रतन टाटांच्या निधनानंतर आता त्यांची महत्ता आणि महती सांगणारे अनेक लोक जगभरातून पुढे येतील. मात्र थोड्या वैयक्तिक संदर्भाने त्यांचे काही किस्से इथे देतोय. कारण त्याशिवाय या अलौकिक व्यक्तिरेखेची उंची कळणार नाही.
रतन टाटांशी माझी झालेली पहिली भेट लिफ्टमध्ये होती. तेव्हा मी ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी होतो. तसा लहानच. रिझर्व्ह बँकेच्या फोर्टमधल्या इमारतीत 19 व्या मजल्यावर वैयक्तिक कामासाठी वडिलांना भेटायला गेलो होतो. दुपारची वेळ होती. काम संपल्यावर वडिलांचा निरोप घेऊन मी निघालो. विभागातून बाहेर पडताना बहुधा दिशा चुकली असावी. पण त्या काळात सुरक्षिततेचे नियम इतके कठोर नव्हते. मी एका लिफ्टच्या समोर जाऊन खाली जाण्याचं बटन दाबलं. त्या ऑटोमॅटिक लिफ्टचा दरवाजा उघडला. पाहिलं… निळ्या सूटमध्ये उद्योगपती रतन टाटा होते. मी अभावितपणे आत पाऊल टाकत होतो आणि त्यांना पाहून माझे रिफ्लेक्सेस थबकले. त्यांच्यासोबत आरबीआयचे सिक्युरिटी पर्सन होते. त्यांनी ‘आत येऊ नकोस’ अशा अर्थाने हात केला. पण तेवढ्यात रतन टाटा म्हणाले… लेट हिम कम. मी हरखलो. आत कोपऱ्यात जाऊन उभा राहिलो. टाटांनी तेवढ्यात आस्थेने व मार्दवपूर्ण आवाजात माझं नाव विचारलं. मी सांगितलं. त्यांच्याशी आणखी काही बोलण्यासाठी शब्द जुळवेपर्यंत काही सेकंद संपले आणि लिफ्ट तळमजल्यावर आली. त्यांनी हलकेच माझ्या खांद्यावर थोपटलं आणि ते पुढे निघून गेले. इतक्या मोठ्या उद्योगपतीचं इतक्या सहजपणे माझ्याशी बोलणं हे मला खूप भारी वाटलं. त्या क्षणापासून मी त्यांचा फॅन झालो.
त्यानंतर पत्रकारितेच्या जीवनात कर्नाटक-तमिळनाडू बॉर्डरजवळच्या होसूरमध्ये टायटनची फॅक्टरी पाहायला गेलो होतो. फॅक्टरी पाहून झाल्यावर जेवणाच्या आधी अचानक रतन टाटा तिथे आले. त्यांनी आम्हा पत्रकारांशी थोड्या गप्पा केल्या. चला आपण जेवायला जाऊ असं ते म्हणाले. आम्हा पोटार्थी पत्रकारांना वाटलं, टायटन कंपनीच्या कॅण्टीनमध्ये जेवण्याऐवजी साक्षात रतन टाटा आपल्याला कुठे तरी पंचतारांकित जेवण देतील. पण रतन टाटा उठले आणि कॅण्टीनच्या कोपऱ्यातून त्यांनी साच्याचं स्टिलचं ताट उचललं. त्यांच्या मागोमाग आम्ही. त्यानंतर रतन टाटा सहजपणे कामगारांच्या रांगेत उभे राहिले. त्यांच्या समोरच्या कर्मचाऱ्याने मागे वळून बघितलं. त्याने पाहिलं की कंपनीचा मालक आपल्या मागे उभा आहे. त्या कर्मचाऱ्याने फक्त हसून अभिवादन केलं. तुम्ही मालक आहात म्हणून तुम्ही रांगेत पुढे व्हा, वगैरे असं कोणी काही बोललं नाही. ते त्यांच्यासाठी नेहमीचं असावं.
रतन टाटांचा नंबर आला तेव्हा त्यांनी आपलं जेवण वाढून घेतलं. आम्हीही वाढून घेतलं आणि पुन्हा एका टेबलावर गप्पा मारायला ते आमच्यासोबत बसले. त्यावेळी टायटनच्याच फॅक्टरीत सोन्याच्या पत्र्याने मढवल्या जात असलेल्या टाटा नॅनो गाडीबद्दल मी एक प्रश्न त्यांना विचारला. सर्वसामान्यांसाठी असलेल्या टाटा नॅनोला महागड्या सोन्याचा वर्ख का? अशा अर्थाचा तो प्रश्न होता. त्यावेळी त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात नॅनो आणि सोन्याबद्दल असलेल्या भावनेची सांगड कशी घातली गेली याचं विवेचन केलं होतं. ते प्रमोशन नॅनोचं नव्हतं तर टायटनने भारतीय सुवर्णालंकारांच्या पाच हजार वर्षांच्या ऐतिहासिक वाटचालीचा उत्सव साजरा करण्याचं ठरवलं होतं. अर्थात यात नॅनोचंही प्रमोशन झालंच.
रतन टाटांच्या साधेपणातलं मोठेपण उमजत जाणं, ही आयुष्यभरातली एक सुंदर आणि निरंतर प्रक्रिया होती. सार्वजनिक जीवनात साधेपणाचं सोंग घेणारे तसे खूप लोक पत्रकारितेच्या कारकीर्दीत भेटतात. पण रतन टाटांचं जमिनीवर असणं खूप वेगळं होतं. ते दिखाऊ नव्हतं.
नैतिकतेचं मोठं बळ टाटांकडे होतं. आणि त्यासाठी पक्की वैचारिक बैठक लागते. राज ठाकरे यांनी समर्थांचे शिवरायांसाठीचे शब्द घेऊन रतन टाटांनाही आधुनिक श्रीमंत योगी म्हटलं ते समर्पक आहे. कारण नैतिकतेच्या आधारावरच त्यांचं आत्मभान उभं राहिलं होतं. ते भान विश्वासार्हतेचं होतं. विश्वासार्हतेला त्यांनी आयुष्यात सर्वोच्च स्थान दिलं. घाम आणि अश्रू दोन्हींची किंमत त्यांनी विश्वासार्हतेसाठी मोजली.
बऱ्याचदा लोक सामाजिक काम करतात, ते उत्तरदायित्व किंवा समाजाचं देणं अशा देण्या-घेण्याच्या मानसिकतेतून. रतन टाटांमध्ये दडलेला जो ‘कर्ण’ होता त्याला दानशूरतेच्या व्यवहारी साच्यात बसवता येत नाही. समाजासाठी असलेली त्यांची अंतरीची कळकळ खूप मोठी होती.
नवनीतचे जितूभाई गाला यांच्यासोबत काम करत असतानाचा एक किस्सा आहे. रतन टाटांची अपॉइंटमेट घेऊन भेटायला गेले तेव्हा जितूबाई स्वतःच 82 वर्षांचे होते. भारतातल्या गरीब सामान्य विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक प्रयोगांची ऑडियो व्हिज्युअल्स बनवायची आहेत, असं जितूभाईंनी टाटांना सांगितलं. पण तेव्हा भारतात त्या दर्जाचं अॅनिमेशन तयार करणारे लोक नव्हते. त्यामुळे रतन टाटांच्या अॅनिमेशन संस्थेने हे बनवून द्यावं, अशी गळ जितूभाईंनी टाटांना घातली. तेव्हा ही संस्था केवळ आंतरराष्ट्रीय दर्जाचीच कामं घेत होती. विशेष म्हणजे रतन टाटांनी ती मान्य केली. अतिशय दर्जेदार अशी वैज्ञानिक प्रयोगांची अॅनिमेटेड ऑडियो व्हिज्युअल्स त्यानंतर गरीब विद्यार्थ्यांसाठी बनली. आणि ही सर्वप्रथम मराठीतच बनली हेही विशेष. ‘डोळ्यांचे कार्य’ हे पहिलं अॅनिमेशन मी जेव्हा पाहिलं तेव्हा मला काही मिनिटांतच डोळ्याचं कार्य कसं चालतं हे कळलं. तोपर्यंत मला ते प्रत्यक्षात उमगलं नव्हतंच. विज्ञान शिकणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी एखादी गोष्ट करायची म्हणून आपली महागडी यंत्रणा सहज वापरू देणं, तेही इतक्या विनासायास ही गोष्ट रतन टाटांच्या बाबतीतच होऊ शकते.
टाटांची वीज अनेक शासकीय तसेच पालिका रुग्णालयांसाठी अतिशय कमी दरात उपलब्ध असते. कारण टाटांनी वीज उत्पादनात खूप क्रांतिकारी पाउलं उचलली आहेत. नवीनीकरण ऊर्जेत (Renewable Energy) पवन आणि सौर दोन्ही क्षेत्रात टाटांनी बाजी मारली आहे. औष्णिक तसेच जलविद्युत ऊर्जा निर्मितीत टाटा प्रथमपासून आघाडीवर होते. मात्र दरम्यानच्या काळात वीजनिर्मितीत अनेक स्पर्धक उद्योगसमूह उतरले. त्यांनी वीज उत्पादनात गुंतवणूक करण्याऐवजी टॅरिफ फरकावर नफा मिळवण्याची नीती ठेवली. नैतिक अधिष्ठानाने व्यवसाय करणाऱ्या टाटांकडे अर्थातच रुग्णालये अधिक आशेने पाहतात. मात्र स्पर्धक कंपन्यांनी टाटा वीज कंपनीवर रुग्णालयांचे हे वीजदर वाढवण्यासाठी दडपण आणायला सुरुवात केली. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग पुढील वर्षी रजत महोत्सव साजरा करणार आहे. पण गेल्या 24 वर्षांत प्रथमच त्यांनी वीजदर वाढवण्यासाठी दडपण आणलं. टाटा वीज कंपनीने हे दडपण झुगारून न्यायालयात जाऊन निर्णयाविरुद्ध स्थगिती मिळवली. रुग्णालयांकडून लाखो युनिट वीज दरमहा वापरली जाते. त्यांच्या युनिटच्या वीजदरात एक रुपयांचा फरकही लाखो रुपयांचा खर्च वाढवू शकते. टाटांनी हे सामाजिक भान व्यवसायातही जपलेलं आहे. म्हणूनच देवानंतर डॉक्टरांच्या बरोबरीने रतन टाटांना मानणारे अनेक रुग्ण आपल्याला भेटतात.
रतन टाटांमधल्या उद्योगपतींपेक्षाही त्यांच्यातला कर्ण मोठा होता. पण त्या दानाचा त्यांनी कधी उत्सवी सोहळा होऊ दिला नाही. रतन टाटा नामक कर्णाच्या रथाचं चाक कधी कुठे रुतलं नाही. कारण रतन टाटांनी मानवतेच्या चाकावर उद्यमशीलतेचं रांजण उभं केलं. आता रतन टाटा काळाच्या चक्रात अज्ञाताच्या वाटेवर पुढे कुठेतरी गेले आहेत. त्यांच्या मानवतेच्या रांजणात पाणी कमी पडू न देण्याचं भान आपल्यालाच ठेवावं लागेल.