कोंकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांना आता श्वास टाकला असेल. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे श्री गणपतीच्या उत्सवासाठी लगबग जरा थंडावली होती. पर्यायी व्यवस्थेचे दडपण मनामनावर होते. पण आता एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यामुळे हे मळभ दूर झाले आहे.
गणेशोत्सवाच्या तोंडावरच हा संप आल्यामुळे कर्मचाऱ्यांनी प्रशासनाची अडचण निर्माण करून आपल्या मागण्या पदरात पाडून घेतल्या खऱ्या. नशीब प्रशासनाने यावेळी अडवून दाखवले नाही. 2021 मध्ये ऐन कोविड काळात एसटी कर्मचाऱ्यांचा संप झाला होता. दरवेळी सर्वसामान्य माणसालाच का वेठीस धरलं जातं.
गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागात दुचाकी वाहनांचा प्रसार मोठ्या प्रमाणात झालाय. त्यामुळे तरुण आणि मध्यमवयीन पुरुष मंडळी आता एसटी बससाठी थांबत नाही. एसटी बसवर पुरुष मंडळींचं अवलंबित्व कमी झालंय. त्यांच्या पाठीमागे बसून जाणाऱ्या काही महिलांना काही प्रसंगी एसटी प्रवास टाळता येतो. पण तरीही महाराष्ट्र राज्य परिवहनच्या एसटी वाहनांमधून प्रवास करणारा मोठा वर्ग आहे तो महिलांचा. त्या खालोखाल ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर एसटीने प्रवास करतात. सवलतीच्या दरातली तिकीट सेवाही याच वर्गासाठी आहे.
त्यामुळे प्राथमिक पातळीवर असा समज होतो की मोठ्या प्रमाणावर वापरकर्तेच सवलतीच्या दरात जातात आणि एसटीला तोटा होतो. पण काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, या सवलतीच्या तिकिटामुळेच वडाप किंवा पर्यायी व्यवस्थेकडे वळलेला वर्ग पुन्हा एसटीकडे आला आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात याच महिला, वृद्ध व विद्यार्थी वर्गाकडून वाढ होऊ शकते. पण ज्या महिला एसटीच्या पालनकर्त्या झाल्यात त्यांनाच संपकाळात सर्वाधिक वेठीस धरलं जातं हे वेदनादायी आहे.
एसटी कर्मचारी काही सोन्याची कौलं चढवण्यासाठी मागण्या करत नाहीत. तेही सर्वसामान्य कुटुंबातूनच येतात. परंतु ऐन उत्सवांच्या तोंडावर सणासुदीला आडकाठी करून सामान्यांना वेठीस धरून आपल्या मागण्या पूर्ण करण्याची नीती योग्य नाही. असो. सध्या संप मिटल्यामुळे वातावरण आनंदी आहे. लाल परीत बसून काही बाप्पाही सोंडेतल्या सोंडेत हसत भाविकांच्या हातातील पाटावर बसून कोंकणातल्या वाड्यावस्त्यांवर जाऊ शकतील.