त्यागस्वरूप राजकारण

Maharashtra Assembly election : कॉम्प्रमाइज हा तर खूप मोठा त्याग. महाराष्ट्रातल्या बारा कोट जनतेने चांगल्या पायाभूत सुविधांचा त्याग केलाय, खड्डामुक्त रस्त्यांचा त्याग केलाय, कोंडीमुक्त वाहतुकीचा त्याग केलाय, अन्न सुरक्षेचा त्याग केलाय, भ्रष्टाचारमुक्त समाजाचा त्याग केलाय, चांगल्या शिक्षणव्यवस्थेचा त्याग केलाय.
[gspeech type=button]

राजकारणावर उपहासात्मक लिहिणं सोपं. काही वेळा राजकीय लोक असं काही बोलतात की यावर आता काय उपहासात्मक लिहावं, अशी गोची करून टाकतात. कालचीच गोष्ट घ्या.

महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीत त्यागाची गोष्ट निघाली… आणि त्यागाची बात निकली तो बहुत दूर तलक जायची ती गेलीच. जागा वाटप बैठक म्हणजे आपल्या लोकलसारखी गत नसते. जरा सरकून घ्या म्हणत चौथी सीट तडजोडून घ्यायला. त्यामुळे कुणाला ना कुणाला तरी त्याग करावाच लागतो. कुणी तात्पुरतं त्याग करतं, कुणी भविष्यातल्या आशेवर त्याग करतं. तर कुणी सहन करण्याशिवाय गत्यंतरच नाही म्हणून त्याग करत असतं.

केंद्रीय गृहमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनी महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून त्यागाचा संदर्भ देत काही उद्गार काढल्याचे ऐकिवात आले. या इन कॅमेरा बैठकीत ते असं म्हणाल्याचं समजतं की, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद तुम्हाला देताना भाजपाच्या नेत्यांनी मोठा त्याग केला.

हा असा फुलटॉस आल्यावर त्यावर लगोलग शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी सिक्सर लगावला. ते म्हणाले, भाजपाने जसा त्याग केला, तसाच त्याग आम्ही देखील केलाय. उलट आम्ही केलेल्या त्यागामुळे महायुतीची सत्ता राज्यात आली.

अर्थात त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी असं काही बैठकीत घडलं नाही हे स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही टेबल स्टोरी असल्याचं सांगितलं आणि माध्यमांनी या बातमीचा त्याग करावा असं सुचवलं. माध्यमं किती त्यागी आहेत ते आपल्या सगळ्यांना माहीतच आहे.

त्यागाची व्याख्या आजकाल खूप अवघड झाली आहे. आपली आई ही त्यागमूर्ती असतेच. पण ती सोडली तर आपल्या आसपास त्यागमूर्ती दिसणंच बंद झालं होतं. पण मुख्यमंत्री पदाचा त्याग ही एक महत्त्वाची त्यागाची परिभाषा आहे. आणि त्याभोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरत आहे.

तुम्हाला आठवत असेल की वर्षा बंगल्याचा त्याग करताना फडणवीस कुटुंबियांच्या मनावर किती मणाचे दगड आले होते ते. या त्यागातूनच ‘मी पुन्हा येईन’ या ऐतिहासिक वाक्याची घोषणा झाली. त्यांच्यासोबत भाजपाच्या अनेक लोकप्रतिनिधींना त्यागभावना म्हणजे काय असते याची जाणीव झाली.

त्याच कालखंडात उद्धव ठाकरे यांनी युतीत सडण्याच्या भावनेचा त्याग केला. त्यांनी तर कोविड कालखंडात मातोश्रीवरच राहून वर्षा निवासस्थानाचा आणि मंत्रालयातील सहाव्या मजल्याचा त्याग करण्याची भूमिका घेतली होती.

या खूप साऱ्या त्यागाची परिणती राजकीय सुडात झाली. ज्या शिवसेना पक्षाच्या भुजबळांसारख्या नेत्यालाही जय महाराष्ट्र म्हणताना लपतछपत बाहेर पडावं लागायचं. त्या शिवसेनेची उघड उघड शकलं होऊन. यावेळी त्याग महाराष्ट्राचा… मराठी अस्मितेचा होता.

या उठावाचे मास्टरमाइंड यांनी ज्या पुन्हा येईन विधानाचा त्याग केला होता, त्यांना पुन्हा येता येता मुख्यमंत्रीपदाचा त्याग करावा लागला. सांप्रतचे मुख्यमंत्री शिंदेंनी नेमका काय त्याग केला ते कळलेलं नसलं, तरी सततच्या उपेक्षेचा त्याग केला असं मानायला जागा आहे. अजितदादा पवार यांनी कृपाछत्राचा, घड्याळाच्या कोंदणाचा त्याग केला.

आता निवडणुकांचे बिगुल वाजू लागल्यावर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा मविआच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा त्याग केला. बाकी उरलेले महाराष्ट्रातले पंधरा-वीस असे स्टालवर्ट नेते आहेत की ज्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा कायमस्वरूपी त्याग केला आहे.

तर असं हे महाराष्ट्रातल्या त्यागमूर्तिंचं समर्पण. खासगीत लोक सांगतात अमित शाहंनी वापरलेला शब्द होता कॉम्प्रमाइज. कॉम्प्रमाइज हा तर खूप मोठा त्याग.

आम्ही चांगल्या पायाभूत सुविधांचा त्याग केलाय, आम्ही खड्डामुक्त रस्त्यांचा त्याग केलाय, आम्ही कोंडीमुक्त वाहतुकीचा त्याग केलाय, आम्ही अन्न सुरक्षेचा त्याग केलाय, आम्ही भ्रष्टाचारमुक्त समाजाचा त्याग केलाय, आम्ही चांगल्या शिक्षणव्यवस्थेचा त्याग केलाय.

हे कॉम्प्रमाइज महाराष्ट्रातल्या बारा कोट जनतेने केलं आहे.

तर खरंच सांगा… खरे त्यागमूर्ती कोण?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

संघ परिवारातील विविध संघटनांतील लोकांची वक्तव्ये आता अंतर्विरोध दाखवू लागली आहेत. संरसंघचालक मोहन भागवत तर अतिवाद सोडून संयमित धर्माचरणाकडे निर्देश
Onion market: नाशिकचे ज्येष्ठ नेते सध्या नाकाने कांदे सोलतायत. राज्यातील सन्माननीय ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मंत्रिपदाच्या मानापमान नाट्यात ‘दिल की
महाराष्ट्र विधिमंडळातले सर्वात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना 77 व्या वर्षी पुन्हा समतेचा सूर सापडलाय का? आव्हानात्मक काळात सारेच भुजबळांची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ