कॅनडात खिलाडी नाही ‘खिलाडू’ हवेत

कॅनडातल्या हिंदू मंदिरावरची विध्वंसक प्रतिक्रिया आणि खलिस्तानी फुटीर मानसिकतेचा नवा आंतरराष्ट्रीय एल्गार कॅनडा आणि भारतीय संबंधांना तणावात घेऊन गेला आहे. पण खेळाच्या माध्यमातून फुटीर वृत्तींना या आधीही विराम देण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत.
[gspeech type=button]

ब्रॅम्प्टनमध्ये सार्वजनिक वीकेण्ड पार्ट्यांना चौकांमध्ये पंजाबी-हिंदी-गुजराती गाणी वाजत असतात. भारतीय चाट, शेवपुरी-पाणीपुरीची चंगळ असते. ब्रॅम्प्टनमध्ये फिरताना भारतात असल्याचा भास होत राहतो. सर्वत्र भारतीय वंशाचेच लोक दिसत असतात. पंजाबी शीख अर्थातच खूप मोठ्या संख्येने. ब्रॅम्प्टन हे कॅनडातल्या टोरोंटो या मेगा शहराचं उपनगर आहे हे जाणवत नाही.

शीख समुदायाची जी पुढची पिढी आहे, जी कॅनडातच जन्मली किंवा वाढली आहे त्यांच्यात भारतीयत्व अजिबात नाही. शीख धर्मसंस्कारत ते वाढलेत. पण त्यांना भारताने त्यांच्याकडून खलिस्तान नावाचा प्रांत अस्तित्वात येण्याआधीच हिरावून घेतलाय असं खात्रीने वाटत असतं. डॉलर्सच्या आर्थिक सुबत्तेसोबत एकेकाळी पंजाबातून कॅनडा व परदेशात इतरत्र स्थायिक झालेल्यांची नवी पिढी भारतीय असण्यापासून लांब गेली आहे.

खरं तर परदेशात पाकिस्तानी आणि बांग्लादेशी जरी भेटला तरी मायदेशीचा माणूस भेटल्याचं ‘भावा’बंधन तयार होतं. तर आपल्याच देशातल्या माणसाबरोबर दुजाभाव असण्याचं काही कारण असायला नको. पण निज्जर हत्येनंतर भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या सहभागाबद्दल थेट आरोप झाले आणि मग हे वातावरण कलुषित होत गेलं. त्याची परिणती परवा टोरोंटो येथे हिंदू सभा मंदिरावर शीख समुदायाच्या काही लोकांनी केलेल्या हल्ल्यात झाली. हे सगळं तत्कालिक नाही तर खूप साचलेल्या रागातून झालं आहे.

आधीच्या पंजाबी पिढीने कॅनडात खूप कष्ट काढले आहेत. नैसर्गिक स्रोतांची चंगळ, चांगलं उंची राहणीमान, कमी गर्दी, कष्टाच्या रोजगाराच्या विपुल संधी यासाठी भारतातून शीख समुदाय इंग्लंड आणि कॅनडाकडे गेल्या काही वर्षांमध्ये स्थलांतरित झाला. कष्ट करण्याची उपजत सवय आणि पंजाबी संस्कृतीशी घट्ट ठेवलेली नाळ यामुळे शीख समुदाय, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इथे घट्ट पाय रोवून उभा आहे. आर्थिक सुबत्तेमुळे आपोआपच पंजाबी रेस्टॉरण्ट, पंजाबी संगीत आणि इतर पंजाबी सभ्यतेला श्रीमंत आंतरराष्ट्रीय ग्राहक मिळाला आणि पंजाबी उत्पादने ग्लोबल झाली.

दरम्यानच्या काळात पंजाबी समुदायाच्या पावलावर पाउल ठेवून मोठ्या प्रमाणात गुजराती समुदायही कॅनडामध्ये स्थायिक झाला. व्यापारी नीती, गुजराती संस्कृतीशी जोडलेली नाळ, एकमेकांना धरून ठेवत विकसित होण्याची वृत्ती यामुळे गुजराती समुदायही लोकसंख्येने आणि आर्थिक श्रीमंतीने वाढू लागला.

खरं तर अपेक्षा होती की हे दोन्ही समुदाय आणि त्यांच्या जोडीला आयटी क्षेत्रात प्रभाव टाकणारा मराठी तरुणांचा समाज मिळून जागतिक पातळीवर चिनी प्रभावाला टक्कर देतील. परंतु 2014 साली नरेंद्र मोदींच्या उदयानंतर प्रामुख्याने गुजराती समाजाच्या तसेच इतर भारतीय हिंदू समाजाच्या सार्वजनिक वर्तणुकीमध्ये बऱ्यापैकी आक्रमकता आली. देश-परदेशात छोट्या छोट्या घटनांमध्ये त्याचे पडसाद दिसू लागले.

हरदीप सिंग निज्जर याची हत्या आणि या घटनेभोवती कॅनडा व भारताचे आंतराराष्ट्रीय संबंध ताणले गेले. सोशल मीडियावर याचे पडसाद उमटणं साहजिक होतं. या घटनेबाबत भारतीय इंटेलिजन्स संस्थांच्या स्लीपर एजण्टच्या कारवायांचे समर्थन करणाऱ्या पोस्ट काही भारतीय वंशाच्या लोकांकडून करण्यात आल्या. त्यावरून आंतरराष्ट्रीय पातळीवरील शीख समुदाय अस्वस्थ होत गेला. त्यानंतर हिंदू मंदिरांवर विध्वंसक प्रतिक्रियांचं प्रमाण वाढले.

जुलैमध्ये कॅनडातल्याच अॅल्बर्टा राज्यातल्या एडमंटन शहरात बॅप्स स्वामीनारायण मंदिरावर स्प्रे रंगाने धमकीवजा ग्राफिटी लिहिली गेली. त्यात भारतीय पंतप्रधान मोदी यांच्यासह कॅनडातील भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्या यांचंही नाव घेतलं गेलं. चंद्रा आर्या हे ओटावा पंजाबी असोसिएशनच्या तीव्र विरोधानंतरही निवडून आले होते. ते खलिस्तानवादी भूमिकेची निर्भत्सना करतात. त्यामुळे अर्थातच टीकेचे धनी होतात. ते कॅनडियन संसदेत कन्नड अस्मितेचा पुरस्कार करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सनातन ध्वज उभारल्याबद्दल ते वादग्रस्त झाले होते.

यंदा ऑगस्ट महिन्यात ब्रिटिश कोलंबिया या राज्यामध्ये सरी या शहरामध्ये लक्ष्मी नारायण मंदिरावर ‘वॉण्टेड’ यादीत भारतीय नेतृत्वाचे फोटो असलेले खलिस्तानी पोस्टर्स लावलं गेलं. या शहरातच हरदीप सिंग निज्जरची हत्या झाली होती. ब्रॅम्पटन आणि सरी ही दोन्ही शहरं कॅनडाच्या दोन टोकांना आहेत. विमानानेही या दोन शहरांमध्ये प्रवास करायला सहा तास लागतात. पण आधुनिक संपर्क साधनांमुळे आता अंतरांना काही अर्थ राहिला नाही. अशा विध्वंसक प्रतिक्रिया कॅनडामध्ये नित्याच्या झाल्या आहेत. परंतु, थेट हिंदू भाविकांवर हल्ला केला जाईल आणि ती घटना इतकं राजकीय वळण घेईल यांची कॅनडीयन आणि भारतीयांना कल्पना नव्हती.

कॅनडातील शीख समुदायातील सेकंड जनरेशनच्या मनात भारतीयत्वाबद्दल निर्माण झालेली अढी हे एक नवी समस्या आहे. धार्मिक उत्सवी आक्रमकता या अढीला आणखी तीव्र करते. कॅनडा या देशाला स्वतःची अशी वेगळी संस्कृती नाही. त्यामुळे सर्व धर्मियांच्या आणि सभ्यतांच्या संस्कृतीला ते आपलंसं करतात. कॅनडातील मूलनिवासींना ते ‘फर्स्ट नेशन्स पीपल’ म्हणतात. परंतु तरीही मूळ ब्रिटिश आणि फ्रेंच गोऱ्या संस्कृतीपेक्षा जुने वा नवे इतर लोक वरचढ ठरणार नाहीत, याची ते काळजी घेतात.

आधुनिक काळात खलिस्तानच्या फुटीर विषयाने नाहक डोकं वर काढलं आहे. भारतात सत्तर-ऐंशीच्या दशकात खलिस्तानवादी फुटीर चळवळ उभी राहात होती तेव्हा पतियाळातील क्रीडा विकासाचं केंद्र सर्वात पोळलं होतं. त्या कालखंडात अनेक खेळाडूंचं स्वप्न असायचं की पतियाळात जाऊन योग्य प्रशिक्षण घेऊऩ स्पोर्ट्समध्ये करिअर करावं. फुटीर चळवळीने उग्र रूप धारण केलं आणि हा कालखंड क्रिकेट सोडून इतर क्रीडाविश्वासाठी अंधारमय ठरला.

विशेष भाग म्हणजे पुढे राजीव गांधींच्या कालखंडात या खेळाडूंमार्फतच या फुटीर चळवळीला शांत केलं गेलं. ही कामगिरी राजीव गांधींनी शरद पवारांना दिली होती. शरद पवारांनी पंजाबमधील विविध खेळांच्या संघात जवान पेरून त्यांच्या मार्फत अतिशय नाजूकपणे हा विषय हाताळत फुटीर वृत्तीचं दमन करून भारतीयत्वाची मानसिकता पुन्हा विकसित केली. या कालखंडात हॉकी व इतर अॅथेलिट खेळांच्या माध्यमातून यथावकाश खलिस्तानवादी फुटीरता विराम घेती झाली.

कॅनडामध्ये मात्र दुर्दैवाने खेळाच्या माध्यमातून सोशल इंजिनीअरिंग करणारं कुणी नाही. खेळ यासाठीच महत्त्वाचे असतात. तरुणाईची रग खेळाच्या माध्यमातूनच शांत होते. त्यामुळे हिंसेपासून तरुण परावृत्त होतात. खेळात खिलाडू वृत्ती विकसित होते. खिलाडू वृत्ती म्हणजे हरणं स्वीकारणं. खेळात कधी जय होतो, कधी पराजय. पराजय स्वीकारणं तरुणांना खेळाच्या माध्यमातून शिकता येतं. आधुनिक जागतिक पातळीवर तरुणांमध्ये केवळ विजीगीषु वृत्ती आली. पण हरणं किंवा स्वेच्छेने माघार घेणं, पराभवाचा स्वीकार करणं राहून गेलं.

कॅनडातील भारतीय वंशाचे तरुण ‘खिलाडी’ असतीलही, पण त्यांना ‘खेळाडू’ आणि ‘खिलाडू’ बनवणं ही नवी नीती अंगिकारण्याशिवाय पर्याय नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

संघ परिवारातील विविध संघटनांतील लोकांची वक्तव्ये आता अंतर्विरोध दाखवू लागली आहेत. संरसंघचालक मोहन भागवत तर अतिवाद सोडून संयमित धर्माचरणाकडे निर्देश
Onion market: नाशिकचे ज्येष्ठ नेते सध्या नाकाने कांदे सोलतायत. राज्यातील सन्माननीय ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मंत्रिपदाच्या मानापमान नाट्यात ‘दिल की
महाराष्ट्र विधिमंडळातले सर्वात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना 77 व्या वर्षी पुन्हा समतेचा सूर सापडलाय का? आव्हानात्मक काळात सारेच भुजबळांची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ