श्री गणेशांना आपण बुद्धिदेवता मानतो. श्रींच्या स्वागताची तयारी आपण श्रद्धेने करतो. पण रोजच्या वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचल्यानंतर मात्र बुद्धी आणि श्रद्धा दोहोंना धक्का पोहचतो. पण आपला भक्तिभाव कुठे जाणार? गजाननाचे स्वागत तर हृदयापासून करायला पाहिजे.
तरीही उत्सवातलं बुद्धीचं अधिष्ठान शोधावं लागतं, याची खंत वाटत राहते. परंपरा आणि उत्सवप्रियता आनंददायी असते. पण सर्वांना सामील होता येईल असा आनंद कुठेतरी हरवला आहे.
श्रींच्या आगमना आधी खरेदीच्या लगबगीत एका लोकप्रिय गल्लीतल्या गणपतीच्या मिरवणुकीत लोकांना दोन तास जागेवरच उभं राहावं लागलं. चारचाकीनं ते अंतर अवघं दहा मिनिटांचं होतं. गणेशोत्सवाच्या तोंडावर जरा बाजारात गर्दी अधिक असेल अशा अंदाजाने पंधरा-वीस मिनिटांची वेळ गृहित धरणं शक्य होतं. पण त्या दोन तासांमधली लोकांची चरफड खूप होती.
कारण हे अपेक्षित नव्हतं. पूर्वी शहरांमध्ये वाहतूक विभाग पत्रकं काढायचे. कोणत्या मंडळाने कधी आणि कुठून मिरवणूक काढायची याचे नियोजन असायचे. थोड्याफार कुरबुरी व्हायच्या, पण सहकार्य असायचं. सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती असायची आणि या समितीचं ऐकलंही जायचं. आता गेलाबाजार प्रत्येक गल्लीत एकापेक्षा अधिक मंडळं झालीत आणि त्यांचे सार्वजनिक उत्सव एकमेकांशीच स्पर्धा करू लागलेत. मिरवणूक ही स्पर्धेची पहिली पायरी झाली आहे.
विशिष्ट काही उत्सव सोडले तर श्रींच्या आगमनाचा निवडणुकीचा दणदणाट हा गेल्या काही वर्षांतला आहे. मंडपाच्या जवळ श्रींचे आगमन झाल्यानंतर वाडी-वस्तीतले बाया-बापडे एकवटायचे. टाळ आणि लेजिमच्या तालात श्रींचे स्वागत व्हायचे. वातावरण मंगलमय असायचं.
आता ढोल पथक, नाशिक बाजा, ताशा, बेन्जो, डीजे, फटाके यांचा प्रचंड दणदणाट. त्यात रस्त्यावरच्या वाहतुकीचे तीन-तेरा. आपण मिरवणुकीच्या आग्रहापायी नाहक लोकांना काही तास अडकवून ठेवतो आहोत याचं भान आता मंडळांना राहिलेलं नाही. आमच्या मंडळाच्या श्रींची मूर्ति चाललीय म्हणजे आता बाकीच्यांनी थांबलंच पाहिजे, असा अट्टहास लायक्राच्या प्रिंटेड टी-शर्टमधल्या कार्यकर्त्याचा असतो. तुम्ही दुसऱ्या मार्गाने जा, कारण आमचा गणपती येतो आहे, हा धमकीवजा आग्रह.
मुंबई-गोवा महामार्ग आणि चाकरमान्यांचा कोंकणातला प्रवास हा एक वेगळाच अनुभव असतो. पण भक्तिभावापुढे लोक अडचणींचा पाढा वाचत नाहीत. पण सगळीच शहरं बेशुमार वाढलीयत. त्याबरोबर रस्त्यावरची वाहनंही.
महाराष्ट्रात 2020 साली 3 कोटी 70 लाख नोंदणीकृत वाहनं होती. वर्षाला त्यात सरासरी 25 लाखांची भर पडते. म्हणजे सध्या अंदाजे साडे चार कोटी रजिस्टर्ड वाहनं आहेत. यातली बरीचशी जेव्हा रस्त्याच्या मधनं चालन नसतात तेव्हा अर्थात रस्त्याच्या दुतर्फा पार्क केलेली असतात. चारचाकी आणि मोठी वाहनं त्यातल्या त्यात शिस्तीने पार्क होतात. परंतु दुचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी आपल्याकडे सिव्हिक सेन्स नाही. बऱ्याचदा दुचाकी अशा पद्धतीने लावलेल्या असतात की चारचाकीचीही जागा व्यापून टाकतात. फुटपाथ फेरीवाल्यांच्या दुकानांनी व्यापलेले. म्हणजे जेव्हा अचानक एखादी मिरवणूक रस्त्यावर कुर्मगतीने सुरू असते तेव्हा त्या रस्त्यावर माणसालाही चालण्यासाठी जागा उरत नाही. फार तर एखादा उंदीर जाऊ शकतो. पण मूषकराज तर श्री गणेशाचे वाहन. या बुद्धीदेवतेला शहरांच्या ट्रॅफिकचा अंदाज फार आधीच आलेला असावा. म्हणूनच त्यांनी आपलं वाहन उंदीर ठरवलं असावं. कुठूनही कुठे जाता यावं म्हणून. आपण मात्र देवाच्या पायाला चाकं लावून वर खिळ घालतो. ही खिळ कधी निघणार? उत्सवाचं प्रबोधन पुन्हा करावं लागेल.
‘बाप्पा तूच रस्ता दाखव’ अशी चळवळ सुरू करावी का?
गणपती बाप्पा मोरया !
उंदीर मामा की जय !!