हिमाचल प्रदेशमधल्या जवळपास 45 टक्के भौगोलिक प्रदेशाला येत्या काही काळात भुस्खलन, हिमस्खलन आणि पूर परिस्थितीचा धोका असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे. आयआयटी रोपरकडून करण्यात आलेल्या अभ्यासातून ही बाब उघडकीस आली आहे.
आयआयटी रोपरकडून एकाच वेळी उद्भवणाऱ्या अनेक नैसर्गिक धोक्यांपासून जास्त धोका असलेल्या प्रदेशांची ओळख पटवणे या विषयावर संशोधन सुरू होतं. या अंतर्गत
हिमाचल प्रदेशमधल्या धोकाप्रवण संवेदनक्षम प्रदेशाचा सर्व्हे केल्यावर येत्या काळात हिमाचल प्रदेशमधल्या किती टक्के भागात नैसर्गिक आपत्ती उद्भवी शकतात याची माहिती देण्यात आली.
अभ्यासातून कोणत्या गोष्टी समोर आल्या?
अभ्यासकांच्या मते, हिमाचल प्रदेशमधल्या ज्या पर्वतांचे उतार 5.9 आणि 16.4 अंश दरम्यान आहेत आणि उंची 1600 मीटर आहे अशा भागात भूस्खलन आणि पूर येण्याचा धोका जास्त आहे. तर ज्या पर्वतांची उतार 16.8 अंश आणि 41.5 अंश दरम्यान आहे तेथे भूस्खलन आणि हिमस्खलन होण्याची शक्यता सर्वाधिक असल्याचं या अभ्यासातून समोर आलं आहे.
तर 3 हजार मीटरहून जास्त उंचीच्या डोंगररांगावर नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक धोका असल्याचा अभ्यसकांनी सांगितलं आहे. नदी किनाऱ्यांपासून जवळ असणाऱ्या भागांमध्ये भूस्खलनाची आणि पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. तर उंच डोंगररांगामध्ये हिमस्खलनाची भिती जास्त आहे.
या भागाचं भौगोलिक क्षेत्र पाहता एका भागात एक आपत्ती घडल्यावर त्यापासून थोड्या अंतरावर त्या सारखीच आपत्ती घडू शकते. त्यामुळे या नैसर्गिक आपत्ती प्रवण भागांचा आढावा घेऊन त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन व बचाव पथकाची व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे. यासाठी आयआयटी रोपर संस्थेच्या संशोधनाची मदत होऊ शकते.
हिमाचल प्रदेशमध्ये घडलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या घटना
गेल्या काही काळात हिमाचल प्रदेशमध्ये नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. वारंवार पूर परिस्थिती निर्माण होणे, भूस्खलन, हिमस्खलन आणि ढगफूटीसारख्या घटना घडत असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी ही होत असते.
सन 2024 मध्ये संसदेच्या अधिवेशनामध्ये गृह मंत्रालयाने हिमाचल प्रदेश नैसर्गिक आपत्तीचं केंद्र म्हणून उदयास येत असल्याचं निवदेनात म्हटलं होतं. गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सन 2024 मध्ये घडलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये 408 जणांचा मृत्यू झाला आहे. 7 हजार 110 गुरेढोरे मृत्यूमुखी पडले आहेत. तर 1 हजार 089 घरांचं नुकसान झालं होतं. या सगळ्या परिस्थितीमुळे आर्थिक नुकसान सोसावं लागलं हे वेगळं.
हिमाचल प्रदेशमधल्या किन्नौर जिल्ह्यातल्या घर्षू गावापासून ते सिरमौरच्या पांता साहिब अशा आठ जिल्ह्यामध्ये 12 मे ते 26 सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. यातील सगळ्यात जास्त 18 घटना या हिमनदी आणि बर्फाच्छित पर्वतरांगाजवळ घडल्या आहेत. डोंगराळ भागात ढगफुटी झाल्यावर पायथ्यांकडच्या सगळ्या भागात पूर परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं.
सन 2023 मध्ये अशाच प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमुळे 335 जणांचा मृत्यू झाला आहे. यावर्षी बऱ्याचशा घटना या हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या वीज प्रकल्प आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या परिसरात घडल्याचं निदर्शनास आलं आहे.
अलिकडच्या काळात या भागात ढगफुटीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ढगफुटीमुळे मग हिमस्खलन, भूस्खलन आणि पूराच्या घटना घडत असतात. साऊथ आशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर्स आणि पीपल संस्थेच्या माहितीनुसार, 2022 साली ढगफुटीच्या 39 घटना घडल्या होत्या. 2021 साली 30 घटना, 2020 साली 3 घटना, 2019 साली 16 घटना आणि 2018 साली 21 घटना घडल्या होत्या.
तर सन 2023 साली आतापर्यंतच्या सगळ्यात जास्त 65 ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. यापैकी जास्त 31 घटना जुलै महिन्यात घडल्या आहेत. या सर्व घटना नैऋत्य मान्सून हंगामामध्ये घडल्या आहेत.
हिमाचलमधली नैसर्गिक आपत्ती मानवनिर्मित?
हिमाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत विकासकामं सुरू आहेत. विविध जिल्ह्यातील गावांना जोडण्यासाठी रस्ते बांधणी, बोगदे, जलविद्युत प्रकल्प, खाणकाम, पर्यटनाच्या अनुषगांने रिसॉर्ट्स, हॉटेल बांधणे यासारखे अनेक बांधकामं या क्षेत्रात सुरू आहेत. या सगळ्या कामासाठी कायदेशीर – बेकायदेशीर डोंगर फोडले जात आहेत, झाडं तोडली जात आहेत. या सगळ्याचा नकारात्मक परिणाम या इथल्या भौगोलिक रचनेवर आणि हवामानावर होऊन नैसर्गिक आपत्ती ओढावत आहेत.
विविध पर्यावरणीय संस्थाच्या अभ्यासानुसार, पायाभूत प्रकल्प सुरू असलेल्या भागामध्ये भूस्खलन आणि पूर आल्याच्या घटना जास्त घडल्या आहेत.
‘द हिंदू’ वृत्तपत्राला हवामान बदल शास्त्रज्ञ सुरेश अत्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेश भागात पावसाचा कालावधी कमी झाला असला तरी, त्याची तीव्रता वाढली आहे. उच्च तापमान आणि मुसळधार पावसामुळे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या भागात भूस्खलनाच्या पातळीत घट झाल्यामुळे भूस्खलन होत आहे.