स्थापनेपुरता मर्यादित नसून राज्यात कोणत्या राजकीय चाणक्याचं वर्चस्व आहे आणि कोणत्या गटाचा अधिक प्रभाव आहे हे प्रकर्षाने दाखवून देणारी निवडणूक आहे.
लोकसभेतल्या पराभवानंतरचे राज्यात बदललेलं चित्र
लोकसभा निवडणुकीतल्या निकालानंतर आजचा विधानसभा निवडणुकीचा निकाल हा नक्कीच नेत्यांसह मतदारांनाही अनपेक्षीत असेल. पण लोकसभा निवडणूकीतल्या पराभवानंतर महायुती सरकारकडून राबवल्या गेलेल्या योजना, प्रचारतंत्र या सगळ्याचा एकत्रित परिणाम या विजयातून दिसून येतो.
लाडक्या बहिणींचा आशीर्वाद
या निवडणुकीत विजयाचा मोठा फॅक्टर आहे तो म्हणजे ‘लाडकी बहिण योजना.’ महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर 28 जून रोजी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने महायुतीच्या विजयाचा शिल्पकार आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण या अर्थसंकल्पामध्ये महायुतीने प्रत्येक घटकातील मतदारांना आकर्षित करतील अशा घोषणा केल्या होत्या. त्यातलीच सर्वात जास्त गाजलेली योजना म्हणजे ‘लाडकी बहिण’ योजना.
या निवडणुकीत महिला मतदार अधिक होत्या. याची जाण ठेवून महायुतीने महिला मतदारांना केंद्रस्थानी ठेवत लाडकी बहिण योजना राबवली. याचा सकारात्मक परिणाम आजच्या निकालामधून दिसून येतो.
प्रादेशिक पक्षाचा अंत होतोय का?
या संपूर्ण निवडणुकीच्या निकालामध्ये प्रादेशिक पक्षांचा प्रभाव कमी होत असल्याचं दिसून येतेयं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या दोन प्रमुख प्रादेशिक पक्षात फूट पडल्यानंतर मूळ पक्षातून बाहेर पडलेल्या गटाचे अधिक आमदार निवडून आल्याचं पाहायला मिळतंय.
मनसेनेही या निवडणुकीत 125 जागा लढवल्या मात्र, या याही निवडणुकीत त्याची उपेक्षा झाल्याचं चित्र समोर आहे. यावेळी तर त्यांना एकही खातं उघडता आलेलं नाही. अगदी राज ठाकरेंच्या सुपुत्र अमित ठाकरे यांची जागाही वाचवता आलेली नाही.
पालघर जिल्ह्यातील वसई, नालासोपारा, बोईसर मतदारसंघात गेल्या अनेक वर्षापासून सत्तेत असलेल्या बहुजन विकास आघाडीलाही धक्का लागलेला आहे. या ही ठिकाणी भाजपाने विजयी पताका फडकावत आहे.
एकूणच राज्यातील अनेक छोट्या-मोठ्या प्रादेशिक पक्षांच्या बालेकिल्ला असलेल्या जागा हातूत निसटून गेल्याचं पाहायला मिळत आहे.