ओडिसाच्या भुवनेश्वर शहरात 8 ते 10 जानेवारीदरम्यान 18 वा ‘प्रवासी भारतीय दिवस’ साजरा होत आहे. जे भारतीय नागरिक परदेशी वास्तव्य करत आहेत त्यांना प्रवासी भारतीय (NRI) असं म्हणतात. 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत परतले म्हणून या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे. या दिवसाचे स्मरण म्हणून प्रवासी भारतीय हा दिवस साजरा केला जातो.
यंदा ‘विकसित भारतासाठी प्रवासी भारतीयांचे योगदान’ ही थीम आहे. परदेशात राहणाऱ्या भारतीयांचा भारताच्या विकासात किती मोठा सहभाग आहे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमात 70 देशांमधील 3 हजाराहून अधिक प्रतिनिधी भुवनेश्वरमध्ये एकत्र आले आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज 9 जानेवारी, 2025 रोजी प्रवासी भारतीय दिवस परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रवासी भारतीय एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.
बुधवारी अधिवेशनात संबोधित करताना परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी अनिवासी भारतीय (NRIs) आणि मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या व्यक्तींना (PIOs) भारताच्या प्रगतीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केले.
भारताचा डायस्पोरा
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, भारताचा डायस्पोरा 18 मिलियन (1.8 कोटी) इतका आहे, यामुळे भारताचा प्रवासी भारतीयाचा समूह हा जास्त आहे. तर, भारत सरकारच्या मते ही संख्या 35 मिलियन (3.5 कोटी) आहे आणि हे भारतीय मुख्यतः यूएई, सौदी अरेबिया, अमेरिका, कॅनडा आणि युनायटेड किंगडममध्ये राहतात. तसेच, मलेशिया, सिंगापूर, कॅरिबियन देश आणि अफ्रिकेतही मोठ्या सांगेन भारतीय राहत आहेत.
आर्थिक योगदान
2023-24 मध्ये परदेशी भारतीयांनी त्यांच्या नातेवाईकांना $107 बिलियन म्हणजेच 8.9 लाख कोटी रुपये रेमिटन्स पाठवून ऐतिहासिक रेकॉर्ड केला आहे. $100 बिलियनचा आकडा ओलांडण्याचं भारताचे हे दुसरे वर्ष आहे. असं इकोनॉमिक टाइम्सच्या अहवालात म्हटलं आहे.
प्रवासी भारतीय जगभरात राहतात आणि ते भारताच्या विकासात मोठी भूमिका बजावत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, परदेशी भारतीयांनी एप्रिल ते ऑगस्ट 2024 या कालावधीत NRI डिपॉझिट योजनांमध्ये $7.82 बिलियनची गुंतवणूक केली आहे.
न्यूयॉर्क टाइम्सने अमेरिकेतील भारतीय प्रवाशांच्या यशामागील अनेक कारणे सांगितली आहेत. त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) सारख्या संस्थांमधून उच्च दर्जाचे शिक्षण आणि लोकशाही व्यवस्थेची ओळख हि काही प्रमुख कारण आहेत.
अमेरिकेतील भारतीय हे सर्वात श्रीमंत अल्पसंख्याक गट आहे. द इकॉनॉमिस्टच्या अहवालानुसार, अमेरिकेतील भारतीय कुटुंबांचे सरासरी उत्पन्न $150,000 आहे, जे देशाच्या सरासरी उत्पन्नाच्या दुप्पट आहे.
भारत हा 20 वर्षांपासून रेमिटन्स घेणारा प्रमुख देश आहे तर, अमेरिका हा रेमिटन्सचा सर्वात मोठा सोर्स मानला जातो.
जगभरात राहणारे भारतीय लोक भारतात आणि जगभरात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. 2014 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर भारतीय प्रवासी लोकांच्या क्षमतेचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. ते यांना ‘ब्रँड अँबॅसडर’ म्हणून संबोधतात. पंतप्रधान मोदी त्यांच्या परदेश दौऱ्यादरम्यान तिथल्या प्रवासी लोकांशी संवाद साधतात आणि भारताच्या विकासात सहभागी होण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करतात.
आज, भारतीय लोक जगभरातील महत्त्वपूर्ण संस्थांमध्ये उच्च पदांवर काम करत आहेत. उदाहरणार्थ, अजय बंगा हे जागतिक बँकेचे अध्यक्ष आहेत आणि गीता गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नाणे निधी (आयएमएफ) च्या पहिल्या उप व्यवस्थापकीय संचालक आहेत.
सर्वात मोठ्या 500 अमेरिकन कंपन्यांपैकी 25 कंपन्यांचे नेतृत्व भारतीयांकडे आहे. यामध्ये Microsoft, Google, YouTube, आणि Adobe यांचा समावेश आहे.
राजकीय योगदान
जगभरात राहणारे भारतीय आता राजकारणातही आपला प्रभाव दाखवत आहेत. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि इतर अनेक देशांमध्ये भारतीय वंशाचे लोक राजकारणात यशस्वी होत आहेत. यामुळे भारतीय प्रवासी जगभरातील राजकीय परिस्थितीवर मोठा प्रभाव टाकत आहेत.
भारतीय डायस्पोरा हे फक्त आर्थिकच नाही, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय योगदानातूनही भारताच्या विकासात मोलाची भूमिका बजावत आहे.