प्रसादाच्या लाडवात जनावरांची चरबी आणि माशांच्या तेलाचा अंश सापडला. दोष लाडवात नाही तर हे लाडू ज्यात वळले त्या तुपात आहे. साहजिकच तिरुपतीच्या श्री व्यंकटेश्वर अर्थात बालाजी मंदिरात आणि त्यांच्या जगभर पसरलेल्या भक्तसंप्रदायात मोठा गहजब उडाला. हे प्रताप आहेत आपल्या प्रचंड भक्तीतुडुंब गर्दीचे आणि त्या गर्दीचं व्यवस्थापन सांभाळण्याच्या नादात आलेल्या टेंडर व्यवस्थेचे. आणि अर्थातच खरा दोष आहे तो वनस्पती तुपाचा अर्थात डालड्याचा.
वनस्पती तूप अर्थात हायड्रोजेनेटेड ऑइलमधल्या ट्रान्स फॅट म्हणजे सॅच्युरेटेड तसेच अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड बाबत आपल्या पार्लमेण्टमध्ये चर्चाही झाल्या होत्या. या हायड्रोजेनेटेड ऑइलच्या वापरावर बंदी किंवा मर्यादा आणल्या गेल्या. पण तरीही त्याकडे काणाडोळा करून औद्योगिक पातळीवर ज्या काही क्लृप्त्या करायच्या ते लोक करतातच.
वनस्पती तूप म्हणजे मुळात तूप नसतं. ते तेल असतं. रासायनिक प्रक्रियेत त्याच्या अणुच्या कडीमध्ये हायड्रोजन भरला की ते घट्ट होतं आणि तूप दिसायला लागतं. दिसायला तूप आणि असतं तेल. उच्च तापमानाला केलेल्या या रासायनिक प्रक्रियेत पॅलाडिअम, निकेल किंवा प्लॅटिनस धातू लागतो. तो कॅटलिस्ट म्हणून काम करतो. मात्र एवढं करूनही हे तूप फार काही स्वस्त नसतं. पण गायीच्या तुपापेक्षा स्वस्तच असल्याने हायड्रोजेनेटेड फॅट फास्ट फुड, बेकरी उत्पादनं यात वापरली जातात. ती तब्येतीला काही चांगली नसतात. मग बाजारात हे वनस्पती तूप किफायतशीर करण्यासाठी यात पातळ फॅट मिसळतात. हे फॅट अर्थातच प्राणीजन्य असतं. आपल्या देशातल्या कत्तलखान्यांचं ते बायप्रॉडक्ट आहे. अर्थात अशी उचलून कुणी प्राण्यांची चरबी मिसळत नसतं. त्याचीही रासायनिक प्रक्रिया असते. बिफ टॅलो म्हणजे खूर असलेल्या प्राण्याच्या चरबीच्या फॅट्स. या ट्रान्स फॅटमुळे हे वनस्पती तूप लवकर खराब होत नाही. दीर्घकाळ टिकतं. पण आपल्या शरीराला हे खूपच हानिकारक असतं. हायड्रोजेनेटेड फॅट्स हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक. कॅन्सरची शक्यताही वाढते. 2015 मध्ये एफडीएने हायड्रोजेनेटेड ट्रान्स फॅट असुरक्षित म्हणून घोषित केले आहे.
तिरुपतीच्या लाडवातल्या बीफ टॅलोचा मुद्दा देवस्थान असल्याने संस्कृती रक्षकांनी हाती घेतलाय. पण मुळात हा मुद्दा शरीराच्या हानीचा आहे. काही दिवसांपूर्वी आइस्क्रीममध्ये हे वनस्पती तूप वापरण्यावरून वादंग झाला. अखेरीस जे आइस्क्रीमचे ब्रँड दूध वापरत नाही आणि त्याऐवजी हायड्रोजेनेडेट ऑइल वापरतात त्यांच्या उत्पादनाला आइस्क्रीमऐवजी फ्रोझन डेझर्ट असं सक्तीने म्हणायला सुरुवात झाली.
तर या वनस्पती तुपाचा प्रताप म्हणून तिरुपतीच्या लाडवात हे बीफ टॅलोचे अंश सापडले असणार. यातले आरोप-प्रत्यारोप आणि राजकारण पुढे सुरू राहील. पण थोडं विषयांतर वाटलं तरी वनस्पती तुपाशी निगडित भारताचा रंजक इतिहास आहे.
सांगतात की, 1930 साली तुपाला पर्याय म्हणून डच व्यापारी हायड्रोजेनटेड व्हेजिटेबल फॅट भारतात घेऊन आले. तेव्हाही भारतीयांना तूप परवडत नव्हतं. डाडा अॅण्ड कंपनीकडे व्यापारी हक्क होते. मागणीचा अंदाज घेऊन लिव्हर ब्रदर्सनी शिवडीला कारखाना टाकला. डाडा अॅण्ड कंपनीकडून हक्क विकत घेतले. डाडा कंपनीने आपलं नाव उत्पादनात असावं असा आग्रह धरला. त्यातून डालडा हा ब्रँड पुढे आला. 1937 पासून भारतीय लोकांच्या पोटात अफरातफरी करू लागला.
पण त्याच्याही आधीची गोष्ट मराठी मनांच्या दृष्टीने महत्त्वाची. डालड्याचा मूळ शोध एका मराठी माणसाने लावला असा दावा केला जातो. नारायणराव बाळाजी भागवत असं या संशोधकाचं नाव. नारायणराव भागवतांनी मुंबईच्या झेवियर्स कॉलेजमधून रसायनशास्त्राची डिग्री घेतली होती. नारायणरावांनी त्या काळी नव्याने स्थापन झालेल्या बेंगलोरमधल्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या पहिल्याच बॅचमध्ये प्रवेश घेतला. रसायनशास्त्रात त्यांनी ऑइल्स आणि फॅट्सवर संशोधन केले. ते टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सची संशोधन पदवी पूर्ण करणारे पहिले विद्यार्थी. उत्तीर्ण झाल्यावर नारायणराव एडनला गेले. त्यांच्या वडिलांच्या मित्राच्या इब्राहीमभाई लालजी यांच्या साबणाच्या कारखान्यात काम करून अनुभव घेतला. भारतात आल्यावर टाटा ऑईल मिल्स येथे कपिलराम वकील यांचे मुख्य मदतनीस म्हणून ते नोकरी करू लागले.
पहिल्या महायुद्धाचा तो काळ होता. सैनिकांना लोण्याची आवश्यकता असायची. इंग्रज फौजेतील भारतीय सैनिकांना तूप हवं होतं. जगभरातील संशोधक साजूक तुपाला पर्याय शोधत होते. अमेरिका व जपानमध्ये गोडं तेलापासून तूप तयार करण्याचे प्रयत्न सुरू होते. पण त्यांना यश मिळत नव्हते. टाटा कंपनीमध्ये नारायणराव भागवत आणि कपिलराम या दोघांनी त्यात यश मिळवले. पहिले वनस्पती तूप भारतात तयार झाले.
टाटा कंपनीचे वित्तीय सल्लागार पिटरसन या गोऱ्या अधिकाऱ्याने हा फॉर्म्युला मागितला. पण नारायणराव भागवतांनी नकार दिला. पिटरसन यांनी मनात राग धरून टाटांच्या या कंपनीची आर्थिक नाकेबंदी केली. टाटांना ही कंपनी बंद करावी लागली. डालडा म्हणजे वनस्पती तूप हे तेलावर हायड्रोजन ची क्रिया करून बनवतात. ही पद्धत पॉल सबाटिअर नावाच्या फ्रेंच माणसाने 1897 मध्ये शोधून काढली अशी माहिती आज इंटरनेटवर मिळते. मात्र दुर्दैवाने नारायणराव भागवतांचं नाव झळकत नाही. (लेखिका दुर्गा भागवत आणि भारतात पहिली डॉक्टरेट मिळवणाऱ्या कमलाबाई सोहनी या नारायण भागवतांच्या कन्या.)
तर डालडा अर्थात वनस्पती तुपाची ही मूळ कहाणी. आज तिरुपतीच्या लाडवांमुळे पुन्हा एकदा दुर्दैवाच्या वळणावर येऊन ठेपली आहे. वनस्पती तूप केवळ देवस्थानाच्या प्रसादम् मध्येच नाही तर आपल्या रोजच्या जीवनातल्या अनेक खाद्यपदार्थांमध्ये आजही दडून आहे. आनंद नाहीच पण त्याचे वैषम्य जरूर वाटले पाहिजे.
(संदर्भ सौजन्य : विज्ञान विशारद लेखिका – वसुमती धुरू – ग्रंथाली प्रकाशन; श्री. द्वारकानाथ बिवलकर)
1 Comment
एक अभ्यासपूर्वक माहिती मिळाली. मला “डालडा” हा शब्द कुठून आला असणार असा प्रश्न पडायचा… पण आज तुमचा लेख वाचून माहिती मिळाली.