गडचिरोलीचं नाव घेतलं की नक्षलवादी कारवायांचा रक्तरंजित जिल्हा अशी ओळखच आपल्या समोर येते. पण हिरव्याकंच जंगलांनी समृद्ध गडचिरोलीमधील आदिवासी समुदायांच्या शूरकथा बाहेरच्या जगाला माहीत नाहीत. गर्द रानात हा इतिहास दडला आहे. गडचिरोलीतील हिऱ्याची खाण वाचवण्यासाठी इथले भूमीपुत्र बहामनी साम्राज्य आणि इंग्रज सैनिकांशी भिडले होते.
गडचिरोलीची खरी ओळख
खरंतर, इथल्या आदिवासींच्या शूरगाथा अद्यापही पुढे आलेल्या नाहीत. या आदिवासींचा इतिहास विदर्भाच्या इतिहासालाही व्यापून टाकेल एवढी त्याची व्याप्ती आहे. थंगालान चित्रपटाच्या निमित्तानं गडचिरोली जिल्ह्यातील इतिहासाच्या एका पानाची पुन्हा उजळणी सुरू झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात समाविष्ट झालेलं विदर्भातील हे एकमेव गाव होतं. त्या गावाचे नाव आहे ‘वैरागड’. इथल्या भूमिपुत्रांच्या वीरगाथांची साक्ष देत वैरागडचा किल्ला आजही उभा आहे.
दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते चियान विक्रम यांचा थंगालान सिनेमा खूप गाजत आहे. कोलार गोल्ड फिल्डचा म्हणजेच केजीएफचा इतिहास चित्रपटात पाहायला मिळतो. इंग्रजांनी केजीएफला शोधून तिथल्या सोन्याची कशी लूट केली, तिथल्या लोकांना कशी वागणूक दिली, याचे भयाण वास्तव या चित्रपटातून मांडलं आहे. काहीसा असाच इतिहास वैरागडचाही आहे. थंगालान म्हणजे ‘ सोन्याचा पुत्र ‘. या पुत्राने केजीएफच्या सोन्याचे संरक्षण केले. त्याचप्रमाणे वैरागड इथल्या भूमिपुत्रांनी इथल्या हिऱ्याच्या खाणींची रक्षा करताना स्वतःचे रक्त सांडले आहे.

काय आहे इतिहास…
वैरागडचा भूभाग महाभारत, रामायणातील दंडकारण्यातील एक महत्त्वाचा भूप्रदेश होता. तशी नोंद पौराणिक ग्रंथांमध्ये सापडते. बाराव्या शतकातील हाथीगुंफा शिलालेखातही वैरागडची नोंद आढळते. इथं नागवंशिय माना राजांची सत्ता होती. 1176 ते 1193 या काळात शिलाहार राजा भोज यांनी वैरागड किल्ल्याचे बांधकाम केले. यादवांनी हा किल्ला जिंकला. यादवांच्या पतनानंतर हा किल्ला आदिलशाहीत आला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वाई प्रांत जिंकला.त्यावेळी हा किल्ला स्वराज्यात समाविष्ट झाला होता. औरंगजेबाने इसवी सन 1699 मध्ये हा किल्ला जिंकला. मराठ्यांनी पुन्हा हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. 1818 मध्ये इंग्रजांच्या ताब्यात हा किल्ला गेला.
हिऱ्याच्या खाणीसाठी युद्ध
संस्कृतमध्ये हिऱ्याच्या खाणीस वैरागर, वज्राकर म्हणतात. त्यावरून या गावाला वैरागर नाव पडले. पुढे वैरागड या नावाने हे गाव ओळखले जाऊ लागले. इथल्या हिऱ्याची खाण त्यावेळी प्रसिद्ध होती. ही खाण मिळवण्यासाठी अनेक युद्ध झाली आहेत.
1422 मध्ये अहमद शहा बाहमनी याने या गावावर आक्रमण केले होते. या युद्धात 108 मुस्लिम सैनिक मारले गेले. त्यांच्या कबरी आजही इथं सापडतात. नागवंशीय माना राजांनी आणि त्यानंतर गोंड राजांनी इथं हिरे काढण्याचा प्रयत्न केला होता. गोंड राजांचा पराभव करीत ब्रिटिशांनी या खाणी ताब्यात घेतल्या. त्यांनी येथे हिऱ्यासाठी उत्खनन केलं.
खनिज संपत्तीचे संरक्षक..
वैरागडच्या भूप्रदेशावर गोंड बांधवांची मोठी वस्ती होती. निसर्ग पूजक असलेले हे बांधव आपल्या भूप्रदेशात असलेल्या खनिज संपत्तीचे संरक्षण करायचे. खनिज संपत्तीचे संरक्षण करताना इथल्या आदिवासी बांधवांच्या रक्ताने ही भूमी लाल झाली. महाराष्ट्राच्या इतिहासाला समृद्ध करणाऱ्या इथल्या निसर्गपूजकांच्या गाथा आहेत. पण या वीरगाथांना इतिहासात स्थान मिळू शकलं नाही, ही मोठी शोकांतिका आहे.
लेखक धनंजय साखरकर हे श्रेष्ठ महाराष्ट्राचे गडचिरोली येथील प्रतिनिधी आहेत.