आजोळी गेल्यावर आपली आजी सगळ्या नातवंडाना लाडक्या नावाने बोलवते. सगळ्यांना थोडा थोडा खाऊ देते आणि त्यांच्याशी हसत खेळत वेगवेगळ्या गोष्टींवर गप्पा मारत असते. असं दृश्य हे मानवी नात्यांमध्ये पाहायला मिळतं. पण हेच दृश्य तुम्हाला एका आजीचं प्राण्यांसोबत पाहायला मिळालं तर!
हे स्वप्नवत नाही आहे. हे असं चित्र तुम्हाला अंदमान निकोबार बेटावरच्या पोर्टब्लेअर इथे अनुभवायला मिळेल.
पोर्ट ब्लेअरच्या ‘डीअर वूमन’
पोर्ट ब्लेअरपासून फेरीबोटीने 15 मिनिटांच्या अंतरावर रॉस आयलंड आहे. हे आयलंड आता नेताजी सुभाषचंद्र बोस या नावाने ओळखण्यात येतं. ब्रिटिशांच्या काळात या आयलंडवर येण्यास निर्बंध घातले होते. माणसांची वस्ती कमी असल्यामुळे या आयलंडला ‘घोस्ट आयलंड’ म्हणून ओळखलं जायचं. या आयलंडवर ब्रिटिशांचं ॲडमिन हेडक्वार्टर होतं.
या आयलंडवर आज 550 हरणं, 200 मोर, शेकडो खारु ताई आणि अन्य प्राणी आहेत. या सगळ्या प्राण्यांचा सांभाळ सरकार किंवा कोणी वनरक्षक करत नाही. तर या सगळ्या प्राण्यांची आजी ‘डीअर वूमन’ अनुराधा राव या करतात.
हरणांची आजी अनुराधा राव
अनुराधा राव यांना या आयलंडवर येणाऱ्या पर्यटकांनी ‘डीअर वूमन’ हे नाव दिलं आहे. कारण या आयलंडवर हरणांची संख्या खूप आहे. अनुराधा राव या घराबाहेर पडताच सगळी हरणं त्यांच्यासोबत फिरायला सुरुवात करतात. संपूर्ण दिवस त्या या हरणांच्या गराड्यात असतात.
या हरणांना खाऊ घालणं, त्यांच्याशी संवाद साधणं आणि चक्क हरणांमधील भांडणं सोडवणं, असं सगळं अनुराधा राव या एकट्याने सांभाळतात. हरणांशिवाय मोर आणि खारु ताईंसोबतही त्या खूप गप्पा मारतात. सगळ्या हरणांना त्या नावानिशी आवाज देतात. शिवाय कोणत्या हरणाचं वजन किती आहे, वय काय आहे हेही त्यांना ठाऊक आहे.
हरणांच्या खाण्या-पिण्याच्या सवयीची त्या काळजी घेतात. अनेकदा पर्यटक आपल्यासोबत आणलेला खाऊ हरणांना देऊ पाहतात. तेव्हा अनुराधा राव त्यांना थांबवत, हरणांच्या शरीराला मानवेल असा विशेष पाव त्या पर्यटकांना देतात. आणि तोच पाव त्या हरणांना खाण्यासाठी द्यायला सांगतात.
चार पिढ्यांपासून याच आयलंडवर वास्तव्य
अनुराधा राव या चार पिढ्यापासून या आयलंडवर राहत आहेत. त्यांच्या आई-वडिलांचे पूर्वज हे त्याकाळी इंग्रजाचे कैदी बनून इथे आले होते. कालांतराने राव यांचे पूर्वज भारत स्वातंत्र्य झाल्यावर याच आयलंडवर स्थिरस्थावर झाले. त्यांच्या माहितीनुसार इंग्रजांनीच या आयलंडवर हरणं आणली होती. भारत स्वातंत्र्य झाल्यावर इथून परत जाताना इंग्रजांनी ही हरणं इथेच सोडून गेले. त्यावेळी इकडे 25 हरणं होती. मात्र, पुढे इंडियन नेव्हीच्या मदतीने अनुराधा राव यांनी या हरणांची काळजी घेत त्यांना वाढवलं. आज या आयलंडवर तब्बल 550 हरणं आहेत.
आयलंडच्या टूरिस्ट गाईड
चार पिढ्यापासून अनुराधा राव यांचं कुटुंब या आयलंडवर राहत असल्याने त्यांना या आयलंड संदर्भात अनेक गोष्टी माहिती आहेत. या सर्व गोष्टी त्या इथे आलेल्या पर्यटकांना सांगत असतात.
त्या आयलंडवर असलेले ब्रिटिश कार्यालय, चर्च, स्मशानभूमी, ब्रिटिशकालीन नैसर्गिकरित्या फिल्टर होणारं स्विमिंगपूल, वृत्तपत्राचं कार्यालय, व्यावसायिक इमारत, दुकानं अशा अनेक ऐतिहासिक वास्तूंचं उत्तम प्रकारे जतन केलेलं आहे. या सर्व वास्तूंची माहिती राव या पर्यटकांना देत असतात. या संपूर्ण प्रवासात हरणांचा कळपही अनुराधा राव आणि पर्यटकांसोबत फिरत असतात. इथली हरणं ही चांगलीच माणसाळलेली आहेत.
हरणांचा हा मैत्रीपूर्ण अनुभव घेण्यासाठी अंदमान – निकोबारला फिरायला जाणारे सगळे पर्यटक आवर्जून या आयलंडला भेट देतात. त्यामुळे एकेकाळी घोस्ट आयलंड म्हणून प्रसिद्ध असलेलं हे आयलंड अलिकडे हरणांच्या सौदर्यांने आणि पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेलेलं असतं.