सातारा, सांगली, कोल्हापुरसह कर्नाटकातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पाठरवाडी (ता. कऱ्हाड) येथील श्रीभैरवनाथ देवाच्या यात्रेस सोमवार 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. या यात्रेचा मुख्य पालखी सोहळा मंगळवार, एक एप्रिलला पहाटे सहा वाजता होणार आहे. त्यासाठी मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर दाखल होण्यास प्रारंभ झाला आहे.
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तांबवे गावच्या पश्चिमेस डोंगरावर पाठरवाडी वसली आहे. इथे श्री भैरवनाथ देवाचे मंदिर आहे. गुढीपाढव्याच्या तिसऱ्या दिवशी पहाटे पाठरवाडीच्या श्री.भैरवनाथ देवाचा पालखी सोहळा पार पडतो. यंदा यात्रा समितीने यात्रेचे जोरदार नियोजन केले आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याबरोबर आठवडाभर पारायण सोहळा, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री.भैरवनाथ देवस्थान जागृत देवस्थान
श्री भैरवनाथ हे देवस्थान जागृत देवस्थान असल्याचे मानलं जातं. या ठिकाणी या मंदिरात असलेली मूर्ती स्वयंभू मूर्ती असल्याचे सांगण्यात येतं. राज्यसह परराज्यातील भाविकही या भैरवनाथाच्या दर्शनाला येतात. श्री.भैरवनाथ या भागातील सात गावांचं ग्रामदैवत असून यामध्ये तांबवे, गमेवाडी,आरेवाडी डेळेवाडी, उत्तर तांबवे, दक्षिण तांबवे या गावांचा समावेश आहे.
अनेक गावातील रहिवाशांचा श्री.भैरवनाथ कुलदैवत
सातारा जिल्ह्यातील आणि सांगली जिल्ह्यातील अनेक गावातील वेगवेगळ्या भावकीचे कुलदैवत म्हणून भैरवनाथ देवास पुजले जाते. यामध्ये आटपाडी तालुक्यातील घाणंद, कोल्हापूर जवळील कांचन तसेच खटाव तालुक्यातील पिंपरी, कराड तालुक्यातील रेठरे, काले, विरवडे, सुपने, मुंडे, कासेगाव, विरावडे,अभयचीवाडी, किरपे, एनके,कोळे, कोळेवाडी मारुल, पोतेकरवाडी,माटेकरवाडी, चिखलेवाडी, मानेवाडी,हावलेवाड, राजूर,बहुले आणि सांगली जिल्ह्यातील इचलकरंजी या गावातील ग्रामस्थांचे श्री भैरवनाथ कुलदैवत आहेत.
काय आहे यात्रेची परंपरा
यात्रेच्या मुख्य दिवसाच्या आदल्या दिवशी म्हणजेच यंदा सोमवार, दिनांक 31मार्च रोजी सायंकाळी चार वाजता देव घोड्यावर बसवले जाणार आहेत. मंगळवार, दिनांक 1 एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता या ठिकाणी देवाची आरती केली जाईल. त्यासोबतच या वर्षी काढण्यात आलेल्या मुहूर्तानुसार पहाटे 6.33 ला मंदिर प्रदक्षिणेला सुरुवात होईल आणि छबीनाही सुरु होईल.
पाठरवाडीच्या पायथ्याला आणि भैरवनाथाच्या मंदिराजवळ महाप्रसाद…
श्री भैरवनाथाची यात्रा सुरू झाल्यानंतर मुख्य यात्रेच्या आदल्या दिवशी दुपारपासून सुरू झालेला महाप्रसाद रात्री एक वाजेपर्यंत चालू राहतो. याच पठाराच्या पायथ्याला सुद्धा महाप्रसादाची सोय करण्यात येते.
या गावांना मिळतो सासनकाट्यांचा मान
वाटेगाव,सोन्याचीवाडी,तांबवे, काले, शेरे, दुशेरे, गमेवाडी या गावांना भैरवनाथाच्या पठारावर सासनकाठ्या घेऊन येण्याचा मान मिळतो. मुख्य म्हणजे मातंग समाजातील बांधवांना सासनकाट्या घेऊन येण्याचा आणि त्या नाचवण्याचा मान असून भोई समाजातील बांधवांना जागेवरून पालखी उचलण्याचा मान आहे. पाठरवाडी आणि आरेवाडीतील यादव भावकीला श्री.भैरवनाथाच्या पूजेचा मान देण्यात आला आहे.
1 Comment
लय भारी आहे