महाराष्ट्रामध्ये वसुबारसपासून दिवाळी सणाला सुरुवात होते. या दिवशी गोमातेची तिच्या वासरांची पूजा करतात. उत्तर भारतात मात्र, लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी गाई-वासरांची पूजा केली जाते. या सणाला गोवर्धन पूजा असं म्हणतात. कार्तिक महिन्यात बलिप्रतिपदेच्या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते.
उज्जैनमधली अनोखी परंपरा
गोवर्धन पूजेच्या दिवशी मध्यप्रदेश इथल्या उज्जैन जिल्ह्यातल्या भिडावद गावामध्ये अनोखी परंपरा जोपासली जाते. या गावात गोवर्धन पूजेच्या दिवशी सर्व भक्त हे जमिनीवर पालथे झोपून राहतात आणि त्यांच्या अंगावरुन गाई चालत जातात. अंगावरून गायी चालत गेल्याने गोमातेच्या आशिर्वादासह आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात, असा विश्वास स्थानिकांमध्ये आहे.
या पूजेसाठी भक्तगण पाच दिवसापासून उपवास करतात. दररोज रात्री मंदिरात भजन-किर्तन गायली जातात. त्यानंतर बलिप्रतिपदेच्या दिवशी पहाटे गायींची विधीवत पूजा केली जाते. गायींची पूजा झाल्यावर मुख्य दारापाशी सर्व भक्तगण पालथे झोपून राहतात. त्यांच्या अंगावरुन गायींना चालवलं जातं. तर दुसरीकडे ढोल-ताशांच्या आवाजासह मंत्रांचं पठण केलं जातं.
#WATCH | Madhya Pradesh: In a unique tradition in the village of Bhidadwad in the Ujjain district, devotees allow cows to walk over them. The tradition is observed on Govardhan Puja, the second day of Diwali. pic.twitter.com/sHFDr2TKNL
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) November 2, 2024
का करतात गोवर्धन पूजा?
अशी आख्यायिका आहे की, इंद्रदेवाने रागावून मथुरेमध्ये मुसळधार पाऊस पाडला. तेव्हा श्रीकृष्णाने गोकुळातील सर्व लोकांचं आणि गायींचं रक्षण करण्यासाठी संपूर्ण गोवर्धन पर्वत हा आपल्या एका हाताच्या करंगळीवर उचलून धरला. गोवर्धन पर्वताच्या खाली सर्वांनी आश्रय घेतला. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाची हानी झाली नाही. सगळे लोक आणि गायी सुरक्षित राहिल्या. या प्रसंगातून इंद्रदेवाला श्रीकृष्णाच्या अगम्य शक्तीची जाणीव होते. त्यांना आपल्या कृतीचं वाईट वाटल्याने त्यांनी श्रीकृष्णाकडे क्षमा मागितली. या प्रसंगाचं स्मरण म्हणून दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते.
सोबतच भगवान श्रीकृष्ण, गायीचीही पूजा केली जाते. यानिमित्त घराच्या अंगणात पारंपारिक पद्धतीने गाईच्या शेणाने गोवर्धन पर्वताची प्रतिकृती काढली जाते व पूजा केली जाते.
अन्नकूट सण
गोवर्धन पूजेला अन्नकूट सण म्हणूनही संबोधलं जातं. यावेळी भगवान श्रीकृष्णाला पंचपक्वानाचा नैवेद्य दाखवला जातो. यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या, दूध आणि माव्याची मिठाई, भाताचे वेगवेगळे प्रकार आणि फळांचा समावेश असतो. या सर्व नैवेद्यापासून एक पर्वतासारखी प्रतिकृती तयार करुन ती श्रीकृष्णाना अर्पण केली जाते. त्यानंतर हे पदार्थ प्रसाद म्हणून शेजाऱ्यांना वाटतात.