गेल्या विधानसभेच्या तुलनेत बालकांवरील प्रश्नांची संख्या निम्म्याहून कमी झाली आहे. चौदाव्या विधानसभेत बालकांचे आरोग्य, शिक्षण, बालकांवरील अत्याचाराच्या घटना याबाबतचे प्रश्न सभागृहात उपस्थित केले गेले आहेत.
दरम्यान, या विधानसभेने राज्याच्या बालधोरणासंबंधीत कोणतीच कार्यवाही केली नाहीये. त्यामुळे आगामी विधानसभेत बालधोरण तयार केलं जाईल अशी अपेक्षा आहे.
बालकांविषयीच्या चर्चेत किती सदस्यांनी सहभाग घेतला
गेल्या पाच वर्षात बालकांच्या समस्येवर एकूण 129 प्रश्न विचारले आहेत. बालकांवरील सर्वाधिक 28 प्रश्न हे बांद्रा पश्चिम मतदारसंघाचे भाजपा आमदार आशिष शेलार यांनी विचारले, तर 98 आमदारांनी बालकांविषयी एकही प्रश्न विचारला नाही.
बालकांवरील सर्वाधिक 70 प्रश्न मुंबई उपनगर जिल्ह्यातून तर सर्वात कमी म्हणजे एक प्रश्न वर्धा जिल्ह्यातून विचारला गेला.
महत्त्वाचे प्रश्न
मुलांवर होणार्या लैंगिक अत्याचाराबाबत सभागृहात 21 प्रश्न उपस्थित केले गेले. बालकांच्या आरोग्याविषयी 13, बालमृत्यूविषयक 12, कुपोषणाबद्दल 6, बालविवाहासंबंधी 4, अनाथ मुलांविषयी 2 आणि शिक्षण आणि निवासी शाळांबाबत 5 प्रश्न मांडले गेले आहेत.
मिशन अंत्योदयाच्या माहितीनुसार, राज्यात 30,803 गावांमध्ये आरोग्याची कोणतीही सुविधा नाही. आणि 6,919 गावांपासून ही सुविधा 10 किमीपेक्षा दूर अंतरावर आहे.