Jharkhand : झारखंड सरकारने जनरल ग्रॅज्युएट लेवल कंबाइन कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन (JGGLCCE) दरम्यान राज्यभरात इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे शनिवारी आणि रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 1.30 पर्यंत मोबाइल इंटरनेट सेवा बंद राहणार आहेत.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी यासंबंधी कडक निर्देश दिले असून परीक्षा निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
परीक्षेच्या तयारीबाबत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर सरकारनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, परीक्षेतील फसवणूक थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. इंटरनेटद्वारे फसवणूक आणि पेपरफुटीच्या घटना टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
चुकूनही पकडले गेल्यास कारवाई केली जाईल.
झारखंड स्टाफ सिलेक्शन कमिशन (JSSC) च्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, या परीक्षा राज्यातील 823 केंद्रांवर होणार असून सुमारे 6.39 लाख उमेदवार सहभागी होणार आहेत. तसंच, परीक्षेदरम्यान कोणतीही चूक खपवून घेतली जाणार नाही. जर कोणी चुकीचे कृत्य केलं, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी स्पष्ट केलं आहे.
पेपरफुटीच्या घटनांना तोंड देण्यासाठी प्रयत्न
परीक्षेदरम्यान इंटरनेट बंद ठेवल्यामुळे व्हॉट्सॲप किंवा इतर मेसेजिंग प्लॅटफॉर्मद्वारे पेपर प्रसारित होण्याचे घटनांना आळा घालता येईल. हे सुनिश्चित करण्यासाठीच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
फोन कॉल्स आणि ब्रॉडबँडवर बंदी नाही
झारखंड गृहविभागाने स्पष्ट केलं आहे की, या बंदीचा परिणाम फक्त मोबाइल इंटरनेट सेवांवर होईल. फिक्स्ड टेलिफोन लाईनवरील कॉल्स आणि ब्रॉडबँड सेवा सुरु राहतील. तसेच, नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर भारतीय दंड संहिता आणि इंडियन टेलिग्राफ कायद्यांतर्गत कारवाई केली जाऊ शकते.