अमेरिकेत सत्तापालट झाल्यापासून रोज काहीनाकाही नवीन आदेश, नियम लागू होतात. अनधिकृत स्थलांतरीत नागरिकांनंतर अमेरिकेने आता अति प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांवरही बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेचे आरोग्य आणि मानव सेवा खात्याचे सचिव रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांनी या कारवाईला सुरुवात केली आहे.
गेल्या दशकभरापासून अन्नपदार्थ उद्योग क्षेत्राकडून मानवी आरोग्याला हानीकारक ठरतील अशा ज्या-ज्या गोष्टींचा, रसायनांचा वापर केला जातो अशां पदार्थांवर ‘जनरली रेकग्नाईस ॲज सेफ’ (GRAS) या कार्यक्रमांतर्गत कारवाई केली जाणार आहे.
या अन्नपदार्थांवर बंदी घालणं का आवश्यक आहे, याविषयी अमेरिकन सरकारची भूमिका केनेडी यांनी सिनेटमध्ये स्पष्ट केली. त्यावेळी ते म्हणाले की, या अन्नपदार्थ्यांच्या माध्यमातून आपण माणसांना विशेषत: लहान मुलांना विष देत आहोत. या अन्नपदार्थांमुळे स्थूलता (Obesity), मधुमेह (Diabetes), रोगप्रतिकार शक्ती संबंधित विकार (Autoimmune Disorders) या आजारांचं प्रमाण वाढलं आहे.
अमेरिकेमध्ये तयार होणाऱ्या अति-प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ्यांमध्ये 99 टक्के विविध रसायनांचा वापर केला जातो. या सगळ्या रसायनांच्या वापराला अन्न आणि केमिकल इंडस्ट्रीने हिरवा कंदील दाखवला असला तरी, सरकारी अन्न व औषधं विभागाने या रसायनांच्या वापरासाठी अधिकृत परवानगी दिलेलीच नाही आहे. हृदयविकार, स्मृतीभ्रंश, मधुमेह, स्थूलता या आजारांचं प्रमाण वाढण्यामागे घातक रसायनयुक्त प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ असल्याचं विविध अभ्यासातूनही स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ तयार करताना सर्व सुरक्षेसह सगळ्या घटकांची योग्य ती काळजी घेतली जाते, असा दावा अन्नपदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकांनी केला आहे.
अमेरिकेत 70 टक्के प्रक्रियायुक्त पदार्थांचा पुरवठा
केनेडी यांनी अमेरिकन नागरिकांच्या आरोग्यासाठी कितीही उत्तम निर्णय घेतला असला तरी, त्याची अंमलबजावणी प्रभावीरित्या करणं थोडं कठीण आहे. अशक्य नाही तर कठीण आहे. कारण अमेरिकेत आज अन्नपुरवठा क्षेत्रामध्ये 70 टक्के क्षेत्र हे प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांनी व्यापलेलं आहे. त्यामुळे या 70 टक्क्यांच्या जागी नवीन ताजं अन्न उपलब्ध करुन देणं, लोकांना याविषयी समज देणं, त्यांच्या सवयीत बदल आणणं, नवीन ताज्या अन्न पदार्थांची पुरवठा साखळी उभी करणं अशी अनेक नानाविध आव्हानं सरकार समोर उभी आहेत.
हे ही वाचा : 2020 मध्ये 19 करोडहून अधिक लोकांना ‘शुगर ड्रिंक्स’ प्यायल्याने मधुमेह !
हे अति-प्रक्रियायुक्त पदार्थ नेमके काय असतात?
प्रक्रियायुक्त पदार्थ म्हणजे मूळ पदार्थाला गोठवणं, त्याचा कीस पाडणं, त्याच्यावर किण्वन प्रक्रिया करणं, पाश्चरायझेशन किंवा तत्सम अन्य प्रक्रिया करुन तो पदार्थ दीर्घकाळासाठी टिकवून ठेवून कालांतराने त्याचा अन्न म्हणून उपयोग करणं. अन्नपदार्थावर विविध प्रक्रिया करण्याच्या पद्धतीला ‘नोवा फूड क्लासिफिकेशन’ असं म्हणतात. ब्राझील एपिडेमीओलॉजिस्ट कार्लोस मोन्टेंरिओ यांनी 2009 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा या टर्मचा वापर केला. अन्नपदार्थांमधील पोषकतत्वे आणि त्यावर केली जाणारी प्रक्रिया यानुसार पदार्थांचं वर्गिकरण होतं.
सहसा आपणही घरात पावसाळा किंवा अन्य ऋतूंसाठी काही अन्नपदार्थ साठवून ठेवत असतो. जसं की, लोणची, पापड, सुकी मच्छी वा अन्य पदार्थ. पण यासाठी आपण कोणताही कृत्रिम रंग किंवा अन्य रासायनिक प्रक्रियेचा वापर करत नाही. मात्र, बाजारपेठेमध्ये कृत्रिम रंग, रसायनांचा वापर करीत अनेक अन्नपदार्थ हे एकतर दीर्घकाळासाठी साठवले जातात किंवा रेडी टू इट म्हणून त्याचा उपयोग केला जातो.
यामध्ये बाजारात मिळणारे चीप्स पासून स्टोरेज फूड अशा विविध पदार्थ्यांचा समावेश होतो.
या अशा अन्नपदार्थांच्या किंमती या खूप कमी असतात. तसंच त्यांची चव ही कधी बदलत नाही. त्यामध्ये एकसमानता असते. एखादे चीप्स किंवा ज्यूस बनवताना त्यातलं मीठ, साखर, फॅट अशा सगळ्या घटकांचं प्रमाण एकसमान असतं. हे प्रमाण कधी बदलत नाही. या चवी अशा असतात की, आपण एखादं चीप्सचं पाकीट खायला सुरुवात केली की पोट भरलं असेल तरी ते खातंच रहावं असं वाटतं राहतं. इतकं ते ॲडिक्टीव्ह असतं.
दरम्यान, या पदार्थांवर प्रक्रिया कशी, कोणती केली जाते? तो नेमका काय पदार्थ आहे? यानुसार तो पदार्थ हितकारक आहे की अहितकारक हे ठरवता येत नाही. जसं की, तृणधान्यांपासून बनवलेला पाव, दुधापासून तयार केलं जाणारं योगर्ट, टोफू, लहान बाळांसाठी वापरली जाणारी दूध पावडर या गोष्टी पुन्हा पोषकतत्वे असलेली प्रक्रियायुक्त पदार्थ आहेत.
अतिप्रक्रिया केलेले अन्नपदार्थ हे आरोग्याला अपायकारक असतात का?
आपल्या आहाराचा आरोग्यावर परिणाम होतो, हे आजवर अनेक अभ्यासातून दिसून आलं आहे. मात्र, केवळ खाण्यापिण्यातूनच आरोग्यावर दुष्परिणाम होतो असंही नाही, असं संशोधक सांगतात. अति प्रक्रियायुक्त पदार्थांमध्ये मीठ, साखर आणि चरबीचं प्रमाण खूप जास्त असतं. तर फायबर आणि प्रथिनांचं प्रमाण हे तुलनेने कमी असते. तरी, अतिरिक्त मीठ, साखर आणि चरबी या तीन घटकांमुळेच आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो असं ठाम सांगता येत नाही.
हे ही वाचा : भारत बनला फ्रेंच फ्राइजचा सगळ्यात मोठा निर्यातदार!
ताजे अन्नपदार्थ आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्था संबंधित संशोधन
राष्ट्रिय आरोग्य संस्थेतील संशोधक हॉल यांनी यासंदर्भात एक संशोधन केलं. या संशोधनामध्ये 20 जणांचा समावेश होता. हे 20 जण पूर्ण 1 महिन्यासाठी राष्ट्रीय आरोग्य संस्थेमध्ये वास्तव्यासाठी होते. त्यांना एक महिन्यातील दोन आठवडे त्यांना अतिप्रक्रिया केलेलं अन्न खायला दिलं. तर दुसऱ्या दोन आठवड्यात ताजे अन्न खायला दिलं. या दोन्ही प्रकारच्या अन्नपदार्थांमध्ये खाण्याचं कोणतंच प्रमाण ठरवलेलं नव्हतं. संशोधनात सहभागी झालेल्यांना जितकं हवं तितकं खाण्याची त्यांना मुभा होती.
यामध्ये ज्या दोन आठवड्यात अतिप्रक्रिया केलेलं अन्न खाल्लं जायचं त्या दिवसात ही लोकं 500 कॅलरीजहून जास्त अन्न खात होते. या दोन आठवड्यामध्ये त्याचं एक किलो वजन वाढल्याचंही निदर्शनास आलं. ज्या दोन आठवड्यात या लोकांना ताजं अन्न खाण्यासाठी दिलं त्या दिवसात त्याचं 1 किलो वजन कमी झाल्याचं आढळून आलं. याविषयात संशोधक हॉल हे आणखीन तपशिलवार अभ्यास करीत आहेत. तर, हे अतिप्रक्रिया केलेले अन्नपदार्थ हे आरोग्याला घातक ठरणारे आहेत, याची कल्पना सगळ्यानाच आहे त्यामुळे हे पदार्थ टाळणे कदापी चांगलं आहे.
हे ही वाचा : ‘प्लांट-बेस्ड मांसा’च्या पर्यायांची वाढती लोकप्रियता
अति-प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थ नियमित करावे का?
अति-प्रक्रिया केलेले अन्नपदार्थांचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो हे दर्शवणारे अनेक संशोधन पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे या संशोधनानुसार सरकारने आणि या अन्न उद्योग क्षेत्राने यासंबंधीत योग्य धोरण तयार करणे अपेक्षित आहे. जसं की, साखरयुक्त पेयांवर अतिरिक्त कर लादणे, या पदार्थांतील मीठाचं प्रमाण ठरवून देणं आणि हे अन्नपदार्थ लहान मुलांना देण्यासंबंधित अधिकाधिक जनजागृती करणे असे बदल करता येणं शक्य आहे.
घरात अति-प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांचं प्रमाण कसं कमी करता येईल?
भारतीय संस्कृतीमध्ये ताजं शिजवलेल्या अन्नपदार्थ अधिकतर खाल्ले जातात. मात्र अलिकडे, वेळेच्या अभावी किंवा बदलत्या संस्कृतीनुसार राहण्यासाठी ‘रेडी टू इट’ पदार्थांचा वापर वाढलेला आहे. यामध्ये चीप्स, जंक फूड, कोल्ड्रींग्ज पासून सॉसेजेस, पॅटिस, तयार चपात्या अशा अनेक भारतीय आणि पाश्चिमात्य अन्नपदार्थांचा समावेश आहे. या ना त्या कारणाने असे पदार्थ खाण्याचं प्रमाणही वाढत आहे. अनेकदा या पॅकबंद अन्नपदार्थांमध्ये कोणते घटक आहेत, ते घरातील लहान वा आजारी व्यक्तींसाठी योग्य आहेत का हे तपासलं जात नाही.
वेळेचा अभाव जरी असला तरी भारतीय अन्नपदार्थामध्ये अनेक असे पदार्थ आहेत जे तयार करुन काही काळासाठी नैसर्गिक पद्धतीने साठवले जाऊ शकतात. अशा पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा. कमी वेळेत तयार होणाऱ्या पदार्थांची माहिती करुन घ्यावी. अनेक तृणधान्ये किंवा तत्सम गोष्टी भाजून किंवा त्यापासून मधल्या वेळेत खाता येतील, असे पदार्थ तयार करुन ठेवावेत किंवा तसे बाहेरुन करुन घ्यावेत. अशावेळी त्यामध्ये वापरली जाणारी साखर आणि मीठाचं प्रमाण तपासून घेणं आवश्यक आहे.