मेळाव्यातील दर्दी, गर्दी आणि हमदर्दी

Dasshera Melava : गर्दीचं मानसशास्त्र झुंडशाहीच्या टीकेसोबत रसिकाग्रहणाचा किंवा अभिरुचीचे वेगळे अंतरंग दाखवते. गर्दीच्या मनाला शिस्त लावण्याचे प्रयोग संस्कृतीत वेगवेगळ्या वळणावर घडत आलेत. शिवतीर्थावरच्या मेळाव्यातल्या श्रोत्यांचं मन आता तसं एकजीव होत नाही. कारण या दर्दीतला हमदर्दी रसिक प्रेक्षकच हरवलाय.
[gspeech type=button]

दसऱ्याच्या मेळाव्यातली जंगी भाषणं उद्या होतील. शिवतीर्थ, आझाद मैदान विक्रमी गर्दीचे आकडे चढवून सांगितले जातील. कुणी भाड्याने माणसं आणली आणि कुणाच्या भाषणासाठी स्वतःहून लोक आले याचे आरोप-प्रत्यारोप होतील. आपल्यासाठी ते मनोरंजनात्मक असेल.

पण ज्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरच्या सभा ऐकल्या आहेत त्यांना तिथल्या श्रोत्यांचा तो धडकी भरवणाऱ्या गगनभेदी घोषणा आजही कानांमध्ये ऐकू येत असतील. पण आता तो पूर्वीसारखा रोअर ऐकू येत नाही. नेत्रदीपक नेपथ्याच्या ताम-झाममध्ये आणि दिव्यलोकांत आल्यासारख्या प्रखर प्रकाशझोतांमध्ये श्रोते हरवलेत. बऱ्याचदा या सभा आणि मेळाव्यांमध्ये सुरक्षिततेच्या कारणांमुळे व्यासपीठ एवढं लांब असतं की, नेतेमंडळी दिसतच नाहीत. आसपास लावलेल्या स्क्रीनवरच त्यांना पाहून समाधान मानावं लागतं. नेत्यांचा आवाज डॉल्बी सिस्टिममधून सुस्पष्ट ऐकू येत असतो. तरीही नेते का कुणास ठाऊक गळ्याच्या शिरा ताणून बोलत असतात. पण तो माहौल, तो युफोरिया, तो टाळ्यांचा कडकडाट, तो शिट्ट्यांचा आवाज, तो घोषणांचा गगनभेदी घोंघारव आता ऐकू येत नाही. श्रोत्यांचं सामूहिक मन आता एलईडी स्क्रीन, फेसबुक किंवा युट्युब लाइकच्या बदामांमध्ये हरवून गेलं आहे.

सामूहिक मन आणि झुंडीचं मानसशास्त्र यातली सीमारेषा तशी धूसर आहे. गर्दीचं मन असतंच. आपण एखाद्या प्रसंगाला आपण वैयक्तिक पातळीवर वेगळे वागतो आणि गर्दीत आपली वागणूक वेगळी असते. गर्दीमध्ये आपण स्वतंत्रपणे विचार न करता एकमेकांच्या विचाराने आणि भावनांमुळे प्रेरित होतो. गर्दीत असताना निर्णयक्षमता, आत्मभान आणि जबाबदारी जाते गर्दीच्या भावना आपल्यावर हावी होतात.

गर्दीत लोक एकमेकांचं अनुकरण करतात. कळपाची मानसिकता असल्यामुळे सगळे जे करतील तेच आपण करू लागतो. गर्दीचं मन आपल्याला स्वीकारावं लागतं. आपली जबाबदारी कमी होते. इतर लोकं आपल्याला सांभाळून घेतली ही भावना वाढीस लागते. थोडं हट के वागायला निमित्त मिळतं आणि तरीही आपण जे वागलो ते कुणाला कळणारच नाही याची खात्री वाटते. प्रतिसाद तीव्र बनतात. जे काही बोलू त्याची जबाबदारी नसल्यामुळे योग्य निर्णयाची आवश्यकता राहत नाही. वागणूक तर्कहीन होते. नियंत्रण निघून जातं आणि गर्दीचा भावनिक जोश वरचढ ठरतो.

पूर्वी लढाईतल्या योद्ध्यांचं सामूहिक मन सेनापतीप्रमाणे वेगवेगळं परिणाम करायचं. त्यानुसार काही लढाया जिंकल्या वा हरल्या गेल्या आहेत. त्या लढायांमधल्या सेनापतींनी त्यांच्या सैन्याच्या सामूहिक मनावर कसा आणि किती कब्जा घेतला होता त्यावर हे यशापयश ठरायचं.

लढाईत सामूहिक समन्वय महत्त्वाचा ठरला. म्हणून कवायत आणि डोळे झाकून ऑर्डर पाळणं महत्त्वाचं झालं. सिंक्रोनायझेशन हा भाग पुढे गर्दीला दिशा लावायला विकसित झाला. नृत्याच्या प्रॅक्टिसमधून हे सिंक्रोनायझेशन दृढ केलं जातं. लेजिम, गरबा, भांगडा यासारख्या सामूहिक सामाजिक नृत्यांमध्ये सिंक्रोनायझेशन म्हणजे समन्वयाचं सूत्र असतं. त्यातूनही सामूहिक मनाला दिशा मिळते.

कारवाँ किंवा तांड्यातून चालतानाही हे सामूहिक मन दिसतं. कळपातून एक दिशा धरून चालणे हेही आपल्या जनुकांमध्ये आहे. ही वृत्ती वारीमध्ये उफाळून येते आणि आपल्याला अपूर्व आनंद अनुभवाला येतो.

पण आधुनिक तंत्रज्ञानाने या सामूहिक समन्वयाच्या दिशेसाठी मनांचं एकत्र येणं बाद करून टाकलं आहे. आपण ऑनलाइन एकत्र येतो पण त्यात तो समन्वय शक्य होत नाही.

समन्वयाच्या पुढे रसिक म्हणून आस्वादातही हे सामूहिक मन खूप आवश्यक असतं. मैफली, भाषणं, नाटक, तमाशा आपण एकत्र प्रेक्षक म्हणून पाहणं आणि वैयक्तिक पातळीवर पाहणं यात अभिरुचीत खूप बदल होत जातो. शिट्ट्या-टाळ्यांच्या गजरात, फेटे उडवत लावणीचा आस्वाद घेणाऱ्यांना टीव्हीवरची लावणी एवढी सुखावेल याची खात्री देता येत नाही. विनोदाचा आस्वाद तर त्या टवाळांच्या पातळीवर घ्यायचा असेल तर तो एकत्रितच घ्यावा लागतो. एकट्याने कितीही ग्रेट स्टँड अप कॉमेडी बघितली तरी ती तुम्हाला तो एकत्रितपणाचा आनंद देत नाही.

आचार्य अत्रेंच्या सार्वजनिक भाषणाची ध्वनिमुद्रणं उपलब्ध आहेत. हजारो लोकांच्या उपस्थितीतीला विनोदाच्या आधाराने ते बांधून ठेवत. गडगडाटी हास्यकल्लोळ म्हणजे काय हे या भाषणांच्या ध्वनिमुद्रणातून आजही जाणवतं. काही विनोदाला एवढे सगळे लोक का हसत होते हे आज लक्षात येत नाही. कारण आपण आज ध्वनिमुद्रण जरी ऐकत असलो तरी त्या सामूहिक मनाचा भाग नसतो.

पिटातल्या लोकांसोबत बसून नाटक बघणं, मैफिल ऐकणं हा एक लोकविलक्षण अनुभव असतो. अगदी ज्यांनी शिट्ट्या-टाळ्यांच्या आवाजात मॅटिनी शो बघितलेत त्यांनाही ते लक्षात येईल. ‘काली टोपी लाल रुमाल’ नावाचा सिनेमा मॅटिनी शो साठी मराठा मंदिरला लागायचा. कुठलीही जाहिरात न करताही हा सिनेमा लागला की थिएटर भरून जायचं. मात्र या सिनेमातली गाणी सुरू झाली की थिएटरमध्ये लोक पैसे फेकायचे. 40 च्या दशकातला सिनेमा मात्र 80 च्या दशकातही या सिनेमाला थिएटरमध्ये पैसे पडायचे. पैसे म्हणजे किती तर पाच पैसे किंवा दहा पैशांची नाणी. हे पैसे फेकणं हा युफोरिया ज्यांनी अनुभवला त्यांना आजच्या काळात हा सगळा माहौल मिस केल्यासारखं वाटत असणार.

स्फुरण चढणं किंवा युफोरिया तयार होणं यासाठी माणसं प्रत्यक्ष एकत्रित येणं आवश्यक असतं. जे समाज सामूहिक नृत्यात सहभागी होतात त्यांचं बॉण्डिंग चांगलं असतं. गुजराती, पंजाबी लोकांच्या संस्कृतीतच सामूहिक नृत्यं आहे. आदिवासी एकत्र नृत्य करतात. आपण मात्र आपल्या शिष्टाचारात आपले सामूहिक परंपरागत नृत्य हरवून बसलो.

आता पॉडकास्ट किंवा ऑनलाइन सभा घेण्याकडे नवा कल आहे. तिथे विक्रमी आकडेवारी मिळेलही. पण ज्याला फोर्थ वॉल ब्रेक करणं म्हणतात ते घडत नाही. फोर्थ वॉल म्हणजे नाटकातल्या व्यक्तिरेखा आणि प्रेक्षक यांच्यातली एक अदृश्य भिंत. ती भेदून बऱ्याचदा प्रेक्षकांशी संवाद साधला जातो. जाहीर सभांमध्ये तेच अपेक्षित असतं. अनेक कलावंतांना किंवा वक्त्यांनाही समोर टाळ्या वाजल्या नाहीत किंवा हंशा मिळाला नाही तर संवाद साधल्याचं समाधान मिळत नाही.

ही चौथी भिंत भेदण्यासाठी उरलेल्या तीन भिंतीच्या समोरला सामूहिक मनाने रसिकाग्रहण करणारा दर्दी प्रेक्षक मात्र हरवलाय.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

संघ परिवारातील विविध संघटनांतील लोकांची वक्तव्ये आता अंतर्विरोध दाखवू लागली आहेत. संरसंघचालक मोहन भागवत तर अतिवाद सोडून संयमित धर्माचरणाकडे निर्देश
Onion market: नाशिकचे ज्येष्ठ नेते सध्या नाकाने कांदे सोलतायत. राज्यातील सन्माननीय ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मंत्रिपदाच्या मानापमान नाट्यात ‘दिल की
महाराष्ट्र विधिमंडळातले सर्वात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना 77 व्या वर्षी पुन्हा समतेचा सूर सापडलाय का? आव्हानात्मक काळात सारेच भुजबळांची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ