‘थाला’पती फॉर ए रिजन!

Thalapathy : जोसेफ विजय चंद्रशेखर, अर्थात चाहत्यांचा थलपती विजय. महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना रविवारी झालेल्या विजयच्या सभेनं तामिळनाडूत अक्षरशः धुमाकूळ घातला.
[gspeech type=button]

रविवार दिनांक 27 ऑक्टोबर 2024. स्थळ तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यातल्या विक्रवंडीइथलं मैदान. वेळ रणरणत्या उन्हात दुपारची. एका नव्याने स्थापन झालेल्या पक्षाची जाहीर सभा. 100 एकरांच्या मैदानात पाय ठेवायलाही जागा नाही. साधारण 2 लाख लोक या नव्या पक्षाच्या नव्या नेत्याला ऐकण्यासाठी जमले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. चौफेर घोषणाबाजी होतेय. जोश भरण्यासाठी गाणी वाजवली जातायत. जबरदस्त माहोल बनलाय. तेवढ्यात या गर्दीचा नेता अवतरतो. स्टेजवरून अभिवादन करतो. ते बघून समोरच्या लाखो लोकांचा उत्साह आभाळाला भिडतो. हा नेता स्टेजसमोरच्या रॅम्पवरून चालत येत लोकांमध्ये जातो. कार्यकर्ते उत्साहाच्या भरात गळ्यातले पक्षाचे गमछे नेत्याकडे भिरकावतात. तो नेताही हे सगळे गमछे एकत्र करत स्वतःच्या गळ्यात घालतो. गर्दीचे हात जोडून आभार मानतो. हे सगळं प्रेझेंटेशन झाल्यावर त्याचं पाऊण तासाचं आक्रमक भाषण होतं. या भाषणात चेन्नईपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांचीच चिरफाड केली जाते. ही सभा आहे ‘तमिळगा वेत्री कळघम’ या नव्या पक्षाची आणि हा नेता आहे टीव्हीकेचा संस्थापक आणि तमिळ चित्रपटांचा सुपरस्टार थलपती विजय!

जोसेफ विजय चंद्रशेखर, अर्थात चाहत्यांचा थलपती विजय. महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना रविवारी झालेल्या विजयच्या सभेनं तामिळनाडूत अक्षरशः धुमाकूळ घातला. या सभेच्या फोटो आणि व्हिडिओंनी अवघा सोशल मीडिया व्यापून टाकलाय. या सभेचं ऑन ग्राउंड नियोजन, मीडिया मॅनेजमेंट, जमलेली गर्दी, सभेचे फोटो वगैरे व्हायरल होणं हे बघितल्यानंतर विजय ‘ऑप्टिक्स’च्या खेळात यशस्वी झालाय हे तर निश्चित आहे. पण त्यासोबतच त्याने सेट करायला घेतलेले ‘नरेटिव्ह’ही तेवढेच महत्त्वाचे आहेत.

2 फेब्रुवारी 2024 ला विजयने आपल्या तमिळगा वेत्री कळघम अर्थात TVK या राजकीय पक्षाची स्थापना केली. पक्षाची राजकीय भूमिका आणि वाटचाल कशी असेल याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. हे सांगण्यासाठी 27 ऑक्टोबरला पक्षातर्फे ‘मन्नाडू’चं (म्हणजे तमिळमध्ये एकत्रित येणं, परिषद) आयोजन करण्यात आलं आणि या सभेत तमिळगा वेत्री कळघमची विचारधारा ही धर्मनिरपेक्ष आणि सामाजिक न्यायाची असल्याचं विजयने जाहीर केलं.

सभेच्या ठिकाणी प्रवेशद्वार आणि स्टेजवर लावलेले कटआऊट्सही बोलके होते. डावीकडे आंबेडकर, उजवीकडे पेरियार आणि या दोन महापुरुषांच्यामध्ये विजय. या माध्यमातून पक्षानं आपली वैचारिक बैठक स्पष्ट केलीय. यासोबतच तमिळ स्वातंत्र्यसेनानी अंजलाई अम्मल, ईस्ट इंडिया कंपनी विरोधात लढणाऱ्या राणी वेळू नाचियार, तामिळनाडूचे पहिले मुख्यमंत्री सी. एन. अन्नादुराई, माजी मुख्यमंत्री के. कामराज आणि महत्त्वाचं म्हणजे चौल आणि पांड्य राज्याचे राजे यांचेही कट आऊट्स सभेच्या ठिकाणी लावण्यात आले होते. यावरून तामिळनाडूची सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रादेशिक अस्मिता हळुवारपणे कुरुवाळण्याचा प्रयत्न TVK ने केला. शिवाय त्याला महिला सन्मानाची जोडही दिली.

2026 मध्ये तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याची घोषणा विजयने केलीय. तमिळगा वेत्री कळघम विधानसभेच्या सर्वच्या सर्व 234 जागा लढवण्याची तयारी करतोय. या सभेत विजयने डीएमके हा राजकीय विरोधक तर भाजप हा वैचारिक विरोधक असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे सध्या तरी TVK कुणासोबत युतीत न जाता स्वबळावर निवडणुकीला सामोरं जाईल अशी चिन्हं आहेत.

दक्षिणेकडच्या राज्यांचं राजकारण आणि सत्ताकारण हे डावीकडे झुकणारं आहे. त्याला प्रादेशिक अस्मितेची महत्त्वाची किनार आहे. म्हणूनच राष्ट्रीय पक्षांना दक्षिणेत एका मर्यादेपलीकडे वाढण्यास वाव नाहीय. अन्नामलाई यांच्या रूपाने भाजपने तसा प्रयत्न केला पण लोकसभेत तो अक्षरशः फोल ठरला. काँग्रेसचाही तामिळनाडूत पूर्वीसारखा प्रभाव राहिलेला नाही. INDIA आघाडीत असणं आणि मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा उल्लेख सार्वजनिकरीत्या भाऊ म्हणून करणं यामुळे राहुल गांधी यांचं काही प्रमाणात तमिळ कनेक्ट आहे. पण त्यातून पक्षाला फार साध्य होईल अशी शक्यता नाही.

1960 च्या उत्तरार्धात तामिळनाडूचं राजकारण द्रविड राजकारणानं व्यापून टाकलं. स्वातंत्र्यानंतर 1947 ते 67 अशी 20 वर्ष सोडली तर काँग्रेसला त्यानंतर इथे आपला मुख्यमंत्री करता आलेला नाही. गेली ६ दशकं तामिळनाडूचं राजकारण द्रविड म्हणजे DMK आणि AIADMK यांच्याच भोवती फिरतंय. या काळात इतर पक्षांना उल्लेखनीय कामगिरी करता आलेली नाही. तामिळनाडूची सत्ता DMK आणि AIADMK या दोन पक्षांना फिरत्या चषकासारखी आलटून पालटून मिळलीय. अशी पार्श्वभूमी असताना पक्षात तमिळ नाव, भाषिक अस्मिता आणि धर्मनिरपेक्ष विचारधारा घेऊन विजयने राजकारणात उडी घेतलीय. त्यामुळे द्रविड राजकारणाला एक लोकप्रिय पर्याय तयार झालाय.

दक्षिणेच्या राज्यांमध्ये राजकारण करण्यासाठी अभिनेता असणं किंवा अभिनेता असलेल्यांनी राजकारणात येणं हा आता अलिखित नियम बनलाय. यावर्षी मे महिन्यात झालेल्या लोकसभा आणि आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत अभिनेता पवन कल्याणने आपल्या जनसेना पक्षाची ताकद दाखवून दिली. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीसोबत भाजपलाही सोबत घेत त्यानं सत्तेची नवी समीकरणं जोडली आणि उपमुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पाडून घेतली. भाजपचं उत्तर भारतीय आणि राम मंदिर हिंदुत्व दक्षिणेत फारसं प्रभावी ठरत नाही. त्यामुळे इथल्या हिंदुत्वाच्या गरजा ओळखून पवन कल्याणने भाजपच्या हिंदुत्वाला स्थानिक प्रादेशिक हिंदुत्वाची जोड दिली आणि तो दक्षिणेत (किमान आंध्रमध्ये तरी) हिंदुत्वाचा पोस्टर बॉय झाला.

विजयनेही तामिळनाडूमधल्या द्रविड राजकारणातली स्पेस ओळखून तिथे स्वतःला बसवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याच्याकडे चाहत्यांचा फॅन बेस तयार आहे. एखाद्या अभिनेत्याला पडद्यावर पाहणं आणि त्याला निवडणुकीत मत देणं हे खालच्या राज्यांसाठी काही नवीन नाही. द्रविड मुन्नेत्र कळघम आणि अखिल भारतीय अन्ना द्रविड मुन्नेत्र कळघम हे दोन्ही पक्ष द्रविड अस्मिता घेऊन अभिनेत्यांनी स्थापन केले होते. या इतिहासाची पुनरावृत्ती विजयने केलीय. येत्या काळात सगळी गणितं व्यवस्थित बसली तर आधीच्या दोन द्रविड पक्षांप्रमाणे तामिळनाडूच्या सत्तेच्या सारीपाटावर तमिळगा वेत्री कळघमची जादू दिसून आली तर आश्चर्य वाटायला नको.

थाला, थलपती, थलैवा या शब्दांचा अर्थ तमिळमध्ये नेता, लीडर किंवा नेतृत्व असा होतो. विजय आपल्या चाहत्यांसाठी थलपती आहेच. आता त्याला सिनेमाच्या रंगीत पडद्यातून बाहेर येत वास्तवात लोकांचं नेतृत्व करायचंय. ही त्याच्या ‘थलपती’ असण्याची खरी कसोटी असेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Stubble Burning : ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यामध्ये पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश राजस्थान या राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकचरा पेंढा जाळला जातो. यामुळे
Sunday holiday: ब्रिटिश सरकारने मागण्या नाकारल्यावर लोखंडे यांनी देशभरात मोठं आंदोलन केलं. त्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या, मोर्चे काढले आणि
Passport rules: भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टच्या नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या बदलामुळे आता पती-पत्नीला त्यांच्या पासपोर्टमध्ये एकमेकांचं नाव

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ