हिंदू संस्कृतीत गोमूत्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. प्राचीन परंपरेपासूनचं गोमूत्रातील वैद्यकीय महत्त्व भारत जाणून आहे. त्यामुळे अनेक धार्मिक क्रियांमध्ये गोमुत्राचा उपयोग केला जातो. यापासून अनेक उत्पादनं तयार करुन त्यांची विक्री सुद्धा केली जाते. चीनने मात्र अलीकडे या गो मूत्रावर संशोधन केलं आहे. चीन आता या गोमूत्रापासून यूरिया खत तयार करणार आहे.
गोमूत्रातील पोषकमूल्यांवर चीनचं संशोधन
चीनमधल्या हनान विद्यापीठातील संशोधकांनी याविषयीच संशोधन पूर्ण केलं आहे. गाईच्या मूत्रामध्ये नायट्रोजनचं प्रमाण हे जास्त असते. शेतमालाचं उत्पादन अधिकाधिक वाढावं यासाठी, यूरिया पॅरोक्साइडची गरज असते. गाईच्या मूत्रामध्ये हे घटक अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे यापासून तयार केलेल्या खताने शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे.
गोमूत्रातील पोषकमूल्ये
दिनांक 15 जानेवारी रोजी ‘गोशाला इव्हेंट’ या कार्यक्रमात आयआयटी मद्रासचे संचालक विझीनाथन कामाकोटी यांनी गोमूत्राच्या आरोग्यदायी फायद्यावर भाषण केलं. ते म्हणाले की, “गोमूत्र हे अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल आणि पचनासाठी उत्तम असं द्रव्य आहे. त्यामुळे पचनासंदर्भात असलेल्या आजारावर औषधोपचार म्हणून त्याचा वापर करता येऊ शकतो. याशिवाय सेंद्रिय शेती आणि देशी गाईच्या प्रजोत्पादनासाठी ही फायदेशीर आहे.”
गोमूत्रापासून भारतात तयार होणारी उत्पादने
राज्यात गोमूत्रापासून विविध उत्पादनांची निर्मिती करणारे अनेक प्रकल्प आहेत. नागपूर मधल्या देवलापार प्रकल्पामध्ये गोवऱ्या, गोमूत्र अर्क, गोमूत्र आसव, पंचगव्य, दंतमंजन, धूपबत्ती, केशतेल, शांपू, फेस पावडर अशी वेगवेगळी 45 ते 47 उत्पादनं तयार केली जातात. देवलापूर प्रमाणे, राज्यातल्या इतरही भागात गोमूत्र केंद्र आहेत. या केंद्रातही विविध उत्पादन तयार केली जातात.
पंचगव्य
गाईचं शेण, गोमूत्र, तूप, दूध आणि दही या गाईपासून मिळणाऱ्या पाच वस्तुंनी पंचगव्य तयार केलं जातं. अनेकदा मंदिरामध्ये किंवा घरातही धार्मिक विधीच्याआधी शरीरशुद्धीसाठी म्हणून दिलं जातं. यातील पाचही घटकांमध्ये असलेल्या पौष्टिक मूल्यांमुळे शरीराला खूप चांगले फायदे मिळतात.
तसंच या पंचगव्यमध्ये शिजवलेली केळी, गुळ आणि नारळाचं पाणी मिसळून त्याचा उपयोग शेतामध्ये, पशोत्पादनात, पोल्ट्री फार्म, मत्स्योत्पादनामध्ये केला जातो. बकरी, गाई यांच्या वयोमानानुसार त्यांच्या चाऱ्यामध्ये थोड्या प्रमाणात हे पंचगव्य मिसळल्यावर हे पशू रोगराईपासून दूर राहतात. त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यांच्या दुधामध्येही वाढ होते.
पिकावर हे पंचगव्य शिंपडल्यावर फळांची उत्पादकता आणि पोषकमूल्य वाढते. पिंकावर रोगांचा प्रादूर्भाव होत नाही.
जीवामृत
सेंद्रिय शेती करताना पिकांची उत्पादकता अधिकाधिक वाढावी यासाठी जीवामृताचा वापर केला जातो. जीवामृतामध्ये गाईचं मूत्र, शेण, गूळ किंवा गोड फळांचा चोथा, बेसन किंवा द्विदल डाळींचं पीठ (तेलबिया सोडून), शेतातली किंवा जंगलातली एक मुठभर माती वापरली जाते.
या जीवामृताचे अनेक फायदे आहेत. शेत जमीनीमध्ये सूक्ष्मजीवाणूंची निर्मिती करते. हे जीवामृत जंतूरोधक असतं. हे जीवामृत पिकांच्या पानांवर शिंपडल्यावर सुर्यापासून येणाऱ्या अतिनिल किरणांपासून या पानांचं संरक्षण होतं. तसंच पानांचा आकार वाढतो पर्यायाने उत्पादनातही वाढ होते. त्याचबरोबर हे जीवामृत शिंपडल्यामुळे कडक उन्हातही पिकांची पानं सुकत नाहीत. ती ताजीतवाने राहतात. याशिवाय पिकावर या जीवामृताचा वापर केल्यामुळे पिकांतील पोषकमूल्यातही वाढ होते.
गाईच्या मूत्रामध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल घटक असतात. त्यामुळे घरात गोमूत्र शिंपडल्याने घरातही स्वच्छता राहते. या अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल घटकांमुळे गोमूत्रापासून अनेक सौंदर्यप्रसाधनं आणि घराच्या स्वच्छते साठी लागणारी उत्पादनं तयार केली जातात.