नेहरू-गांधी घराण्यातील भाऊ-बहिणीची दुसरी जोडी संसदेत

Priyanka Gandhi In Parliament : 1951ते 1953 पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांची बहिण विजयालक्ष्मी पंडित या भावाबहिणीची जोडगोळी संसदेमध्ये काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करत होते. आज 71 वर्षानंतर लोकसभेत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे भाऊ-बहिण एकत्र काम करणार आहेत.
[gspeech type=button]

काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी वायनाड मतदारसंघाच्या खासदार म्हणून गुरूवारी संसदेत शपथ घेतली. संविधानाची प्रत हातात घेऊन त्यांनी संसदेत प्रवेश केला. आतापर्यंत पक्षाचचं काम करणाऱ्या प्रियंका गांधी आपल्याला आता राहुल गांधी यांच्यासोबत संसदेतही दिसणार आहेत. त्या नेहरू – गांधी कुटुंबातील खासदारकीचं पद भूषवणाऱ्या सोळाव्या सदस्या आहेत. यासोबतच आणखीन एका घटनेची पुनरावृत्ती होत आहे. ती म्हणजे भाऊ-बहिण दोघंही एकत्र संसदेत असणं. 

1951ते 1953 पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांची बहिण विजयालक्ष्मी पंडित या  भावाबहिणीची जोडगोळी संसदेमध्ये काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करत होते. आज 71  वर्षानंतर लोकसभेत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे भाऊ-बहिण एकत्र काम करणार आहेत. 

पहिल्या लोकसभेत नेहरू आणि त्यांच्याशी संबंधीत पाच जण

पहिल्या लोकसभेमध्ये नेहरू परिवार आणि या परिवारासोबत निकटचे संबंध असलेले एकूण पाच सदस्य निवडून आले होते. पंडित जवाहरलाल नेहरू, नेहरू यांची बहिण विजयालक्ष्मी पंडित, फिरोज गांधी (इंदिरा गांधी यांचे पती), श्योराजवती नेहरू ( जवाहरलाल नेहरू यांच्या चुलतभावाची पत्नी) आणि उमा नेहरू (जवाहरलाल नेहरू यांच्या चुलत भावाची पत्नी) हे लोकसभा सदस्य होते. 

या निवडणुकीमध्ये विजयालक्ष्मी पंडित या लखनऊ जिल्हा  मध्य मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. मात्र, 1953 मध्ये त्यांना संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदावर निवडलं. या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. म्हणून त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. पुढे याच जागेवर श्योराजवती नेहरू या निवडून आल्या. 

दुसऱ्या लोकसभेमध्ये गांधी-नेहरू  सदस्यांमध्ये घट

दुसऱ्या लोकसभेमध्ये गांधी-नेहरू कुटुंबातील केवळ तीनच सदस्य हे निवडणुकीत निवडून आल्याने लोकसभेत पोहोचू शकले. जवाहरलाल नेहरू हे फूलपूर लोकसभा मतदारसंघांतून विजयी झाले. उमा नेहरू या सीतपूर लोकसभा जिंकल्या तर फिरोज गांधी हे रायबरेलीतून विजयी झाले. मात्र, 1960 मध्ये त्याचं निधन झाल्याने ते हा दुसऱ्या लोकसभेचा कार्यकाल पूर्ण करु शकले नाहीत. 

तिसऱ्या लोकसभेत गांधी- नेहरू परिवारातील केवळ एकच सदस्य

तिसऱ्या लोकसभेच्या 1962 साली निवडणुका झाल्या. या निवडणुकीत फक्त पंडित जवाहरलाल नेहरू हेच या परिवारातून लोकसभेत विजयी झालेले. मात्र, 1964 साली त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ही जागाही रिक्त झाली, पुढे पोटनिवडणुकीतून पंडित जवाहरलाल नेहरू यांची बहिण विजयालक्ष्मी पंडित यांनी या फूलपूर मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. 

चौथ्या लोकसभेत इंदिरा गांधी यांचा लोकसभेत प्रवेश

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर इंदिरा गांधी या राज्यसभेच्या सदस्या होत्या. 

मात्र, 1967 साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांनी लोकसभेत प्रवेश केला. त्या रायबरेली मतदारसंघातून विजयी झालेल्या. तर फुलपूर मतदारसंघातून विजयालक्ष्मी पंडित यांनी आपली जागा कायम ठेवली होती. 

1971 मामी – भाची लोकसभेत

1971 सालच्या निवडणुकीत इंदिरा गांधी या रायबरेलीतुन विजयी झाल्या.  तर इंदिरा गांधी यांच्या मामी शीला कौल यांनी लखनऊ मतदारसंघातून विजयी होत लोकसभा सदस्य पद भूषवलं होतं.  

आणिबाणीकाळात नेहरू-गांधी कुटुंबाचा पराजय

आणिबाणीच्या काळानंतर सहाव्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत गांधी-नेहरू कुटुंबातील किंवा या कुटुंबाशी संबंधित असलेले कोणतेच नेते लोकसभेत विजयी झाले नाहीत. इंदिरा गांधी यांचा मुलगा संजय गांधी हे पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिले होते.  मात्र, त्याचाही पराभव झाला. पण ही परिस्थिती जास्त काळ राहिली नाही. 1978 मध्ये कर्नाटकच्या चिकमंगळूर मतदारसंघातून इंदिरा गांधी पोटनिवडणूक लढत लोकसभेत पोहोचल्या. याच निवडणुकीत इंदिरा गांधी यांना ‘अम्मा’ ही नवीन ओळख मिळाली. या निवडणुकीनंतर त्यांच्या राजकीय भूमिकेलाही नविन कलाटणी मिळाली. 

1980 आई आणि मुलगा दोघंही संसदेत

1980 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये संजय गांधी पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे गेले. यावेळेस त्यांना यश मिळालं. अमेठी मतदारसंघातून त्याचा विजय झाला. तर रायबरेली आणि आंध्रप्रदेशातील मेंडक मतदारसंघातून इंदिरा गांधी यांचा विजय झाली. आई-लेकाची जोडी लोकसभेत पोहोचली. मेंडक येथली जागा इंदिरा गांधी यांनी सोडल्याने तेथे पोटनिवडणूक झाली. त्यामुळे नेहरू कुटुंबातील उमा नेहरू यांचा नातू अरुण नेहरू विजयी झाला. इंदिरा गांधी यांच्या मामी शीला कौल यासुद्धा या लोकसभेत होत्या. अशाप्रकारे एकूण चार जण या लोकसभेत सामिल होते. 

मात्र, हा आनंद जास्त काळ टिकला नाही. कारण निवडणुका संपल्यानंतर काहीच महिन्यामध्ये संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. संजय गांधी याच्या मृत्यूपश्चात राजीव गांधी यांनी राजकारणात प्रवेश करत अमेठी पोटनिवडणूक लढवली आणि लोकसभेत प्रवेश मिळवला. 

मात्र, चार वर्ष पूर्ण होताच म्हणजे 1984 साली इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली. 

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळालं. या लोकसभेत राजीव गांधी अमेठी, शीला कौल लखनऊ आणि अरुण नेहरू रायबरेली मतदारसंघातून विजयी होत लोकसभेत दाखल झाले.  

1989 गांधी कुटुंबातील सदस्य जनता दलाचे खासदार 

1989 सालच्या निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातून राजीव गांधी आणि शीला कौल हे विजयी झाले होते. तर अरुण गांधी यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत जनता दल पक्षाकडून बिल्हौर मतदारसंघातून विजयी झाले. याहूनही महत्त्वाचं म्हणजे इंदिरा गांधी यांची सून मनेका गांधी या ही जनता दल पक्षाकडून निवडणूक लढवत लोकसभेत पोहोचल्या. 

1991 राजीव गांधी यांची हत्या आणि लोकसभा निवडणुका

1991 मध्ये लोकसभा निवडणूक प्रचारा दरम्यानच राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. याचे पडसाद  निवडणुकीवरही पडले. निवडणुकीचा फॉर्म भरण्याची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यामुळे राजीव गांधी यांची जरी हत्या झाली असली तरी ते अमेठीचे उमेदवार होते. ते हयात नसूनही जनतेंनी त्यांना मतं दिली. या मतदारसंघातून त्यांचा विजय झाला. त्यामुळे पुन्हा पोटनिवडणूक घ्यावी लागली. या ही खेपेला इंदिरा गांधी यांची मामी शीला कौल हिने आपला बालेकिल्ला राखला होता. 

गांधी कुटुंबातले पण अपक्ष खासदार – मनेका गांधी

1996 ते 1998 या अल्प काळातील लोकसभेमध्ये गांधी कुटुंबातून फक्त एकच सदस्य लोकसभेत होत्या, त्या म्हणजे मनेका गांधी. मनेका गांधी यांनी 1996 मध्ये जनता दल पक्षाकडुन निवडणूक लढवली होती. तर 1998 मध्ये त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत लोकसभेत गेल्या. 

सोनिया गांधी यांचा राजकारणात प्रवेश

1999 च्या लोकसभा निवडणुकीपासून राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया गांधी यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी अमेठी आणि कर्नाटकमधील बेल्लारी या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली. या दोन्ही मतदारसंघातून त्या विजयी झाल्या. त्यांनी बेल्लारीची जागा सोडली.  तर मनेका गांधी या तिसऱ्यांदा पिलभीत मतदारसंघातून अपक्ष म्हणून जिंकत लोकसभेत पोहोचल्या. 

2004 मध्ये राहुल गांधी हे अमेठी, सोनिया गांधी या रायबरेली मतदारासंधातून जिंकत लोकसभा सदस्य बनले. तर मनेका गांधी यांनी भाजपा पक्षाकडून निवडणूक लढवत विजयी झाल्या. 

2009 मध्ये मनेका गांधी यांचा मुलगा वरुण गांधी यांनी राजकारणात प्रवेश केला. पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवत वरुण गांधीही लोकसभा सदस्य बनले. अशाप्रकारे काँग्रेसकडून गांधी कुटुंबातील सोनिया गांधी आणि राहुल गांधी तर भाजपाकडुन गांधी परिवारातील मनेका गांधी आणि वरुण गांधी अशी आई-लेकाची जोडी संसदेत दिसू लागली. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही हे चित्र कायम राहिलं. 

दरम्यान,  2024 च्या लोकसभा निवडणूकीत हे चित्र बदललं. आत्तापर्यंत गांधी कुटुंबातील चार जण तरी लोकसभेत असायचे. मात्र, या निवडणुकीत केवळ राहुल गांधी हेच रायबरेली आणि वायनाड या दोन मतदारसंघातून विजयी होत लोकसभेत कार्यरत होते. वायनाडची जागा राहुल गांधी यांनी सोडल्याने त्याठिकाणी पोटनिवडणूक झाली. प्रियंका गांधी यांनी ही जागा लढवली. तिथून विजयी होत त्यांचाही लोकसभेत प्रवेश झाला. आणि अशा रीतीने स्वातंत्र्यापासून नेहरू-गांधी आणि नातेवाईक घराण्यातून संसदेत जाणाऱ्या संख्या 15 वर पोहोचली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Stubble Burning : ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यामध्ये पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश राजस्थान या राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकचरा पेंढा जाळला जातो. यामुळे
Sunday holiday: ब्रिटिश सरकारने मागण्या नाकारल्यावर लोखंडे यांनी देशभरात मोठं आंदोलन केलं. त्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या, मोर्चे काढले आणि
Passport rules: भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टच्या नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या बदलामुळे आता पती-पत्नीला त्यांच्या पासपोर्टमध्ये एकमेकांचं नाव

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ