भारतामध्ये अनेक प्राचीन संस्कृतींचा उदय झाला आहे. याचे अनेक संदर्भ हे वेगवेगळ्या देशातील संशोधक, अभ्यासक आणि साहित्यिकांच्या ग्रंथातून आपल्याला पाहायला मिळतात. जगातील उत्क्रांती इतिहासामध्ये सातत्याने अभ्यास आणि संशोधन सुरू आहे. या अभ्यासातूनच संशोधकांनी असं मत मांडलं आहे की, जगात लोह युगाची सुरुवात ही भारतातल्या दक्षिणेकडील तामिळनाडू इथून झाली असावी. यापूर्वी जगातल्या लोह युगाच्या सुरुवातीविषयी जी माहिती सांगितली जाते, त्याच्याही हजारो वर्षांपूर्वी हे लोहयुग अस्तित्वात असणार, अशी शक्यता या शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.
तुतीकोरीनमध्ये आढळले प्राचीन लोह भांड्यांचे अवशेष
तामिळनाडूमधल्या तुतीकोरीन जिल्ह्यामध्ये जमिनीत पुरलेले कोळसा आणि लोहापासून तयार केलेल्या वस्तुंचे अवशेष उत्थखननांमध्ये आढळले आहेत. हे अवशेष इसवी सन पूर्व 3,345 आणि इसवी पूर्व 3,259 काळातील आहेत. यावरुन लोह युग हे जगातलं सर्वात प्राचीन युग होतं, असा दावा संशोधकांनी केला आहे.
हिट्टाइट साम्राज्यांमध्ये लोह धातूचा वापर
यापूर्वी तुर्कस्तानातल्या हिट्टाइट साम्राज्याने जगात लोखंडाचा पहिला वापर केला असं मानलं जात होतं. लोखंड या धातुचा शोध, तो नैसर्गिक धातू असल्याने त्याची उपलब्धता आणि त्यापासून जीवनावश्यक वस्तु तयार करणे अशा सगळ्या गोष्टी या लोह युगाशी संबंधित आहेत. मराठी विश्वकोषाच्या संदर्भानुसार, तत्कालीन मध्य आशियामध्ये इजिप्त, मेसोपोटेमिया म्हणजे आजचा इराण, इराक, सिरीया, तुर्कस्तानातील काही भागात लोह धातू आढळून आला होता. मात्र, दैनंदिन आयुष्यामध्ये या धातुचा वापर कसा करावा, त्यापासून वस्तू कशा बनवाव्यात याचे उत्तम ज्ञान हे हिट्टाइट साम्राज्यातील लोकांना होतं. त्यामुळे हिट्टाइट आणि लोह युगाचा परस्पर संबंध मानला जातो. मात्र, हिट्टाइट साम्राज्याच्या अस्तानंतर या भागात लोह ऐवजी कांस्य (ब्रॉंझ) धातूचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला.
भारतातील लोह धातूचा वापर
भारतात इसवी सन पूर्व चौथ्या शतकापर्यंत लोखंडाबद्दल काहीच माहित नव्हतं, असा समज विसाव्या शतकापर्यंत प्रचलित होता. मात्र, भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये लोखंड या शब्दाचं अस्तित्व आढळून येतं. ऋग्वेदात ‘अयस्’ असा शब्द आहे. हा शब्द लोखंडाला अनुसरुन आहे याविषयी काही अभ्यासकांचे दुमत आहे. संस्कृत भाषेत मुंड या शब्दाचा अर्थ लोह असा होतो. तरिही या कालखंडात लोह धातू संबंधित वस्तू उत्खननात आढळल्या नव्हत्या.
अलीकडे उज्जैन आणि हस्तिनापूर येथे लोखंडी वस्तू मिळाल्या आहेत. हस्तिनापूर येथे उत्खननात इसपू 1100 ते 800 या काळातील अवशेषांच्या वरच्या थरांमध्ये लोखंड मिळालं आहे. तर उज्जैन येथे भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागातर्फे सन 1955 ते 1958 दरम्यान केलेल्या विस्तृत उत्खननांमध्ये इतर वस्तूंबरोबर लोखंडी हत्यारे आणि कच्चे लोखंड मोठ्या प्रमाणावर आढळलं आहे. यावरून इसपू सहाव्या शतकात लोखंडाचा वापर होता, हे सिद्ध झालं.
साहजिकच भारतात इसपू 800 किंवा त्या आधीही लोखंडाचा वापर असावा, असं पुरातत्त्व अभ्यासकांचं मत झालं. ऋग्वेदातील अयस् शब्दाचा वापर आणि उत्खननात लोखंडाच्या वापराची प्राचीनता दर्शविणारा पुरावा या दोन्हींवरून भारतात आर्यांनी लोखंडाचा वापर सुरू केला असावा, हे मत आता मांडले जातं.
भारतात लोह युगाची सुरुवात तामिळनाडूतूनच, सरकारचा दावा
पुरातत्व खात्याच्या नविन माहितीनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी आनंद व्यक्त केला आहे. 5,300 वर्षापूर्वी तामिळनाडू भूमीत लोह युगाची सुरुवात झाली आहे. हे अभ्यासातून पुराव्यासकट सिद्ध झालं आहे असं म्हणत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
लोह युग आणि सिंध संस्कृती एकत्र नांदत होती?
या संशोधनानंतर अभ्यासकांनी असा दावा केला आहे ही, ज्यावेळी भारतात दक्षिणेकडील राज्यात लोह युग होतं, त्याचवेळी भारताच्या उत्तरेकडील आणि उत्तर-पूर्वेकडील प्रांतात सिंध संस्कृती अस्तित्वात होती.
तामिळनाडूतील के राजन आणि आर शिवानाथन यांनी यासंदर्भात रिसर्च पेपर प्रकाशित केला आहे. ‘अँटिक्विटी ऑफ आयर्न : रिसेंट रेडिओमेट्रिक डेट्स फ्रॉम तामिळनाडू’ असं या रिसर्च निबंधाचं नाव आहे. ज्यावेळी उत्तरेकडील प्रांतातील सिंधू संस्कृतीमध्ये तांब्याचा वापर केला जायचा. त्यावेळी कदाचित तांबे हा धातू मुबलक प्रमाणात उपलब्ध नसावा म्हणून दक्षिणेकडील लोकांनी लोहचा वापर सुरू केला असावा.
दरम्यान, तामिळनाडूमध्ये पुरातत्त्व खात्याकडून करण्यात आलेल्या या उत्खननात मिळालेल्या वस्तूंपैकी 90 टक्के वस्तू या सिंधू संस्कृतीतील वस्तूंशी मिळत्याजुळत्या आहेत.
या नवीन वस्तूंच्या शोधामुळे भारतात अस्तित्वात असलेली सिंधू संस्कृती ही केवळ उत्तरेकडील प्रांतापुरती मर्यादित नसून ती देशभरात पसरलेली होती हे स्पष्ट होतं, असं मत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे माजी संचालक राकेश तिवारी यांनी व्यक्त केलं आहे.