भारत सरकार इथेनॉल उत्पादन वाढवण्यावर भर देत आहे. लवकरच पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्र करण्याचा सरकारचा मानस आहे. याआधी हे उद्दिष्ट 2026 पर्यंत पूर्ण करायचे ठरवण्यात आले होते पण आता दोन महिन्यांतच ते साध्य करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी देशात 1100 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन करणं लवकरच शक्य होणार आहे. यामुळे देशाची ‘ऊर्जा सुरक्षा’ वाढेल, तेल आयात कमी होईल तसेच शेतकऱ्यांनादेखील याचा फायदा होईल.
1100 कोटी लिटर इथेनॉल कुठून मिळणार?
भारताला 1100 कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे आणि यासाठी स्थिर पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सरकार अनेक स्रोतांमधून इथेनॉल तयार करण्याची योजना आखत आहे. साखर, उच्च प्रतीचा गहू, भारतीय अन्न महामंडळ (FCI) तांदूळ, मका आणि ज्वारी या धान्यांचा वापर इथेनॉल उत्पादनासाठी केला जाईल. तसेच डिस्टिलरीजची क्षमता देखील वाढवण्यात येत आहे.
साखर आणि काकवीपासून दरवर्षी 400 कोटी लिटर इथेनॉल मिळेल अशी अपेक्षा आहे तर, भारतीय अन्न महामंडळ (FCI) 110 कोटी लिटर इथेनॉल पुरवणार आहे. तुटलेला तांदूळ आणि मका वापरून सुमारे 400 कोटी लिटर इथेनॉल मिळू शकेल, असा अंदाज आहे.
सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमुळे आणि इथेनॉलच्या स्थिर आणि फायदेशीर बाजारपेठेमुळे, इथेनॉल उत्पादन क्षमता 1,600 कोटी लिटरपर्यंत वाढली आहे. सरकार विविध अनुदाने, प्रोत्साहने आणि पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीद्वारे पुरेशी उत्पादन पातळी सुनिश्चित करत आहे.
इथेनॉल उत्पादनासाठी साखर, तांदूळ आणि मक्याचा वाढता वापर
साखर उत्पादक संघटनेचे संचालक दीपक बल्लाणी यांच्या मते, यावर्षी साखर उत्पादनातून सुमारे 400 कोटी लिटर इथेनॉल मिळेल असा अंदाज आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये भारताकडे 80 लाख टन साखर शिल्लक राहिली होती तर पुढच्या वर्षी 315 लाख टनापर्यंत उत्पादन होऊ शकते. त्यामधून 40 लाख टन साखर इथेनॉलसाठी वापरली जाईल आणि इतर कामांसाठी लागणारे इथेनॉल ‘सी हेवी’ नावाच्या कमी प्रतीच्या मोलॅसिसपासून तयार होईल. ही साखर उत्पादनात वापरली जात नाही.
सरकारने डिस्टिलरीजना पुरवल्या जाणाऱ्या एफसीआय तांदळाची किंमत 28 रुपये किलोवरून 22.5 रुपये किलो केली आहे. यामुळे चालू वर्षात एफसीआय तांदळापासून सुमारे 110 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन शक्य होईल. याचा अर्थ मक्यापासून जवळपास 400 करोड लिटर इथेनॉल मिळेल.
2020 पर्यंत, भारताने मक्यापासून खूप कमी किंवा अजिबात इथेनॉल उत्पादन केले नाही. मात्र, आता मागणी वाढल्याने, इथेनॉल उत्पादनासाठी मका हा एक महत्त्वाचा कच्चा माल बनला आहे.
मका इथेनॉलसाठी कसा महत्त्वाचा ठरतोय?
इथेनॉल उत्पादनासाठी मका एक महत्त्वाचा घटक बनला आहे. त्यामुळे मक्याची लागवड आणि आयात वाढली आहे. सरकारने साखर आणि उच्च-गुणवत्तेच्या मोलॅसिसच्या वापरावर मर्यादा घातल्यामुळे, 2024 मध्ये मक्याची आयात वाढली आणि एप्रिल ते जून दरम्यान भारताने 100 कोटी रुपयांचा मका आयात केला.
इथेनॉलचं मार्केट चांगलं असल्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांनी भारतात मक्याची लागवड करायला सुरुवात केली आहे. तसेच प्रमुख मका उत्पादक राज्यांमध्ये कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, राजस्थान, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश होतो.
2024-25 इथेनॉल वर्षात 42 दशलक्ष टन मक्याचे उत्पादन अपेक्षित आहे, त्यापैकी 9 दशलक्ष टन मका इथेनॉल उत्पादनासाठी राखीव ठेवण्यात आले आहे, असं लुधियानातील ICAR इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेझ रिसर्चचे संचालक एच. एस. जाट यांनी सांगितलं.
इथेनॉल मिश्रणाचे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे
इथेनॉल मिश्रणाचे अनेक आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे आहेत. भारत दरवर्षी 10.5 लाख कोटी रुपयांचे कच्चे तेल आयात करतो. इथेनॉल मिश्रणामुळे, जर आपण 100 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन केले, तर 6000 कोटी रुपयांची बचत होऊ शकते. दुसरे म्हणजे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते. इथेनॉलची मागणी वाढत असल्यामुळे, शेतकरी मका लागवडीकडे वळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांपेक्षा जास्त उत्पन्न मिळत आहे. तिसरा फायदा म्हणजे, इथेनॉल एक स्वच्छ इंधन आहे. हे कार्बन उत्सर्जन कमी करते. यामुळे भारताच्या हवामानासंबंधी उद्दिष्टांना आणि ऊर्जा सुरक्षेला मदत होते. थोडक्यात, इथेनॉल वापरणे देशाला आर्थिक आणि पर्यावरणात्मकदृष्ट्या फायद्याचे आहे.