मुंबईच्या पाच टोल नाक्यांवर टोलमाफी झाली ही मध्यमवर्गीयांसाठी आनंदाची बाब. रोज सुमारे साडेतीन लाख वाहनं टोल क्रॉस करतात. पैकी पावणेतीन लाख हलकी वाहनं आता टोल भरणार नाहीत. टोलवाल्यांचे दिवसाचे अंदाजे 50 लाख रुपये या राजकीय निर्णयाने टोलवले.
सर्वसामान्यांचे पैसे वाचले हा कोण आनंद ! मोद विहरतो चोहिकडे… नाही नाही पाचही टोल नाक्यांकडे. पण हा आनंद रात्री बारापर्यंतही टिकला नाही. बऱ्याचजणांना वाटलं, या टोलमाफीने वाहतुकीची कोंडी कमी होईल. टोलच्या पैशांसोबत इंधन वाचेल, वेळ वाचेल. आपण सुळकन मुंबईच्या बाहेर जाऊ. पण तसं काही दिसलं नाही. टोल माफी झाली म्हटल्यावर अनेक हौशे, नवशे, गवशे लगेच गाड्या काढून राऊंड मारायला बाहेर पडले. मुंबईतल्या मुंबईत गाडीवर हात साफ करता येत नाही इतकी वाहतूक गर्दी. लोकांना वाटलं आता आपल्याला ड्रायव्हिंगचा आनंद घेता येईल. पण कसचं काय. टोलनाक्यावर वीस मिनिटं जागेवरच.
टोलवर राजकीय पक्षांचे झेंडे घेऊन आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांची गर्दी झाली ती वेगळीच. त्यांनी थोडी खळखळ केली, पण त्यांच्या गालांवर या निर्णयाने खटॅककन खळ्ळी आली. शिवाय मीडियावाले मागे कसे राहतील? त्यांचे कॅमेरे होतेच… कसं वाटतंय? विचारायला. पण इथे माणूस ज्याअर्थी थांबलाय आणि फुरसतीत काच खाली करून बाइट देतोय म्हणजे मूळ उद्देशच फसला की. याचं आम्हा मीडियावाल्यांना भान कुठे? निरीक्षण असे की, टोल भरण्यावरून हुज्जत घालणारे सर्वसामान्य नसायचे. शासकीय किंवा राजकीय व्यक्ती किंवा पत्रकार असल्याचं सांगून बरेचसे स्वयंघोषित व्हीआयपी टोल भरायला टोलवाटोलवी करायचे.
खोळंबा तसाच. वेळ तेवढाच लागतोय. मग टोलमाफी म्हणजे फक्त राजकीय खेळी का?
हे असले प्रश्न लोकांच्या मनातल्या मनात पण येत नाहीत. आपला मध्यमवर्गीय तसा आत्मकेंद्रीच. आपले 45 रुपये वाचले ना, पुढचं पुढे. सरकार तिजोरीचं जे काय असेल ते बघून घेईल.
हाच तो शहरी मतदार. जो इलेक्शनच्या आदल्या दिवशी याच सरकारने दिलेली टोलमाफी घेऊन जवळच्या रिसॉर्टवर सहलीला जाईल आणि मतदानाला चिअर्स म्हणत ठेंगा दाखवेल. मंगळवारी भारताचे सीईसी राजीव कुमार यांनीही निवडणूक कार्यक्रम घोषित करताना या शहरी मतदारांच्या उदासीनतेवर बोट ठेवलं.
पण या टोलमाफीच्या निर्णयामुळे मध्यमवर्गीयांची शॉपिंगबाबतची नवी चंगळ होईल. काठावरचे म्हणजे कांदिवली-बोरिवली-दहिसर, विक्रोळी-भांडुप-मुलुंड, चेंबूर-देवनार-मानखुर्द इथले लोक खुश आहेत. पश्चिम उपनगरं वगळता ईशान्य आणि पूर्व मुंबईतल्या लोकांना फिरायला आणि खरेदीला चांगले मॉलच नाहीत. जे काही मॉल्स होते ते तोडून त्यांचे उत्तुंग रेसिडेन्शिअल टॉवर्स झाले. कारण मॉलचा मेण्टेनन्स करण्यापेक्षा रेसिडेन्शिअल टॉवर बांधून घरं विकून मोकळं होण्याकडे बिल्डरांचा कल. त्यामुळे घाटकोपरपासून मुलुंडपर्यंत तसंच कुर्ल्यापासून मानखुर्दपर्यंत ईशान्य पूर्व मुंबईकरांना मॉलसाठी पश्चिम दिशा पकडावी लागायची. आता टोलमाफी झाल्यामुळे अनेक मध्यमवर्गीय ठाण्यातील मॉलकडे किंवा नवी मुंबईतील प्रशस्त मॉलकडे धाव घेतील.
तीच गत शाळांबाबत होती. कांजूर ते मुलुंडमधल्या रहिवाशांची मुलं पूर्वी ठाण्यातल्या शाळांमध्ये जायची. काही वर्षांपूर्वी मुंबईतील विद्यार्थी शाळांमधल्या शाळांनी घेणं बंद केलं. शाळेच्या बसेस आणि टोल व्यवस्थेमुळे मुलांना घरापर्यंत पोहचायला लागणारा अवधी हे एक कारण होतं. त्यामुळे ईशान्य मुंबईतील बहुतांश मध्यमवर्गांचे विद्यार्थी ऐरोली, नवी मुंबई येथील शाळांमध्ये जातात. आता टोल बाद झाल्यामुळे ठाण्यातील दर्जेदार शाळांमध्ये ईशान्य मुंबईच्या विद्यार्थ्यांसाठी पुनर्विचार करता येईल.
लोक विचारतात फास्टॅगचं काय करायचं. पण फक्त मुंबईच्या बाहेरचे टोल माफ झालेत. बाकी प्रवासातले टोल अजून आहेतच. मात्र मुंबईच्या टोलमाफीनंतर लगेच फास्टॅग यंत्रणा अपडेट झालेली नव्हती. त्यामुळे अनेकांच्या फास्टॅगमधून पैसे कापले गेले. हे असं झालं की मध्यमवर्गीय प्रचंड चिडतो. टोल माफी म्हणायचं आणि पैसे कापून घ्यायचे म्हणजे काय?
आणखी एक घोळ असा की हलकी वाहने म्हणजे लाइट मोटर वेहिकलना टोलमधून माफी मिळाली. पण मुंबईत रोज अनेक टेम्पो, पिकअप, कुरिअर वाहनं येतात. त्यांना टोलमाफी आहे की नाही याचं स्पष्टिकरण टोलनाक्यावरच्या कर्मचाऱ्यांना नव्हतं. हे टेम्पो अर्थातच लाइट मोटर वेहिकलच्या रांगेत घुसलेले. त्यामुळे त्यांच्याशी हुज्जतीत वेळ जाऊ लागला. गाडी सुळकन निघालीच नाही.
पासवाले आणखी फ्रस्ट्रेटेड. निदान ही टोलमाफी महिन्याच्या अखेरीस तरी करायची. पाच टोलवर हलक्या वाहनांसाठी महिना 1600 रुपये भरून पास मिळतो. या पासद्वारे टोलवरून अमर्याद प्रवास करता यायचा. बरेचसे काठावर राहणारे किंवा रोज विरार-वसई, ठाणे किंवा नवी मुंबईतून वाहनाने प्रवास करणारे या पासचा वापर करायचे. आता 800 रुपये फुकट गेल्याची त्यांची भावना आहे. सरकारने आम्हाला 800 रुपये रिफंड करावे अशी मागणी टोलनाक्यावरच्या पास ऑफिसकडे लोक नोंदवत आहेत.
मधल्या काळात मुंबईच्या टोलनाक्यांवर गाव वसला होता. टोलनाक्यावरच्या कर्मचाऱ्यांचं एक वेगळं जग तयार झालं होतं. एका टोल बुथवरून दुसऱ्या टोल बुथवरच्या मुलींच्या गप्पा सुरू असायच्या. माझा भाऊ काय म्हणाला, तुझ्या आईचा फोन आला का, मी जेवलीच नाही वगैरे त्यांच्या गप्पांमध्ये टोल वाहतुकीचं गतिमान सरकारी नियमनही चालायचं. टोलवरच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणाऱ्यांना तोंड देण्यासाठी टोलभैरव म्हणजे बाउन्सर्स होते. त्यांचं टोल चुकवून पळणाऱ्या वाहनासमोर येण्याचं धाडस लाजवाब. बॉनेटवर हात आपटल्यावर जोरात आवाज यावा म्हणून चार बोटात घातलेल्या अंगठ्या, नीलकमलचा प्लास्टिकचा बॅरिकेड वाहनासमोर पटकन सरकवण्याची त्यांची लगबग, टोलवरचे शेंगदाणे किंवा काकडी विकणारे आणि टोलवाल्यांचं काहीतरी साटंलोटं असावं अशी शंका घ्यायला जागा. कारण टोलवाले काही वाहनांचा टोल भरलेला असला तरी बॅरिअर वर करायला का कुणास ठाऊक जरा वेळच घेतात. तेवढ्या वेळात शेंगदाणे, डॅशबोर्ड अॅक्सेसरीज, सीट अॅक्सेसरीज, लहान मुलांची चित्रकलेची पुस्तकं विकणारे या लोकांशी वाहन चालकांचं काचा खाली करून हितगुज सुरू असायचं. टोलवरचे भिकारी आणि तृतीयपंथी अनेकांच्या ओळखीचे झालेले. त्यांच्याही गाड्या ओळखीच्या झालेल्या.
टोलवर वाहनं हळू होतात. त्यामुळे बॅरिकेडिंगची परवानगी नसताना कर्तव्यदक्ष ड्युटीवाले पोलिस आपले सापळे घेऊन टोलवरच बसलेले असायचे. शुक्रवारी आणि शनिवारी रात्री मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांना टोल थांब्याचीच सर्वात मोठी भीती. आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अनधिकृत कार्यकर्त्यांना टोलवरच्या सीसीटीव्ही फुटेजची धास्ती मोठी.
टोलवरचं स्वच्छतागृह आणि त्याच्या आसपास आश्रयाला आलेली काही रस्त्यावरची कुटुंबं, त्यांची उघडीबोडकी पोरं आणि सोबत त्यांची आवडती भटकी कुत्री. टोलवरच्या कर्मचाऱ्यांच्या कंटेनरच्या पोर्टेबल कचेऱ्या, दोन-चार अनधिकृत भासणाऱ्या टपऱ्या. त्यातला चहा-बिस्कुटवाला वगैरे वगैरे. आसपासच्या भुमिपुत्रांच्या टोलला अधनंमधनं भेटीगाठी, काही खळ्ळखटॅक, त्यानंतर वातावरणातला तणाव वगैरे. टोलवरचा हा गाव आता आपल्याला दिसणार नाही बहुधा.
ठाण्याच्या खाडीतले फ्लेमिंगो मात्र थोडे खुश होतील. या टोलवरच्या वाहनांच्या खोळंब्यामुळे प्रदूषण वाढत होतं. ते तेवढं कमी झालं तर बरं, असं या गुलाबी जाकिटवाल्या पक्ष्यांचं म्हणणं होतं.
पुलंनी मुंबईकरांबद्दल लिहिलं, तेव्हा टोलनाके नव्हते. पण जर आज पुलं असते तर आज त्यांनी टोलवरच्या खोळंब्याची मुंबईकरांची दुसरी बाजू सांगितली असती. टोलने मुंबईकरांना वाहतुकीच्या टप्प्यातला अनवट ठेहराव कसा दिला हे सांगितलं असतं. मुंगीच्या गतीने सरकताना बाजूची रांग आपल्यापेक्षा वेगवान जाते आहे असं वाटल्याशिवाय तुम्ही खरे मुंबईकरच नाहीत, असंही सांगितलं असतं.
टोल ही आत्मक्लेश करण्याची उत्तम जागा आहे… यापुढे मुंबईकरांना आत्मक्लेश करावासा वाटणार असेल तर त्यांनी कुठे जावं?
कोणास ठाऊक कदाचित नवं सरकार मुंबईकरांसाठी निवडणुकीनंतर टोल सुविधा पुन्हा सुरूही करेल. तोपर्यंत ‘अशी ही टोलवाटोलवी’ सुरूच राहू दे.