भारत आणि रशिया यांच्यातील व्यापार 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलरवर पोहोचेल, अशी माहिती भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सोमवारी, 11 नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या भारत-रशिया व्यापार फोरममध्ये दिली. सध्या दोन्ही देशांमधील व्यापार 66 अब्ज डॉलर आहे आणि यंदा जुलैमध्ये झालेल्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत दोन्ही देशांनी हे महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठरवलं होत.
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितले की, व्यापारातील असंतुलन दूर करण्यासाठी निर्यात-आयात प्रक्रियेतील अडथळे लवकर सोडवण्याची आवश्यकता आहे. भारत आणि रशिया यांच्यातील आर्थिक भागीदारी दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरेल, कारण भारताच्या व्यापार क्षेत्रात दरवर्षी 8% वाढ होण्याचा अंदाज आहे, तर रशियाकडे नैसर्गिक संसाधने आणि तंत्रज्ञान आहे.
रशिया व भारताने आपल्याच देशाच्या चलनात व्यापार करण्याची आवश्यकता असल्याचं मंत्री जयशंकर म्हणाले. “सध्याच्या परिस्थितीत, राष्ट्रीय चलनात व्यापार करणे महत्त्वाचे आहे. व्हॉस्ट्रो खाते हा यातील एक प्रभावी उपाय आहे,” असं ते म्हणाले, यामुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांना फायदा होईल.
भारत-रशिया व्यापार संबंध
मुंबईतील इंडिया-रशिया बिझनेस फोरममध्ये रशियाचे पहिले उपपंतप्रधान डेनीस मांट्युरोव्ह हे देखील उपस्थित होते, जे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमात भारतातील उद्योग व्यापार मंडळांनी सहभाग घेतला. हा कार्यक्रम दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध वाढवण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो.
जयशंकर यांनी पुढे सांगितले की, आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर (INSTC), चेन्नई-व्लादिवोस्तोक सागरी कॉरिडॉर (CVMC) आणि उत्तर सागरी मार्ग (NSR) या तीन प्रमुख कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर्सचा विकास सुरू आहे. हे मार्ग दोन्ही देशांमधील लॉजिस्टिक नेटवर्क्स मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.
रशियाचे ‘मेक इन इंडिया’ कडे वाढते लक्ष
रशियाकडून मेक इन इंडियाचे कौतुक होत असल्याचं मंत्री जयशंकर यांनी सांगितले. हा कार्यक्रम आपल्या दोन देशांदरम्यानचे व्यापारिक संबंध मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टर्निंग पॉइंट ठरेल. यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये, विशेषतः तंत्रज्ञान, औद्योगिकीकरण आणि निर्यात क्षेत्रात, अनेक संधी निर्माण होतील. भारतीय कंपन्यांना अधिकाधिक व्यावसायिक आणि औद्योगिक संधी प्राप्त होतील असंही ते म्हणाले.
आगामी IGC बैठक
भारत आणि रशिया यांच्यातील इंटर-गव्हर्नमेंटल कमिशन (IGC) ची बैठक मंगळवारी, 12 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये होणार आहे. या बैठकीत दोन्ही देशांच्या व्यापार, आर्थिक सहकार्य आणि सांस्कृतिक संबंध सुधारण्यासाठी चर्चा होईल. मुख्यतः भारतीय रुपया आणि रशियन रुपलने (रुबल) यामध्ये व्यापाराच्या संधी, तसेच वंदे भारत ट्रेन प्रकल्प, कनेक्टिव्हिटी आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यावरही चर्चा होईल.
रशिया आणि भारत यांच्या व्यापारी संबंधांचे भविष्य आणखी घट्ट करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.