उत्तराखंड! देवाची पवित्र भूमी आणि सौदर्यांने बहरलेले असं निसर्गसंपन्न राज्य अशी दुहेरी ओळख उत्तराखंडची आहे. धार्मिक तीर्थस्थान, पर्यटन यांच्यासह उत्तराखंडमध्ये आणखीन एका समुहाची गर्दी असते ती म्हणजे गिर्यारोहकांची.. उत्तराखंडमधल्या उंच उंच पर्वतरांगा या गिर्यारोहकांना खुणावत असतात.
दयारा बुग्याल, गोमुख, कालिंदी पास, हर्षिल, गर्तांग गली, दोडीताल-दारवा खिंड-बकरीया टॉप, गोमुख तपोवन ट्रेक, केदारनाथ आणि मल्ला-कालीपिरपास-पिंसवर अशी छोटी – मोठी एकूण 60 गिर्यारोहण स्थळं उत्तरकाशीमध्ये आहेत.
आता गिर्यारोहकासाठी आनंदाची बातमी अशी आहे की, या स्थळांमध्ये आणखीन दोन स्थळांची भर पडणार आहे. ही दोन स्थळं काही नवीन निर्माण केलेली नाहीत. तर भारत – चीन युद्धा दरम्यान बंद केलेली ही दोन स्थळं पुन्हा गिर्यारोहणासाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
जनकताल ट्रेकिंग पॉइंट
उत्तरकाशीमधल्या जादुंग व्हॅलीमधून जनकताल इथे जाणारा हा गिर्यारोहणाचा मार्ग आहे. जगातला हा दुसऱ्या क्रमांकाचा ट्रेकिंग मार्ग असल्याचं समोर आलं आहे. जादुंग ते जनकताल असा हे एकूण 12 किलोमीटर अंतर असून समुद्रसपाटीपासून याची उंची 17,716 फूट आहे.
नीलापानी – मुलिंग ट्रेक पॉइंट
नीलापानी ते मुलिंग हा जवळपास 25 किलोमीटर लांबीचा ट्रेकिंग मार्ग आहे. समुद्रसपाटीपासून 17000 फूट उंचावर हे स्थळ आहे. इथल्या वन विभाग कर्मचाऱ्यांच्या मते जादुंग – जनकताल मार्गापेक्षा हे मार्ग पार करणं खूप कठीण असतं. हा मार्ग परत तिबेटशी जोडलेला आहे. या मार्गावर गिर्यारोहकांना अद्भूत नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळतं.
63 वर्ष हे ट्रेकिंग मार्ग होते बंद
जादुंग ते जनकताल आणि नीलापानी ते मुलिंग हे दोन्ही मार्ग चीन आणि तिबेटच्या सीमारेषेजवळचे मार्ग आहेत. 1962 साली भारत – चीन दरम्यान युद्धाला सुरुवात झाल्यावर या दोन्ही मार्गावर लष्करी तळ उभे केले होते. त्यामुळे तेव्हापासून हे दोन्ही मार्ग ट्रेकिंग साठी बंद केले होते.
अर्थव्यवस्थेला चालना
उत्तराखंड इथल्या स्थानिक सरकारने व केंद्र सरकारने उत्तरकाशीमधल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी हे दोन्ही ट्रेकिंग मार्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन्ही मार्गावर हिरवा झेंडा दाखवून गिर्यारोहण सुरू केलं जाणार आहे.
हिवाळ्यात चार धाम यात्रा
उत्तराखंड हे तीर्थस्थानाचं राज्य आहे. इथे पावसाळ्याच्या दरम्यान जगभरातले भाविक चारधाम यात्रेसाठी येत असतात. मात्र, त्यावेळेत भाविकांची अलोट गर्दीचं व्यवस्थापन करण कठीण होतं. त्यामुळे हिवाळ्यात ही चार धाम यात्रा सुरू करण्याची संकल्पना स्थानिक प्रशासनाने मांडली आहे. या हिवाळी चार धाम यात्रेला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 27 फेब्रुवारीला उत्तरकाशीच्या दौऱ्या दरम्यान, हर्षिल इथल्या मुखबा मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. या हिवाळी चार धाम यात्रेमुळे भाविकांनाही चांगल्या प्रकारे दर्शन घेता येईल. तर इथल्या स्थानिक लोकांनाही उत्पन्न आणि रोजगार मिळेल हा यामागचा उद्देश आहे.