बाकरवडी हा मूळ गुजराती पदार्थ आहे. हो, चितळेंनीच एका मुलाखतीत हे सांगितलं. गुजरात्यांची व्यापारी वृत्ती अंगीकारून या बाकरवडीचं चितळेंनी असं काही रूपांतर केलं की ही बाकरवडी महाराष्ट्राची आणि चक्क पुण्याची झाली. आज ती पुण्याच्या चितळ्यांची बाकरवडी म्हणून जगावर राज्य करते आहे. थोडक्यात काय तर व्यापारी वृत्ती ही काही गुजरात्यांची मक्तेदारी नाही. उलट गुजरात्यांचीच बाकरवडी व्यवस्थित मार्केट करून एका मराठी कुटुंबाने जागतिक स्तरावर खाद्य उत्पादन म्हणून यशस्वी केली.
मराठी – गुजराती संघर्ष
विषय बाकरवडीचा नाही. गुजराती वि. मराठी अशा सुप्त संघर्षाचा आहे. त्याला हवा देण्याच्या राजकारणाचा आहे. मागच्या वर्षी तृप्ती देवरुखकर यांना मुलुंडमध्ये मराठी असल्या कारणाने घर नाकारलं गेलं. अनेकजण यावर व्यक्त झाले. तृप्ती देवरुखकर या काही काळासाठी का होईना, मराठी माणसाचा आतला आवाज झाल्या. ‘मुंबई तुमची, भांडी घासा आमची’ या घोषणेवरची खपली निघाली. वेदना भळाभळा वाहू लागली.
राजेंनी सुरत ‘लुटल्या’ची घटना ऐतिहासिक. त्या वादाला ‘गुजराती विरुद्ध मराठी कलागतीची’ वर्तमानातली फोडणी. सुरत म्हणजे गुजराती आणि मुंबई म्हणजे मराठी. संस्कृतींची अशी एक सोपी विभागणी. त्याचं फायदेशीर नॅरेटिव तयार करून राजकीय ध्रुवीकरण होतंय का, याचे मिठाचे खडे लोक टाकत असतात. निवडणुकांमध्ये हा कळीचा मुद्दा बनू शकतो, अशी विश्लेषणं खासगीत सुरू असतात. त्याला खतपाणीही घालण्याचं काम सोयीनुसार राजकीय पातळीवर सुरू असतं.
आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर मांडणी केली आहे की, व्हायब्रंट गुजरातसाठी महाराष्ट्राच्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र या आपल्या व्यापारी संकल्पनेला तिलांजली दिली. महाराष्ट्रातले भाजपा आणि त्यांच्या सोबतचे महायुतीतले घटक पक्ष हे गुजरातच्या फायद्यासाठी महाराष्ट्राचे आर्थिक नुकसान करत आहेत, असा ग्रह समाजामध्ये पेरला जात आहे. गुजराती वि. मराठी सुप्त वा गुप्त संघर्षाचं घोंगडं भिजत राहील. पण मुंबई शहराचा विकास मात्र आमच्यामुळेच झाला असं एक फेक नॅरेटिव्ह गुजराती समाजाकडून पसरवलं जात आहे, त्याचा मात्र परामर्श घेणं भाग आहे.
गुजराती विरुद्ध मराठी हा संघर्ष केवळ राजकीय हवाबाजीचा नाही. इतरांच्या बाबतीत होतो तसा या संघर्षाला स्थानिक विरुद्ध परके असा संदर्भही देता येत नाही. स्वातंत्र्योत्तर काळात मराठी – गुजराती द्विभाषिक बॉम्बे प्रॉव्हिन्सच्या प्रस्तावानंतर ही ठिणगी पडली. बॉम्बेचं आर्थिक राजधानी असणं वरचढ ठरलं आणि तिच्या सोबत गुजरात आणि महाराष्ट्र हे प्रांत संघर्षात ओढले गेले. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र’ या मागणीपासून गुजरात आणि महाराष्ट्राच्या संबंधात कडुसं आलं. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात 107 हुतात्म्यांचं बलिदान झालं. आता इतक्या वर्षांनी नव्या इन्स्टा पिढीला त्याचं विस्मरणही झालं.
मुंबईच्या जडण-घडणीत मराठी माणसांचं योगदान
गुजराती समाजाने मुंबई शहराचा व्यापारी फायदा भरपूर कमावला. पण मराठी उद्योजक नाना शंकरशेट मुरकुटे किंवा पारशी उद्योजक जमशेदजी जीजीभॉय यांच्याप्रमाणे या शहराच्या रचनात्मक जडणघडणीत योगदान दिले नाही.
चौथा जॉर्ज जेव्हा मुंबईत आला तेव्हा हाफकिनमध्ये त्याचा दरबार भरला होता. तेव्हा रामा कामत यांना ‘मर्चट प्रिन्स ऑफ बॉम्बे’ म्हणून बोलावलं होतं. हे अठराव्या शतकातले दानशूर आणि लोकाभिमुख महाराष्ट्रीय उद्यमी. त्याचं ब्रिटिश सरकार दरबारी वजन होतं. ईस्ट इंडिया कंपनीच्या वरच्या श्रेणीतील लोकांमध्ये त्यांची ऊठबस होती. सेंट थॉमस कॅथेड्रलच्या उद्घाटनाला आमंत्रित ते एकमेव भारतीय होते. मात्र सरखेल कान्होजी आंग्रे यांच्याशी संधान बांधून मुंबईच्या गव्हर्नरविरोधात कारस्थान रचल्याचा आरोप ठेवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांचा बलार्ड एस्टेट इथला प्रासादही तोडला गेला. मुंबईतील नेटिव्हांच्या भल्यासाठी आणि सुविधांसाठी त्यांनी मोठाच दानशूरपणा दाखवला होता.

नाना शंकरशेट मुरकुटे यांच्याकडे 19 व्या शतकाच्या सुरुवातीला 19 लाख रुपयांची संपत्ती होती. आजच्या रुपयात व्हॅल्युएशन केलं तर ते किती श्रीमंत असतील याचा विचार करता येईल. त्यांनी लोककल्याणासाठी आणि मुंबई शहर उभं करण्यासाठी पैसा दिला. मुंबईतल्या अनेक शैक्षणिक संस्था, धर्मशाळा, नाट्यगृहं, आरोग्यव्यवस्था, विहिरी, तलाव उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. पुण्यातल्या भिडेवाड्या पाठोपाठ नाना शंकरशेट यांनीही त्यांच्या वाड्यात 1849 साली मुलींची शाळा सुरू केली. ग्रांट मेडिकल कॉलेजच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी, मुंबई-ठाणे रेल्वेचा प्रारंभ यांचे श्रेय नाना शंकरशेट यांना द्यावे लागेल.
सायनपासून मानखुर्दचा डोंगर फोडून रेल्वेचा व्हीटी स्टेशनपर्यंतचा भराव टाकण्याचं कामही एका मराठी कंत्राटदाराने केलं होतं. गेट वे ऑफ इंडियाची घडण रावबहादूर यशवंत हरिश्चंद्र देसाई नामक मराठी अभियंत्याने केली. ते या कामावर अधीक्षक व्यवस्थापकही होते.
भाऊचा धक्का बांधकामतज्ज्ञ भाऊ लक्ष्मण अजिंक्य नावाच्या पाठारे प्रभू माणसाने बांधला. त्या आधी समुद्रात नांगरलेल्या जहाजांतून मचव्यातून प्रवास करून जमिनीवर यावं लागायचं. नेटिव्ह कंत्राटदार असलेल्या भाऊ अजिंक्य यांनी मुंबईच्या भरती-ओहोटीचा अभ्यास करून अर्ज करून सहा टक्के चक्रव्याढ व्याजाने कर्ज काढून चार वर्षांत हा धक्का बांधला. शिवाय त्यांच्या कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या कंत्राटाचा उपयोग करून भराव टाकत जागा निर्माण केली. तसेच मालांच्या गोदामासाठी मुंबईत वखारही बांधली. आख्ख्या देशात वखारीसहित धक्का असलेलं मुंबई हे एकमेव बंदर होतं. या धक्क्यामुळे मुंबई शहराच्या सागरी वाहतुकीला गती आली. मालाची तस्करी थांबून मुंबईच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली.
मुंबईच्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्नही भाऊंनी सोडवला. मुंबईतील डबकी आणि सांडपाण्याच्या खळग्यांमध्ये त्यांनी भराव टाकण्याचं कंत्राट घेतलं. मशीद बंदर, क्रॉफर्ड मार्केट, डोंगरी इथले रस्ते भाऊ अजिंक्य यांनी बांधून घेतले. या त्यांच्या कामगिरीमुळे बंदरात उतरणाऱ्या प्रवाशांची खूपच मोठी सोय झाली. गोरेगावचं दिंडोशी, मालाडचं चिंचवली आणि कांदिवलीचं आकुर्ली ही तीन गावं भाऊंनी ब्रिटिशांकडून लागवडीसाठी घेऊन विकसित केली.
भाऊ दाजी लाड यांनी वैद्यकशास्त्रासोबतच मुंबईत कागद व कापूस गिरण्यांच्या निर्मितीत पुढाकार घेतला. मुलींच्या शाळा चालवल्या, विधवाविवाह चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला. राणीचा बाग, पेटिट इन्स्टिट्युट, नेटिव्ह जनरल लायब्ररी या संस्था विकसित केल्या. स्वतःही प्राच्यविद्या संशोधन केले आणि संशोधनासाठी रॉयल एशियाटिक सोसायटीमध्ये सुविधा निर्माण केल्या.
विश्वनाथ नारायण तथा रावसाहेब मंडलिक यांनी सार्वजिनिक क्षेत्रात विशेषतः शिक्षण क्षेत्रात तसेच कायदेविषयक क्षेत्रात मोठं योगदान दिलं. भारतात स्त्री-शिक्षणासाठी इंग्रज सरकारात दबावगट निर्माण केला. स्थानिक भाषांचे शिक्षण बंद करण्याच्या निर्णयाचा त्यांनी कडाडून विरोध केला.
गुजराती उद्योगपती
या तुलनेत मग गुजराती समाजाच्या व्यापारी लोकांचं योगदान कुठे दिसतं? तरीही मराठी समाजाने गुजराती समाजाची व्यापारी नीती समजून घेऊन समन्वयाची भूमिका घेतली. गुजराती व्यापारी समाजाला सुरक्षेचे, सचोटी आणि प्रामाणिकपणे वागणाऱ्या कर्मचारी-कामगारांच्या मनुष्यबळाचे कोंदण दिले. महाराष्ट्रात गुजराती व्यापाऱ्यांचा दुस्वास कधी झाला नव्हता.
मोहनदास करमचंद गांधी यांना महाराष्ट्राने महात्मा किंवा बापू म्हणूनच पाहिलं. टिळकांनंतर देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व गांधीजींकडे गेल्यावर महाराष्ट्रातलं कार्यकर्त्यांचं मोहळ गांधींच्या बाजूने उभं राहिलं. गांधी महाराष्ट्रात वर्ध्याचे किंवा मुंबईत मणिभवनमधले झाले.
गांधींच्या प्रभावामुळे असेल, पण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी दरम्यान मोरारजी देसाईंच्या विषयी असलेला राग गुजराती समाजावर कधी निघाला नाही. इतकी वर्षे हा समाज दुधात साखर बनून राहिला. पण आता राजकीय दृष्ट्या आपण प्रबळ झालो आहोत, अशा भावनेतून अचानक साखरेचे गुणधर्म बदलू लागला आहे. त्यासाठीच हा लेखाजोखा मांडणं आवश्यक होतं.
गुजरातमधील मराठी केंद्र
गुजरातमधला मराठी प्रभाव अहमदाबाद परिसरात मराठी सेनापती खंडेराव दाभाडे आणि त्यानंतर बडोदा नरेश सयाजीराव गायकवाडांमुळे दिसतो. सुरतेच्या दक्षिणेला बिलिमोरा नावाचं छोटं शहर आहे. हे बिलिमोरा मराठी संस्कृतीचं केंद्र होतं. इथे बडोदा संस्थानाचे सयाजीराव गायकवाड यांची मोठी सुत गिरणी होती. या गिरणीत काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातले गिरणी कामगार जायचे. या बिलिमोरामध्ये दादू मास्तरांची चाळ लोकप्रिय होती. दादू मास्तरांच्या चाळीचा इथल्या गुंडांवरही वचक होता.
या चाळीतला गणेशोत्सव भारी असायचा. गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, आफळे गुरुजी यांची कीर्तनं तिथे व्हायची. सरदेसाईंचीही केमिकल फॅक्टरी बिलिमोरामध्ये होती. बडोदा नरेशांनी सुरतेच्या मार्गावरच्या गणदेवी तळावर तसेच डच, ब्रिटिश आणि फ्रेंचांच्या जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी बिलिमोरा बंदरामध्ये आपलं आरमारही ठेवलं होतं.
म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्राचं हे गिव्ह अँड टेक अनेक दशकं सुखाने नांदणारं होतं. मग राजकीय परिस्थितीमुळं त्यात बदल का घडून आला, याची उत्तरं शोधणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बुलेट ट्रेनच्या पदराआड
पहिली बुलेट ट्रेन गुजरातमधल्या सुरत ते बिलिमोरा या दोन स्टेशनांच्या दरम्यान धावणार आहे, असं व्हायब्रंट गुजरातच्या परिषदेत केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं. पुढे मुंबईपर्यंत धावणाऱ्या या बुलेट ट्रेनमधून व्यापारउदीम वाढेल, पण माणसांचं इनकमिंग आणि साधनसंपत्तीचं आउटगोईंग होईल, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतल्या हुतात्म्यांची आठवण नव्या पिढीसाठी धूसर असेल, पण मराठी धमन्यांमधलं रक्त बंडखोरीला धार्जिणं असतं. मुंबई या रक्ताच्या आणि मराठी माणसाच्या घामाच्या शिंपणातूनच उभी राहिली आहे.
माझी मैना गावावर राहिली, असं आता कुणी नवा शाहीर म्हणणार नाही, ना कोणा मराठी माणसाच्या जिवाची काहिली होईल.