मेरे दोस्त, मेरे दुश्मन, मेरे हमसाए

बंदुक साफ करताना नृत्यनिपुण असलेल्या हीरोच्या हातून गोळी सुटते आणि ती पायात घुसते. पोक्सो गुन्ह्यातला आरोपी पोलिसाचं पिस्तुल हिसकावतो. त्याची गोळी मात्र पोलिसाच्या; मांडीत घुसते. घुस के मारेंगे. असं नेते उगा म्हणत राहतात. काहींचा निर्देश प्रार्थनास्थळांकडे, तर काहींचा पाकिस्तानकडे.
[gspeech type=button]

पाकिस्तानात घुसण्याचे भारतीयांचे मनसुबे जुनेच. मराठी माणसांची भीमथडी तट्टं तिकडे अटकेपार झेंडे लावून आली. पाकिस्तानातला पहिला सर्जिकल स्ट्राइक मराठ्यांनीच केला असं म्हणायला जागाय.

पाकिस्तान म्हटलं की, युद्धाचे बिगुल वाजवायला एका पायावर तयार. युद्ध नावाचे महागडे कांदे नाकानेच सोलावे लागतात. सर्जिकल स्ट्राइक म्हटला की ऊर अभिमानाने भरून येतो. राजकारणातला रोमँटिक गुलाबी रंगही फिका वाटायला लागतो. लोक तिरंगा फडकावून देशभक्तीपर जय हिंदचा नारा देऊ लागतात.

पण संरक्षण मंत्र्यांना तसं वाटत नाही. त्यांना मधेच पाकिस्तान दुश्मन नाही तर दोस्त वाटायला लागतो. बॉर्डर सिनेमातलं गाणं त्यांना आठवतं…

मेरे दुश्मन, मेरे भाई, मेरे हमसाये
मुझसे तुझसे, हम दोनों से ये जलते घर कुछ कहते हैं
बर्बादी के सारे मंजर कुछ कहते हैं

जेअँडकेमध्ये संरक्षण मंत्री म्हणाले, “ऐ मेरे पाकिस्तान के दोस्तो, क्यो दूरी बना के रक्खी है?”
“जिंदगी में दोस्त बदल जाते है, लेकिन पडौसी कभी नही बदलते.”
हे वाक्य अर्थातच अटल बिहारी वाजपेयींचं.

राजनाथ सिंह यांनी परवा जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानला मदत करण्याची भाषा केली. ते म्हणाले, “ज्या निधीसाठी पाकिस्तान इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाची याचना करतो, त्यापेक्षा किती तरी जास्त निधी भारत सरकारने जम्मू-काश्मीरसाठी उपलब्ध करून दिला आहे.”

पाकिस्तानकडे एक बोट दाखवलं की मिटलेल्या चार बोटांची दिशा निवडणुका दाखवतात. हा तसा प्रस्थापित सिद्धांत. पण जम्मू-काश्मीरच्या निवडणुकांमध्ये पाकिस्तानशी सहयोगाची भाषा अनेकांच्या भुवया उंचावून गेली. राजनाथ सिंह ‘खूप आधीपासून पाकिस्तान या शेजाऱ्याशी सहयोगाची भूमिका मांडत आहेत. आपण चर्चेला नेहमीच तयार असतो असा आविर्भाव. पण यावेळी विधान वेगळं होतं. शेजारी देशाला आपली दानत किती याचा दिखावा करत जगासमोर त्यांची कीव करणं ही स्ट्रॅटेजी. “यह नया हिंदोस्ताँ है” असंही सांगायला ते विसरले नाहीत.

पाकिस्तानची अवस्था कर्जबाजारी. पण पाकिस्तान विकलांग होणं भारताला परवडणारं नाही. शेजारी देश आर्थिक स्तरावर कोलमडून पडणं चांगलं नाही. श्रीलंका आणि बांगलादेश अस्थिर. पाकिस्तानची अवस्था बिकट. अशा अवस्थेचा फायदा चीन सारखा बलाढ्य दुश्मन घेऊ शकतो. म्हणूनच पाकिस्तानसोबत ‘लोन’देनची भाषा सुरू झाली असावी.

यह नया हिंदोस्ताँ है, असं म्हणाले कारण, कोविड कालखंडात जम्मू-काश्मीरच्या रियासी परिसरात भूवैज्ञानिक सर्वेक्षणात 59 लाख टन लिथिय़मचा साठा सापडला. यापेक्षा अधिक साठा पाकिस्तानव्याप्त भूमीवर असण्याचीही शक्यता. हा साठा नुस्ता लिथिअमचा नाही, त्यात रेअर अर्थ एलेमेंट्सही आहेत. लिथिअमसोबत हे रेअर अर्थ रासायनिक घटक मोठी खनिज उपलब्धता मानली जाते. रेअर मेटलमध्ये नियोडायमिअम नावाचं रासायनिक मूलद्रव्य हे इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक्स तसेच संपर्क उपकरणात वापरलं जातं. मोबाइल फोन, विमानं, मिसाइल्स, उपग्रह, पाणबुड्या, सोनार यंत्रणा यात हे रेअर अर्थ एलेमेंट्स वापरलं जातं. त्याचा मोठा साठा आणि एक्स्ट्रॅक्शन सुविधा चीनकडे आहे. आणि चीन जगाला 60 टक्के रेअर मेटल पुरवतो. चीनने जर हा साठा रोखून धरला तर सगळ्या जगाचा कारभार ठप्प होऊन जाईल. इतकं या अल्पांश खनिज द्रव्यांचं महत्त्वं.

नव्या सामरिक नीतीत लिथिअम आणि रेअर अर्थ एलेमेंट्स साठ्याचे संरक्षण ही महत्त्वाची बाब झाली. भविष्यात भारत लिथिअम बॅटरीज आणि सौर ऊर्जा तसेच इलेक्ट्रिक वाहन उद्योगात मोठी झेप घेऊ शकतो. त्यासाठी पाकिस्तानला पूर्णपणे अंकित करून घेण्याची नवी नीती अवलबंणे गरजेचं. सार्क परिषदांमधील पाकिस्तानचा असहयोग सुरू राहिल्याने बंगालच्या उपसागराशी निगडित देशांची बिमस्टेक तसेच भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया या क्वाड देशांची इण्डो-पॅसिफिक क्षेत्रातल्या सहयोगाची नवी जुळणी सुरू झाली. संवादही सुरू आहे. यात चीन आणि पाकिस्तानला शह देण्याची नीती राबवली जात आहे.

त्यामुळेच आपल्या दुश्मनांना दोस्त संबोधून नंदनवनाच्या पाताळातलं रेअर मेटल अर्थात काश्मीरच्या धरेखालची दुर्मिळ रासायनिक संयुगं प्राप्त करेपर्यंत तरी पाकिस्तातनला हमसाया म्हणून आंजारावं-गोंजारावं लागणार यात शंका नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

संघ परिवारातील विविध संघटनांतील लोकांची वक्तव्ये आता अंतर्विरोध दाखवू लागली आहेत. संरसंघचालक मोहन भागवत तर अतिवाद सोडून संयमित धर्माचरणाकडे निर्देश
Onion market: नाशिकचे ज्येष्ठ नेते सध्या नाकाने कांदे सोलतायत. राज्यातील सन्माननीय ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मंत्रिपदाच्या मानापमान नाट्यात ‘दिल की
महाराष्ट्र विधिमंडळातले सर्वात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना 77 व्या वर्षी पुन्हा समतेचा सूर सापडलाय का? आव्हानात्मक काळात सारेच भुजबळांची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ