नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवरील IC-814 या वेबसिरिजमधील अतिरेक्यांच्या हिंदू नावांवरून वादंग सुरू झाला, तेव्हा का कोणास ठाऊक जावेद अख्तर यांचं एक विधान आठवलं. मधल्या काळात एका ठिकाणी बोलताना जावेद साहेबांनी ‘शोले’ या चित्रपटामधल्या दृश्याची आठवण सांगितली. एका देवळात नायक वीरू नायिका बसंतीशी शंकराच्या मूर्तिमागून बोलतोय. त्याच्या हातात एक कर्णा असतो. त्या कर्ण्यातून तो स्वतः शंकर भगवान बोलतोय, असं भासवतो. अशाप्रकारे बोलता बोलता बसंतीने वीरूशी लग्न करावं, असा शंकर भगवान यांचाच आदेश असल्याचं वीरू सांगतो.
जावेद साहेब म्हणाले होते की, हे दृश्य ‘शोले’ चित्रपटात विनोदी प्रसंग म्हणून लोकांनी छान स्वीकारलं. त्यावर काहीच वादंग किंवा आपत्तीजनक घडलं नाही. पण आज अशा प्रकारचा प्रसंग कुणी लेखक लिहू धजावेल असं वाटत नाही.
जावेद अख्तर यांचं हे विधान IC-814 या वेबसिरिजच्या निमित्ताने आठवलं. कारण 1999 च्या कंदाहार हायजॅक म्हणून विख्यात असलेल्या या घटनेबाबतच्या वेबसिरीजमध्ये चुकीचे वर्णन, तथ्यांचा विपर्यास केल्याचा आरोप माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केला. नुसत्या आरोपावर न थांबता मंत्रालयानं या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कंटेंट हेडला समन्स धाडलं. तसेच या मालिकेशी संबंधित धार्मिक संवेदनशीलता आणि सार्वजनिक भावना ध्यानात घेण्यासंबंधी निर्देश दिले. लागलीच अनुभव सिन्हा दिग्दर्शित ही मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली. लोकांनी या दिग्दर्शकाला ट्रोल करायला सुरुवात केली.
1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सचे हे उड्डाण काठमांडूहून दिल्लीच्या दिशेने निघालेलं होतं. या दरम्यान अतिरेक्यांनी विमान हायजॅक केलं आणि ते काबूलकडं वळवण्यास सांगितलं. मात्र, विमानात तेवढं इंधन नसल्यानं विमान अमृतसरला काही वेळासाठी उतरवण्यात आलं. तिथून वैमानिकाने विमान लाहोरमध्ये उतरवण्यासाठी विनंती केली, पण लाहोरमध्ये उतरण्याची परवानगी न मिळाल्यामुळं विमान दुबईतल्या विमानतळावर उतरलं. इंधन भरून विमान मग कंदाहार इथं उतरवण्यात आलं.
या विमानाचे कमांडर असलेले कॅप्टन देवी शरण यांच्या ‘फ्लाइट इनटू फिअर’ या पुस्तकाच्या आधारावर या वेबमालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. ही मालिका प्रदर्शित झाल्यावर काही प्रेक्षकांनी असा आक्षेप घेतला की, या मालिकेत अपहरणात सहभागी असलेल्या पाच दहशतवाद्यांची धार्मिक ओळख जाणूनबुजून लपवून ठेवली आहे. अपहरणात सामील असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांची टोपण नावं हिंदू देवतांच्या नावे आहेत. त्यावरून वादंग निर्माण झाला.
मालिकेत, पाच अपहरणकर्ते आहेत. त्यांची सांकेतिक नावं आहेत… चीफ, डॉक्टर, बर्गर, भोला आणि शंकर. हिंदूंनीच हे विमान हायजॅक केलं असं या नावांमुळे वाटतं, अशी टीका या मालिकेवर झाली. अशा प्रतिक्रिया येऊ लागल्यावर या मालिकेत एक डिस्क्लेमर टाकला गेला आणि अपहरणकर्त्यांची खरी नावं आणि त्यांची टोपणनावं स्पष्ट केली गेली.
गंमतीचा भाग म्हणजे दिनांक 6 जानेवारी 2000 रोजी, केंद्रीय गृह मंत्रालयाने एका प्रेस रिलिजमध्ये ही नावं जाहीर केली होती. हरकत-उल-मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या या अपहरणकर्त्यांनी ही वरील सांकेतिक नावं या अपहरणासाठी वापरल्याची पुष्टी हे प्रेस रिलिज करतं. हे प्रेस रिलिज परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
अपहरण झालेल्या या विमानातील एक पॅसेंजर पूजा कटारिया यांनीही भोला आणि शंकर ही नावं अतिरेक्यांनी वापरल्याचं सांगितलं आहे.
अनुभव सिन्हा यांना सुरुवातीला ट्रोलिंग झालं. पण सिनेसृष्टीतले लोक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. पण त्याचवेळी इतर अनेक वाद उफाळून आले. त्या कालखंडात अमृतसरमध्ये विमान ग्राउंड झालेले असताना ते तिथेच अडकवून ठेवले असते तर परिस्थिती नियंत्रणात असती, असे अनेक तज्ज्ञांनी सांगितले. मालिकेमध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सहकार्य केले नाही असे चित्र रंगवले आहे.
सत्य घटनांवर आधारित एखादी कलाकृती येते तेव्हा वेगवेगळ्या दृष्टिकोणांमुळे त्यावर वाद होणं साहजिकच असतं. मात्र ही मालिका पाहताना प्रशासनातील विविध यंत्रणांमधली वादविवाद, जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याच्या प्रवृत्तीवर केलेली टिप्पणी अंतर्मुख करते. बैल गेला आणि झोपा केला ही आपली प्रशासकीय गत महत्त्वाच्या घटनांबाबत आजही कायम आहे. मात्र इतिहासापासून काही शिकायचं असेल तर ही मालिका आवर्जून पाहावी अशीच आहे.