पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यामुळे भारत आणि फ्रान्स देशांमधील संबंध अधिक मजबूत झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदी यांनी 12 फेब्रुवारी 2025 रोजी दक्षिण फ्रान्समधील कॅडेराचे इथे जगातील सर्वात प्रगत फ्यूजन एनर्जी न्यूक्लियर रिअॅक्टरची पाहणी केली. कॅडेराचे इथेच शास्त्रज्ञ पृथ्वीवर एक छोटा सूर्य तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रकल्प जागतिक स्तरावर अणू ऊर्जा संशोधनात महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. भारत या प्रकल्पाचा महत्त्वाचा भागीदार देश आहे.
‘कृत्रीम सूर्य’ तयार करण्याचा प्रयत्न
‘मिनी सन’ हा फ्रान्सचा ITER प्रकल्प चर्चेत आहे. अमेरिका, जपान, युरोपियन युनियन, रशिया, चीन, भारत आणि दक्षिण कोरिया असे 30 पेक्षा जास्त देश मिळून या प्रकल्पावर काम करत आहेत. ज्याप्रमाणे सूर्य आणि इतर ताऱ्यांमध्ये न्यूक्लिअर फ्यूजन होऊन ऊर्जा तयार होते, त्याच पद्धतीने पृथ्वीवरही ऊर्जा तयार करायची हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. सूर्यामध्ये ही प्रक्रिया नैसर्गिकरित्या होते. पण, पृथ्वीवर ती करणे खूप कठीण आहे. मात्र शास्त्रज्ञ खूप मेहनत घेऊन यावर काम करत आहेत. जर हे शक्य झाले, तर आपल्याला खूप जास्त ऊर्जा मिळेल. आणि ती ऊर्जा नैसर्गिक इंधनासारखी पर्यावरणाला हानिकारक नसेल, तसेच न्यूक्लिअर फ्यूजनमुळे कचराही तयार होणार नाही.
ITER चे प्रमुख बर्नार्ड बिगोट यांच्या म्हणण्यानुसार, “आपण पृथ्वीवर एक छोटा कृत्रिम सूर्य तयार करत आहोत. हा सूर्य कधीच मावळणार नाही. याचा अर्थ ITER मुळे आपल्याला कधीही न संपणारी आणि सुरक्षित ऊर्जा मिळेल “
भारताचा सहभाग आणि महत्त्वाचे योगदान
2005 पासून भारत या प्रकल्पाचा भाग असून, आतापर्यंत या प्रकल्पासाठी 17,500 कोटी रुपये गुंतवले आहेत आणि यामध्ये 10% भागीदारी भारताची आहे. विशेष म्हणजे, भारत सरकारने याआधी कोणत्याही वैज्ञानिक प्रकल्पासाठी एवढा मोठा निधी दिला नव्हता.
भारताने या प्रकल्पात आर्थिक मदतीसह वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्य देखील केले आहे. गुजरातमधील लार्सन अँड टुब्रो (L&T) कंपनीने तयार केलेला रेफ्रिजरेटर हा या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा घटक आहे. क्रायोस्टॅट म्हणजे असे उपकरण ज्याद्वारे नमुने किंवा उपकरणांचे तापमान खूप कमी ठेवता येते. आणि जगातील सर्वात मोठ्या रेफ्रिजरेटरची निर्मिती भारतातच झाली असून, तो -193 अंश सेल्सियस तापमान राखण्यास सक्षम आहे. याशिवाय हीटिंग सिस्टम, कूलिंग वॉटर सिस्टम, पॉवर सप्लाय असे अनेक भागही भारतातच बनले आहेत. म्हणूनच, ITER चे मुख्य वैज्ञानिक डॉ. टिम लूस यांनी भारताला ‘खूप महत्त्वाचा भागीदार’ असल्याचं म्हटले आहे.
ITER प्रकल्पाच्या प्रगतीतील अडचणी
ITER प्रकल्पाच्या पूर्णतेस उशीर झाला असून, सुरुवातीला 2020 पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र, आता हा प्रकल्प 2039 पर्यंत तरी सुरू होण्याची शक्यता कमी आहे. प्रकल्पाच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. सुरुवातीला 22 अब्ज डॉलर्स खर्च अपेक्षित होता, पण आता तो 65 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
भारताची अणुऊर्जा विकासाची योजना
भारतामध्ये अणुऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढवणार आहे. सध्या भारताची अणुऊर्जा क्षमता 8,180 मेगावाट आहे, जी 2031-32 पर्यंत 22,480 मेगावाट आणि 2047 पर्यंत 1,00,000 मेगावाटपर्यंत वाढवण्याचा सरकारचा विचार आहे.
यासाठी सरकार ‘नवीन अणुऊर्जा मोहीम’ सुरू करणार आहे. लहान अणुभट्ट्या (SMRs) बनवण्यासाठी 20,000 कोटी रुपये गुंतवले जाणार आहेत. तसेच 2033 पर्यंत कमीत कमी पाच SMRs सुरू करण्याचे सरकारचे ध्येय आहे.
अणुऊर्जा क्षेत्रात भारत सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण सहभागामुळे, जगात भारताची भूमिका अधिक मजबूत होत आहे. ITER प्रकल्पाच्या यशस्वीतेमुळे, भारताला स्वच्छ, शाश्वत आणि कधीही न संपणारी ऊर्जा मिळण्याची शक्यता आहे. तसेच, भारत या तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करू शकेल.