बेस्ट बसच्या भीषण अपघातांच्या घटनेच्या पश्चात चर्चा व नेमकं कशामुळे घडलं याची चिरफाड सध्या सुरू आहे. बेस्ट प्रशासनातल्या ताफ्यातल्या बसेसची आकडेवारीही येते आहे. एकूण गोळाबेरीज केल्यावर लक्षात येतं की, भाडेतत्वावरील बसगाड्यांचे अपघात अथवा दुर्घटना सर्वाधिक आहेत. या भाडेतत्त्वावरील बसबाबत प्रवाशांच्या आणि बेस्ट कर्मचाऱ्यांच्याही लेखी तक्रारी अनेक होत्या. पण त्याकडे प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केलं आहे. तीन वर्षांत 247 अपघात झालेत आणि त्यात 62 व्यक्तींनी जीव गमावला आहे.
‘एव्ही ट्रान्स’ या खासगी बस कंपनीकडून चालवण्यात येणाऱ्या बेस्टच्या बसच्या चालकाची कुर्ल्यातील अपघातात चूक होती का, हा पहिला मुद्दा. त्याची चूक होती हे सकृतदर्शनी प्रस्थापित झालंय. पण त्या चुकीचं विश्लेषण करताना त्याने चुकून ब्रेक समजून अॅक्सलेटरवर पाय ठेवला, असं एक अर्धसत्य माध्यमांमधून व्यक्त झालं. ते बहुधा पोलिसांच्या जबाबातून आलं असावं. जे ड्रायव्हिंग करतात त्यांना निश्चित समजू शकतं की, असं काही होत नाही. अॅक्सलरेटरची आणि ब्रेकची जागा तीच असते. त्यात ऑटोमोबाइल इंडस्ट्रीने बदल केलेला नाही. जो गाडी चालवायला शिकलाय तो सहजप्रेरणेने (इन्स्टिंक्टिव्हली) ब्रेकवर पाय देतो. त्याला कुणीही अपवाद असण्याचं कारण नाही. आपली सहजप्रेरणा ही लहान मेंदूच्या रिफ्लेक्सेसच्या पातळीवर काम करते. त्यासाठी मोठ्या मेंदूने विचार करून निर्णय घेण्याची आवश्यकता नसते. आणीबाणीच्या प्रसंगी बऱ्याचदा छोटा मेंदूच अर्धसेकंदात निर्णय घेतो आणि आपले रिफ्लेक्सेस त्याप्रमाणे कार्य करतात. त्यामुळे दीर्घकाळ चालक म्हणून काम केलेली व्यक्ती ही ब्रेक सोडून अॅक्सलरेटरवर पाय ठेवते आणि गाडी नियंत्रणाबाहेर जाते हे पटण्यासारखे नाही.
एखादा चालक जर नवीन गाडी चालवायला जातो तेव्हा तो नैसर्गिकरीत्या अधिक सावध असतो. कारण त्या गाडीचं यांत्रिक चलनवलन त्याच्यासाठी नवीन असतं आणि त्याचा सराव होईपर्यंत तो काळजी घेत असतो. पण म्हणून गर्दीच्या ठिकाणी एखादा चालक अॅक्सलरेटरवर पाय देऊन अत्यंत वेगाने भरधाव गाडी सोडत अनेकांना चिरडत जातो, तेव्हा त्याचा मेंदू सामान्य पातळीवर होता असं मानता येणार नाही. एकतर तो नशेत होता किंवा त्याची मानसिक स्थिती योग्य नव्हती. सदर चालकाने अपघात होण्याच्या आधी एका दुकानाजवळ थांबून मद्य घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी बघितल्याच्या बातम्या काही माध्यमांतून प्रसृत झाल्या आहेत. तसं जर खरोखर घडलं असेल तर चालकाच्या मेंदूच्या स्थितीबद्दल योग्य तपास होणं गरजेचं आहे.
सदर बस ही इलेक्ट्रिकल वेहिकल या प्रकारातली होती. इलेक्ट्रिकल वेहिकलला इंजिन नसतं. याप्रकारच्या वाहनामध्ये संचलनासाठी बॅटरी आणि मोटार एवढेच अंतर्गत भाग असतात. नेहमीच्या इंजिनवाल्या वाहनामध्ये गिअर्स असतात. पहिल्या गिअरला जास्त ताकद लागते. कारण स्थिर जडत्व अवस्थेतल्या गाडीला गतिशील बनवण्यासाठी इंजिनाला जास्त ऊर्जा लागते. मात्र अशा जास्त ऊर्जेमुळे गाडी बेचकीतल्या दगडासारखी उसळू शकते. गती मिळवताना असा बेचकी परिणाम होऊ नये, म्हणून इंजिनाच्या पहिल्या गिअरला अवरोध दिलेला असतो. त्यामुळे पहिल्या गिअरची ताकद जास्त असूनही गाडी धाडकन उसळत नाही. ह्या चक्राकार गतीच्या नियमन क्रियेला टॉर्क म्हणतात. गाडी सुरू करताना किंवा गिअर बदलताना पारंपरिक इंजिनामध्ये क्लच आणि अॅक्सलरेटरच्या नियमन संतुलनातून साध्य होते. क्लचद्वारे गिअर इंजिनापासून लांब जातो आणि नव्या गिअरची सिद्धता केल्यानंतर गाडीच्या वेगाची चालकाला जी उमज येते त्याप्रमाणे दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा गिअर टाकला जातो. मधल्या काळात आधुनिक तंत्रज्ञान आले आणि गाडीमध्ये कम्प्युटर चिप आल्या. आता तर अत्याधुनिक गाड्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्यानुसार वेगवेगळी सुरक्षा फीचर्स आली आहेत. सुरुवातीचे वेगाचे नियमन झाल्यानंतर आता इंजिनांमधला टॉर्क झपाट्याने म्हणजे काही सेकंदातच कमी होतो व गाडी काही वेळातच चांगला वेग पकडू शकते. ईव्ही गाड्या म्हणजे इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये इंधनाचे ज्वलन होत नसते. विद्युतभारामुळे ईव्ही गाडीमध्ये पिक टॉर्कचा परिणाम साध्य होतो. काही सेकंदातच इतर इंधन ज्वलन इंजिन गाड्यांपेक्षा इलेक्ट्रिकल वाहन कमी काळात अधिक वेग पकडू शकते. आता ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या गाड्या सुरुवातीचा अवरोध संपल्यानंतर वेगाने उसळू लागल्या आहेत.
इथेच अपघातांची शक्यता वाढते. एकदर इंजिन नसल्यामुळे ईव्ही गाड्यांना आवाज नसतो. गाडीने वारा कापल्याचा जो आवाज असतो, त्याची थोडी फार चाहूल रस्त्यावरच्या इतर गाड्यांच्या चालकांना लागू शकते. किंवा बेस्ट बससारखं मोठं धूड असेल तर त्याची एक सहजप्रेरणेने चाहूल लागते. परंतु इतर चालक इतर विचारांमध्ये किंवा मोबाइल फोनमध्ये व्यग्र असल्यास ईव्ही गाडीची चाहूल अजिबात लागत नाही. त्यामुळे बऱ्याचदा मोटारबाइक चालवणारे चालक बिचकतात.
मोठं धूड, ईव्हीमुळे गाडीच्या वेगामध्ये निर्माण झालेली पॉवर आणि आपण प्रशासनाची बेस्ट बस चालवत असल्याची मुजोरी याचा एकत्रित परिणाम बेस्ट चालकांच्या बाबतीत सर्वसामान्य रोज अनुभवत असतात. केवळ बेस्ट बसवालेच नाही तर अनेक स्कूलबसचे चालक, पालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या, आणि शेअर्ड टॅक्सी किंवा शेअरिंगवाल्या ऑटो यांच्या ठायीसुद्धा (वाहतूक पोलिसांच्या काणाडोळ्याने) ही मुजोरी दिसते.
बेस्ट चालकांच्या बाजूने विचार केला त्यांचीही अगतिकता आहे. बेस्ट बससाठी वेगळी लेन असण्याची संकल्पना असली तरी प्रत्यक्षात ती अंमलात येत नाही. ती असायला पाहिजे. दुचाकी स्वार आणि तिचाकी रिक्षा नियमांची पायमल्ली करत रोज मोकाट गाड्या चालवत असतात. त्यांचे जीव वाचवत मोठी बस चालवणं ही खरोखरच तारेवरची कसरत असते. मुंबईसारख्या ठिकाणी फुटपाथ दुकानदारांनी, फेरीवाल्यांनी व्यापलेले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावं लागतं. अनेक पादचारी विशेषतः महाविद्यालयीन मुल-मुली कानांमध्ये हेडफोन घालून चालतात. त्यांना रस्त्यावरच्या गाड्यांचे हॉर्न ऐकू येत नाहीत. अनेक ठिकाणी चुकीची पार्किंग केलेली आढळतात. बस चालवताना त्यामुळे अचानक लेन बदलावी लागते. अशा परिस्थितीत गाडी चालवताना बेस्ट चालकांचं ब्लडप्रेशर हाय आणि पित्त खवळलेलं असू शकतं.
एखाद्या अपघाताने हे सगळे प्रश्न ऐरणीवर येतात आणि कालांतराने पुन्हा मुंबईच्या रस्त्यावरच्या ट्रॅफिकमध्ये विरून जातात. जी गाडलेली असूनही चालते कशी असा प्रश्न संत कबीरांना पडला होता. म्हणूनच चलती का नाम गाडी असा वाक्प्रचार रूढ झाला असावा. मुंबई चालते कशी असा प्रश्ना आता आधुनिक मुंबईकरांना पडलेला आहे. देशभरात मुंबईची चलती असेलही पण मुंबईच्याच रस्त्यावर ती गाडलेली आहे.