जळगावच्या रामगिरी महाराजांच्या मुहंमद पैगंबरांवरील वक्तव्यावरून वैजापूरमध्ये वादंग पेटला. एमआयएमचे इम्तियाज जलिल यांनी रामगिरी महाराजांवर टीका केली. त्यावर रामगिरी महाराजांच्या पाठिंब्यासाठी नितेश राणे धावून गेले. कारण हेही ‘राणे’ आणि रामगिरी महाराजही ‘राणे’च. त्यांच्या समर्थनार्थ आमदार नितेश यांनी शोले स्टाइल मशिदीत घुसून ‘चुन चुन के मारू’ अशा वल्गना केल्या.
घटनात्मक पदाचा विसर
त्यावर भाजपाच्याच हाजी अराफत यांनी अश्लाघ्य भाषेत नितेश राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. त्यावर नितेश राणे काही बोलले नाहीत. दरम्यानच्या काळात महायुतीतल्या शिंदे शिवसेना पक्षाच्या यामिनी जाधव यांनी मुस्लिम महिलांना बुरखा वाटप करून टाकले. नितेश राणे मग वेगळ्याच पातळीवर व्यक्त झाले… ते म्हणाले, सर्मधर्मसमभाव मानू नका… मुस्लिमांसोबत व्यवहार करू नका… हिंदूंनी केवळ हिंदूंशीच व्यवहार करावा. हे सांगणारे नितेश राणे हे आमदार आहेत, महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य आहेत. त्यांनी घटनात्मक पदाची शपथ घेतली आहे. मात्र त्या शपथेचं हल्ली कोणालाच काही वाटेनासं झालं आहे.
जैनांविरुद्ध बंडोबा थंड
याच नितेश राणे यांनी साधारणतः सात-आठ वर्षांपूर्वी जैन धर्मीयांच्या विरोधात दंड थोपटले होते. परंतु राणे कुटुंबियांचे व्यावसायिक संबंध जैन विकासकांशी असल्याने या जैनविरोधी आंदोलनाचे बंड शमले. आता केवळ हिंदूंशीच व्यवहार करायचा झाला तर जैनांचं काय करायचं? हा प्रश्न राहतोच.
मोदी मित्र अभियान
हिंदूंशीच व्यवहार करण्याच्या नितेश राणेंच्या मुद्द्याची ‘री’ भाजपाने अधिकृतपणे ओढली आहे. आशिष शेलार यांनीही त्यांच्या मुद्द्याला अनुमोदन दिलं आहे. हिंदुशीच व्यवहार या अजेंड्या आड मुस्लिमांशी व्यवहार नको हा प्रमुख अजेंडा आहे. पण नितेश राणे आणि आशिष शेलार यांना ‘मोदी मित्र’ अभियानाचा विसर पडलेला दिसतोय. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतांच्या अभिलाषेनं 29 एप्रिलला या अभियानाची घोषणा करण्यात आली. इस्लामिक शैक्षणिक केंद्र म्हणून ओळख असणाऱ्या देवबंद इथून या अभियानाला सुरवात झाली. यात दीडशे इस्लामिक बुद्धीजीवींना जोडण्यात आलं. देशात 65 मतदारसंघ मुस्लीम बहुल आहेत. ‘सुशिक्षित मुस्लीम आमच्यासोबत आहेत’ असं मोदी मित्र अभियानाद्वारे या मतदारसंघांना दाखवायचं होतं.
ज्या मुसलमानांच्या विरोधात नितेश राणे किंवा भारतीय जनता पक्ष दंड थोपटत आहेत, ते भारतीय नागरिक आहेत. भारतीय व्यवस्थेत गेली तेराशे वर्षे ते जगत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुस्लिमांना उद्देशून ‘औरंग्याच्या अवलादी’ असा शब्दप्रयोग वापरून मुख्य प्रवाहापासून त्यांना लांब ठेवण्याचा इरादा स्पष्ट केला होता. मग केवळ हिंदूंशीच व्यवहार करायचा झाला तर मंत्रिमंडळातल्या हसन मुश्रीफ आणि अब्दुल सत्तार या दोन मंत्र्यांना प्रथम नारळ द्यावा लागेल. औरंग्याच्या औलादी प्रत्यक्षात आपणच हिंदू धर्मात शुद्धिकरण ‘न’ केलेले पूर्वज आहेत. या अवतरणाखाली जे जे येतात, त्या सगळ्यांनाच मग आपल्या व्यवहारातून वगळावं लागेल.
पुन्हा धर्मात का नाही?
आपल्या देशातील इस्लाम धर्मीय हे वेगवेगळ्या परिस्थितीत हिंदू धर्मातूनच धर्मांतरित झालेले लोक आहेत. बाटलेले, बाटवले गेलेले, हिंदू धर्मातील वर्णव्यवस्थेला कंटाळून परिस्थितीवश इस्लाम धर्म स्वीकारलेले, असे अनेक लोक गेल्या कित्येक पिढ्या या देशात राहात आहेत. आज त्यांना आपण व्यवसाय आणि व्यवहाराच्या व्यवस्थेच्या बाहेर फेकून देण्याची भाषा करतो आहोत. पाठीवर मारा पण पोटावर मारू नका असा वाक्प्रचार प्रचिलत आहे. या सगळया धर्मांतरितांना पुन्हा हिंदू धर्मात घेण्यासाठी आपण काहीच प्रयत्न का केले नाहीत?
पहिल्या बाजीराव पेशव्यांचा पराक्रमी पुत्र समशेरबहाद्दर. त्याला पित्याचा धर्म म्हणून हिंदू धर्मात घेण्यास नकार देण्यात आला होता. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या कवनाचे नायक सरनोबत प्रतापराव गुजर यांची मुलं खंडेराव व जगजीवनराव यांना औरंगजेबाने बाटवून मुसलमान केले होते. ते महाराणी येसुबाई व शाहू यांच्यासोबत रायगडावर कैद केले गेले होते. शाहूवर अत्याचार होऊ नये म्हणून त्यांनी इस्लाम स्वीकारला. पण शाहू छत्रपती झाल्यावर या भावंडांचा विसर पडला आणि त्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याचा विचार झाला नाही.
छत्रपती संभाजी महाराजांची दुसरी पत्नी चंपा उर्फ दुर्गा यांची दोन मुले मदनसिंग व उधोसिंग यांनाही बळजबरीने मुसलमान केले गेल्याचे सांगितले जाते. त्यांची बहीण म्हणजे संभाजी महाराजांची मुलगी हिचे लग्न औरंगजेबाने सिकंदराबाद विजापुरीचा मुलगा मुहम्मद मुहिउद्दिन याच्यासोबत लावले. बादशहाने त्याला सात हजार रुपयांचा आहेर केल्याची नोंद आहे.
जिंजीच्या पाडावानंतर छत्रपती राजाराम महाराज यांच्या कुटुंबातील सदस्य कैद झाले. त्यांच्या दोन्ही मुलींची लग्नं औरंगजेबाने मुसलमान सरदारांशी लावून दिली. एका मुलीचे लग्न आधर खानाचा नातू समशेर बेग याच्याशी लावलं. दुसरीचं देवगडचा राजा नेकनामा याच्याशी लावलं. हा नेकनामाही पूर्वाश्रमीचा हिंदूच.
महाराजांचा वारसा चालवणार ?
आता औरंग्याच्या अवलादी होता होता राहिलेल्या लोकांचे संदर्भ बघू. सेनापती नेताजी पालकर यांना औरंगजेबाने बाटवून मुहम्मद कुलीखान बनवले आणि काबुलला पाठवून दिले. १० वर्षे मोगलांची चाकरी केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू केले. एकदा बाटला की गेला, त्याला पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश नाही असा तत्कालीन धर्ममार्तंडांचा दुराग्रह होता. छत्रपतींनी हा दुराग्रह मोडून काढला. त्यांचे मेव्हणे बजाजी नाईक निंबाळकर यांना अफजलखानाने बळजबरीने मुसलमान बनवले होते. राजांनी त्यांनाही शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले.
बाजीप्रभू देशपांडे यांचा मुलगा पिलाजी याला जंजिरेकर सिद्धी याने कैद करून बाटवले होते. रामजी नरसी देशकुलकर्णी यांचा मुलगा शामजी हाही बाटला होता. दोघांनाही महाराजांनी शुद्ध करून स्वधर्मात घेतले. केवळ मुसलमानच नाही तर पोर्तुगीजांनी बाटवून ख्रिस्ती झालेल्यांनाही शिवकाळात पुन्हा स्वधर्मात घेतले गेले. त्यानंतर संभाजी महाराजांनी तर हरसूल गावच्या गंगाधर रंगनाथ कुलकर्णी या बाटलेल्या ब्राह्मणालाही मितीक्षरादी प्रायश्चित्त घेऊन स्वधर्मात घेतले. इतर समुदायासाठी संभाजी महाराजांनी पंक्तिपावन शुद्धीकरणासाठी सरकारी तिजोरीतून पैशांची सोय केली होती. पुढे औरंगजेब मेल्यानंतर मराठेशाहीत या शुद्धीकरणाच्या मोहिमेचा विसर पडला. ही थोरामोठ्यांची उदाहरणं. सर्वसामान्य तर कित्येक बाटवले गेले. त्यांना स्वधर्मात पुन्हा येण्यास हिंदू धर्मातील धर्ममार्तंडांनी संधीच दिली नाही.
इतिहासातल्या चुका सुधारणार?
पेशवाईत तर हिंदू धर्मात पुन्हा येण्यास वावच ठेवला गेला नाही. या सगळ्या गंभीर चुका हिंदू धर्मातील धर्ममार्तंड म्हणवणाऱ्यांच्या आहेत. जातीपातीतल्या उच्च-नीच आणि मनुच्या वर्णवादाला मान्यता देऊन धर्मांतराचा धार्मिक इतिहास विसरला गेला. त्यामुळे आता या इथल्या मातीतल्याच बळजबरीने धर्मांतरित झालेल्यांना औरंग्याच्या अवलादी म्हणून हिणवणं सोपं आहे. आज पुन्हा हिंदूंचा कैवार घेणारं सरकार आहे. हिंदूंशीच व्यवहार करायचा झाला तर इतिहासातल्या चुका तुम्ही सुधारून घेणार का? जे काही शतकांपूर्वी धर्मांतरित झाले आहेत त्या धर्मांतरितांना आज पुन्हा हिंदू धर्मात घेणार का?
आणि हिंदू धर्मात आल्यानंतर त्यांची जात कोणती असणार हा प्रश्नच राहील. मग त्यावर एक उपाय आहे. हिंदू धर्मात पुन्हा धर्मांतरित होणाऱ्यांना मनु वर्णव्यवस्थेतील उच्चवर्णीय ब्राह्मण ज्ञातीचा दर्जा द्या. सगळे धर्मांतरित हसत हसत हिंदू धर्मात येतील. आणि आमदार नितेश राणेंचा केवळ हिंदूंशीच व्यवहार करावा हा मुद्दाच राहणार नाही.
(संदर्भ सौजन्य : अरुण भंडारे, लेखसंग्रह, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणविशेष, प्रकाशक : चिन्मय पंडित, हेडविग मिडिया हाऊस)