दरवर्षी ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर हजारो ऑलिव्ह रिडले ( Olive Ridley turtle ) समुद्री कासव अंडी घालण्यासाठी येतात. या अद्वितीय प्रक्रियेला ‘अरिबाडा’ असे म्हणतात. यंदा, रशिकुल्या किनाऱ्यावर तब्बल 6 लाख 82 हजार कासवांनी हजेरी लावली आहे. या कासवांच्या पाठीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाने संपूर्ण किनारा जणू जिवंत चित्रासारखा दिसत आहे. हे एक नैसर्गिक आश्चर्य असून, दरवर्षी हे सुंदर दृश्य पाहायला मिळते. पण यंदा या किनाऱ्यावर दरवर्षीहून अधिक कासव आले आहेत.
सर्वात लहान, पण सर्वाधिक संख्येने आढळणारे समुद्री कासव
ऑलिव्ह रिडले समुद्री कासव हे सर्व समुद्री कासवांमध्ये आकाराने सर्वात लहान असतात. जगभर यांची संख्या सर्वाधिक आहे. या कासवांचे शास्त्रीय नाव Lepidochelys olivacea आहे. या कासवांच्या कवचाचा आकार हृदयासारखा पण सपाट आणि रंग ऑलिव्ह-हिरवा असतो. त्यामुळे या कासवांना सहज ओळखता येते.
सर्वात वयोवृद्ध कासव साधारणपणे 60 ते 70 सेमी लांब आणि 35 ते 45 किलो वजनाचे असतात. ही कासवे मुख्यतः पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंद महासागराच्या उष्णकटिबंधीय भागात आढळतात. त्यांचा विशिष्ट रंग त्यांना समुद्रात लपून राहण्यास मदत करतो. पण सध्या ह्या कासवांना मानवनिर्मित व नैसर्गिक धोके वाढले आहेत. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेच्या (IUCN Red List) यादीत त्यांना “असुरक्षित” (Vulnerable) म्हणून समाविष्ट करण्यात आलं आहे
त्यांचे अद्वितीय सामूहिक अंडी घालण्याचे वर्तन, अरिबाडा (स्पॅनिश भाषेत याचा अर्थ ‘पोहोचणे’ असा होतो), हे फार दुर्मिळ असून जगात मोजक्या ठिकाणीच दिसते. त्यामुळे ओडिशाचा किनारा त्यांच्या जगण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
हजारो कासवांचे एकत्रित अंडी घालण्याचे दुर्मिळ दृश्य
आयुष्यभर मोकळ्या समुद्रात फिरल्यानंतर, ही समुद्री कासव ज्या किनाऱ्यावर जन्मले होते, तिथेच परत येतात. नर आणि मादी समुद्रात मिलन करतात आणि नंतर या माद्या वाळूच्या किनाऱ्यावर येऊन अंडी घालतात.
“अरिबाडा” म्हणजे हजारो कासव माद्यांनी एकाच वेळी अंडी घालण्याची अद्वितीय प्रक्रिया. काही रात्रींमध्ये हजारो माद्या किनाऱ्यावर एकत्र येतात आणि अंडी घालतात. हे एक प्रकारचे संरक्षण तंत्र मानले जाते, कारण इतक्या मोठ्या संख्येने माद्या आल्याने भक्षकांना सर्व अंडी खाणे कठीण होते.
मादी कासव समुद्रकिनाऱ्यावर येताच वाळूत योग्य जागा शोधतात, जी भरतीच्या रेषेच्या वर असते. मग त्या आपल्या मागच्या परांनी खड्डा खोदून त्यात 100 हून अधिक अंडी घालतात. नंतर त्या अंड्यांना वाळूने झाकतात, जेणेकरून सूर्याच्या उष्णतेने ऊब (incubation) मिळेल. ही प्रक्रिया संपूर्ण अंडी घालण्याच्या हंगामात अनेक वेळा केली जाते, त्यामुळे जास्तीतजास्त पिल्ले जगू शकतात.
हे ही वाचा : जगभर फिरणारी खेळणी!
ओडिशाचा किनारा: ऑलिव्ह रिडलेसाठी सुरक्षित ठिकाण
ओडिशाचे रशिकुल्या रूकरी आणि गहीरमाथा मरीन अभयारण्य हे ऑलिव्ह रिडले कासवांसाठी उत्तम ठिकाण आहे. इथे शांत समुद्र, मऊ वाळू आणि कमी मानवी हस्तक्षेप असल्यामुळे कासवांसाठी हे सुरक्षित ठिकाण आहे.
संवर्धनासाठी सरकारचे प्रयत्न
ओडिशा सरकार आणि पर्यावरण संघटना या कासवांच्या संरक्षणासाठी विशेष उपाययोजना करत आहेत. यामध्ये किनाऱ्यावर गस्त घालणे, मासेमारीवर काही निर्बंध लावणे आणि स्थानिक लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे यावर भर दिला जात आहे.
यंदा 6 लाख 82 हजार कासवं किनाऱ्यावर आल्याने संरक्षणाच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे दिसून आले. मात्र, तरीही या ऑलिव्ह रिडले कासवांना अनेक धोके आहेत. मासेमारीच्या जाळ्यात अडकणे, नैसर्गिक घर नष्ट होणे, समुद्राच्या पातळीतील वाढ, वाढती वादळे आणि हवामान बदल यामुळे त्यांचे भवितव्य धोक्यात आहे.
‘अरिबाडा’चे महत्त्व आणि भविष्यातील आव्हाने
अरिबाडा हा समुद्री पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग आहे . ही कासवे किनाऱ्याच्या परिसंस्थेचे संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे त्यांचे संरक्षण करणे हे केवळ पर्यावरणीय जबाबदारी नसून जैवविविधता टिकवण्यासाठी आवश्यक आहे. भविष्यातील धोके लक्षात घेता, या सुंदर समुद्री कासवांचे संवर्धन करण्यासाठी आणखी प्रभावी उपाययोजना राबवण्याची गरज आहे.