गेल्या दोन दिवसापासून मणिपूरमध्ये पुन्हा तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. यामुळे संपूर्ण राज्यात पुन्हा सशस्त्र दल विशेष अधिकार कायद (अफ्स्पा) लागू केला आहे. इंटरनेट सुविधा बंद केली आहे. जागोजागी पोलिसांकडून आणि लष्करी पथकांकडून सर्च ऑपरेशन्स सुरू करण्यात आली आहेत.
लष्करांनी हिंसाचार सुरू झालेल्या जिरीबाम आणि आजूबाजूच्या परिसरात 107 हून अधिक चेकपोस्ट उभे केले असून संशयित व्यक्तिंना ताब्यात घेतलं आहे. संपूर्ण राज्यात कडक बंदोबस्त ठेवला आहे.
हिंसाचाराचं कारण काय?
गेल्या दीड वर्षापासून मणिपूर मध्ये हिंसाचार सुरू आहे. मैतई आणि कुकी या दोन समाजातला वाद हा पूर्णपणे शमला नाहीये. अधूनमधून आंदोलने, जाळपोळीच्या घटना घडत आहेत.
सोमवार 11 नोव्हेंबर रोजी बोराबोक्रो इथे दहशतवादी हल्ल्याची घटना घडली. या घटनेत 11 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश मिळालं. पण दहशतवाद्यांनी माघार घेताना पोलिस स्थानकाजवळच्या मदत शिबिरातून तीन महिला आणि तीन मुलांचं अपहरण केलं.
त्यानंतर गुरूवारी 14 नोव्हेंबर रोजी, जिरीबाम इथल्या जिरी नदीत अपहरण केलेल्यां पैकी एक महिला आणि दोन मुलं असे एकूण तीन मृतदेह आढळले. त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं.
या घटनेतील आरोपींना दोन दिवसात शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी दोन दिवसाचा अल्टीमेटम दिला होता.
16 नोव्हेंबरला या घटनेच्या निषेधापोटी आंदोलन आयोजीत केलं होतं. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी इंफाळ घाटीतल्या सहा आमदार आणि तीन मंत्र्यांच्या घरावर हल्ला केला. घरांसमोरील वाहनांची जाळपोळ केली. या दरम्यान, मुख्यमंत्री एन.बिरेन यांच्या खाजगी घरावरही या आंदोलनकर्त्यांनी हल्ला चढवला.
आंदोलनकर्त्यांवरील कारवाई
या घटनेप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 32 पिस्तूलं, 7 राउंड आणि 8 मोबाईल्स जप्त केले आहेत. आंदोलकांना पांगवण्यासाठी लष्करांनी दोन-तीन वेळा अश्रुधुरांचा वापर केला आहे. यामध्ये 8 जण जखमी झाले आहेत.