भारतात नद्यांना खूप पवित्र, पूजनीय मानले जाते. आपण नद्यांमध्ये स्नान करतो, नदीतील पाण्याची पूजा आणि इतर धार्मिक कामांमध्ये वापर करतो. भारतातील अशा काही खूप जुन्या नद्या आहेत त्यांच्याशी संबंधित कथा आजही लोकप्रिय आहेत. या सर्व पवित्र नद्यांमध्ये कर्मनाशा नदी मात्र एक अपवाद आहे. कर्मनाशा या नदीचे पाणी पवित्र मानले जात नाही. या नदीचे पाणी पिणे तर दूरच, लोक या नदीतील पाण्याला स्पर्श करायलाही घाबरतात. तिला शापित नदी बोलले जाते. तिच्याबद्दलच्या या समजामुळेच कदाचित तिला ‘कर्मनाशा’ नदी हे नाव पडलं असावं. ही नदी बिहारच्या कैमूर जिल्ह्यात उगम पावते आणि उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमधून वाहते.उत्तर प्रदेशात या नदीवर अनेक धरणे आहेत.
कर्मनाशा नदीच्या शापित होण्याचे आणि तिला अपवित्र मानण्यामागे एक पौराणिक कथा आहे. एकदा राजा हरिश्चंद्राचे वडील सत्यव्रत यांनी आपल्या गुरूंकडे वशिष्ठाकडे स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त केली. पण गुरुंनी त्यांना नकार दिला. राजा सत्यव्रत यांनी मग गुरु विश्वामित्र यांना हीच विनंती केली. विश्वामित्राने सत्यव्रताला आपल्या तपस्या शक्तीने स्वर्गात पाठवले. हे पाहून देव इंद्र खूप रागावले आणि त्यांनी राजाचे डोके पृथ्वीवर पाठवले. नंतर विश्वामित्रांनी आपल्या तपश्चर्येने राजाला स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्यभागी थांबवले आणि देवांशी युद्ध केले. स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामध्ये सत्यव्रत उलट्या अवस्थेत होता आणि त्याच्या तोंडातून टपकणाऱ्या लाळेमुळे कर्मनाशा नदीचा उगम झाला. या राजाला त्याच्या वाईट कार्यासाठी शाप दिला गेला होता. म्हणून, त्याच्या तोंडातून निघालेले पाणी ( लाळ ) म्हणजेच कर्मनाशा नदी ही देखील शापित मानली जाते.
या कथेमुळे लोकं कर्मनाशा नदीच्या पाण्याला स्पर्श करायला घाबरतात. ते मानतात की, या पाण्यामुळे त्यांच्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे ते पाण्याला स्पर्शही करत नाहीत आणि कोणत्याही इतर कामात देखील त्या पाण्याचा वापर करत नाहीत.