सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील शाळगाव एमआयडीसीतील मॅनमार कंपनीत वायूगळती झाल्याने दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर नऊ जण गंभीर अवस्थेत आहेत . त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शाळगाव एमआयडीसीमध्ये खतेनिर्मिती करणाऱ्या मॅनमार कंपनीत ही वायू गळती झाली आहे. गुरुवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास ही घटना घडली. वायूगळतीमुळे विषारी वायू हा कंपनीच्या आणि आजूबाजुच्या परिसरात पसरला. यामुळे कंपनीतल्या चार जणांना आणि बाजुच्या वस्तीतील लोकांना श्वास घेताना त्रास होऊ लागला. काही जणांना डोळ्यात जळजळ आणि उलट्या होऊ लागल्याने कंपनीतील चार कर्मचाऱ्यांना आणि शेजारील वस्तीवरच्या लोकांना तातडीने कराड येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, दोन महिलांचा मृत्यू झाला.
सुचिता उथळे वय 50 राहणार येतगाव, जिल्हा सांगली आणि नीलम रेठरेकर वय 26 राहणार मसूर, जिल्हा सातारा अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. सध्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अन्य पाच रुग्णांवरती आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, कडेगावचे तहसीलदार अजित शेलार, आणि पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी घटनास्थळी पोहचून घटनेची माहिती घेत संबंधीत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
गळती झालेला वायू कोणता होता, याविषयीची अधिक माहिती अजून मिळालेली नाही. यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, या परिसरातील नागरिकांना या विषारी वायूचा प्रभाव कमी होत नाही, तोपर्यंत मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.