भारतातील अतुलनीय व्यक्तिंचा गौरव करणाऱ्या ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात 2 जानेवारी 1954 सालापासून झाली. विविध क्षेत्रामध्ये अत्युच्च कामगिरी करत देशाच्या विकासामध्ये आणि गौरवामध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तिंचा सन्मान करणारा हा पुरस्कार आहे. दरवर्षी 26 जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाते.
भारतरत्नाचे मानकरी
सन 1954 साली पहिला भारतरत्न पुरस्कार हा सी. राजगोपालाचारी यांना देण्यात आला. राजगोपालाचारी हे ब्रिटिश राजवटीतील भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते. पुढे स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि भौतिकशास्त्रज्ञ सीव्ही रमण यांना मिळाला होता.
दरवर्षी साधारणपणे दोन ते तीन व्यक्तिंना हा पुरस्कार दिला जातो. मात्र, गेल्यावर्षी एकूण पाच व्यक्तिंना भारतरत्न पुरस्कार दिला आहे.
आत्तापर्यंत 53 व्यक्तिंना या सर्वाेच्च पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. यामध्ये सहा माजी राष्ट्रपती, नऊ माजी पंतप्रधान, सात माजी मुख्यमंत्र्यांसह 31 सार्वजनिक घडामोडींमधील व्यक्तिंचा समावेश आहे.
विज्ञान आणि इंजिनियरिंग क्षेत्रातील 4, सामाजिक कार्यकर्ते क्षेत्रातील 6, कला क्षेत्रातील 7, साहित्य व शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकी 2, नागरी सेवा, क्रीडा, व्यापार आणि उद्योग क्षेत्रात प्रत्येकी एक पुरस्कार मिळाला आहे.
पुरस्काराचे स्वरूप
भारतरत्न पुरस्कार म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते मेडल आणि प्रमाणपत्र दिलं जातं. या पुरस्कारामध्ये रक्कम दिली जात नाही. सोनेरी पिंपळपानावर ‘भारतरत्न’ ही अक्षरं कोरलेली असतात. पानाच्या मागच्या बाजूस भारताची राजमुद्रा आणि ‘सत्यमेव जयते’ असं कोरलेलं असतं. या पुरस्काराने पुरस्कृत झालेल्या व्यक्तिंना रेल्वेकडून मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते. केंद्र आणि राज्य सरकारकडून आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व सरकारी कार्यक्रमांचं त्यांना आमंत्रण दिलं जातं.
राजकीय अस्थिरतेमुळे भारतरत्न पुरस्कार रद्द
1977 ते 1980 दरम्यान राष्ट्रीय पातळीवरील राजकीय अस्थिरतेच्या काळात सुमारे चार वर्षे या पुरस्काराची घोषणा केली नव्हती. त्यानंतर ऑगस्ट 1992 ते डिसेंबर 1995 मध्ये अनेक जनहित याचिकाद्वारे या सर्वोच्च पुरस्काराला आव्हान दिलं होतं. त्यामुळे याही काळात भारतरत्न पुरस्कार दिले नव्हते.
फक्त 5 महिला भारतरत्न!
सन 1954 सालापासून सुरू झालेल्या या पुरस्काराने आत्तापर्यंत फक्त पाचच महिलांना हा गौरवण्यात आलं आहे. 1971 साली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पंतप्रधान म्हणून त्यांनी भारताच्या विकासकामांमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल गौरविलं होतं. 1980 साली सामाजिक कार्यकर्त्या मदर तेरेसा, 1997 साली स्वातंत्र्य कार्यकर्त्या अरुणा असफ अली, 1998 साली गायिका एमएस सुब्बालक्ष्मी आणि 2001 साली गायिका लता मंगेशकर यांना पुरस्कृत केलं आहे.
महाराष्ट्रातील 9 जणांना भारतरत्न!
महाराष्ट्रातील 9 जणांना आतापर्यंत भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यामध्ये धोंडो केशव कर्वे, पांडुरंग वामन काणे, आचार्य विनोबा भावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नानाजी देशमुख या समाजसेवक, उद्योग निर्माते जे आरडी टाटा, कला क्षेत्रातील लता मंगेशकर, भीमसेन जोशी आणि क्रीडा क्षेत्रातून सचिन तेंडुलकर यांना हा पुरस्कार दिला आहे.
भारतरत्न पुरस्कृत परदेशी नागरिक
सन 1987 मध्ये खान अब्दुल गफ्फार खान आणि 1990 मध्ये नेल्सन मंडेला यांना भारतरत्न पुरस्कार दिला होता. खान अब्दुल गफार खान हे स्वातंत्र्य सेनानी होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी महात्मा गांधी यांच्यासोबत अहिंसेचा मार्ग अवलंबत स्वातंत्र्यासाठी लढा दिला. भारत-पाकिस्तान फाळणीला त्यांनी कडाडून विरोध केला. मात्र, फाळणीचा निर्णय पक्का झाल्यावर त्यांनी पाकिस्तानात राहणं पसंत केलं. स्वातंत्र्य चळवळीतील त्याचं योगदान पाहता ते पहिले परदेशी व्यक्ती होते ज्यांना भारतरत्न पुरस्कारांने गौरविलं गेलं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील वंशवादाविरोधात अहिंसेच्या मार्गाने लढा देणारे नेल्सन मंडेला यांना ही त्यांच्या सामाजिक कार्यासाठी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.