नाशिक म्हणजे मंदिराचं शहर. या मंदिरांचं आणि वर्षभरात साजऱ्या केलेल्या सणांच्या नात्याची अनोखी कथा असते. या धार्मिक, सांस्कृतीक परंपरेनुसारच धुलिवंदनाच्या निमित्ताने वीर दाजीबा बाशिंग देवाची मिरवणूक निघते.
वीर दाजीबा बांशिग हा नवसाला पावतो आणि विघ्न दूर करतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. जवळपास 300 वर्षापासून ही परंपरा जपली जात आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात ही मिरवणूक काढली जाते. विविध देवदेवतांच्या वेशात सहभागी झालेले हे वीर आपल्या घरातल्या देवांना स्नान घालण्यासाठी होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचत गाजत गोदावरी नदीच्या घाटावर दाखल होतात.
अलंकारांनी नटलेली दाजीबा वीर मिरवणूक
डोक्याला भरजरी वस्त्रे, कानात सोन्याच्या पगड्या, हातात सोन्याचे कडे, पायात जोडा अशी वेशभूषा धारण करून वीर दाजीबाची मिरवणूक निघते. घरातील स्त्रिया आपापल्या घरासमोर सडा-रांगोळी काढतात. ठिकठिकाणी औक्षण करत या दाजिबांचं स्वागत केलं जातं. अनेक ठिकाणी या दाजिबा वीरांवर फुलांचा वर्षाव केला जातो. दाजिबांच्या दर्शनासाठी अनेक भाविक गोदाघाटाच्या परिसरात उपस्थित राहतात.
सुमारे 300 वर्षांपासून चालत आलेल्या या मिरवणुकीच्या परंपरेमध्ये गेल्या 40 वर्षापासून जुन्या नाशकातील बेलगावकर यांच्याकडे दाजीबा वीरांचा मान दिला आहे.
धुलिवंदन साजरी करण्याची नाशिककरांची अनोखी परंपरा
जुन्या नाशकातील बाशिंगे वीर, रविवार कारंजा येथील दाजीबा वीर आणि घनकर गल्लीतील येसोबा वीर हे मिरवणुकीतले मुख्य आकर्षणं आहेत. याशिवाय घरघरातील नवसाचे वीरही (मृत पूर्वजांचे टाक) होळीभोवती नाचवले जातात. त्यामुळे गोदाकाठी धुळवडीच्या दिवशी यात्राच भरलेली असते. होळी, धुळवड आणि रंगपंचमी साजरी करण्याची नाशिककरांची ही परंपरा आहे.
लग्नाळूंचे दाजिबा वीराला साकडे
मानाच्या असलेल्या दाजीबा वीराचे दर्शन घेण्यासाठी विविध ठिकाणांहून भाविक येतात. ज्या मुला-मुलींची लग्न जुळत नाहीत ते तरुण या वीराला बाशिंग वाहतात. यामागे अशी कथा आहे की, “हळद लागलेल्या नवरदेवाचा मृत्यू झाला आणि त्याची लग्नाची इच्छा अपूर्ण राहिली. त्यामुळे डोक्यावर देवाचा मुकुट आणि बाशिंग बांधून, अंगाला हळद लावून हा नवरदेव आपल्या होणाऱ्या पत्नीच्या शोधात फिरत असतो.”
हे ही वाचा : शहापूरची वेताळेश्वर जत्रा
अंगाला नवरदेवाप्रमाणेच हळद
या दाजिबा बाशिंगे वीराला देवाचं वस्त्र परिधान केलं जातं. त्याच्या डोक्यावर देवाचा मुकुट चढवून बाशिंग बांधतात. डोक्यावरचं मुकुट आणि बाशिंग दोरखंडाच्या मदतीने कमरेच्या भोवती बांधलेलं असतं. दोन्ही हातांच्या मनगटांमध्ये आणि गळ्यामध्ये फुलांच्या माळा घालतात. तसेच, अंगाला नवरदेवाप्रमाणेच हळद लावण्यात आलेली असते. मिरवणुकीला सुरुवात झाल्यापासून हा वीर नृत्य करीत असतो.
भागवत यांच्याकडील बाशिंगे वीर
बेलगावकर घराण्यातील विनोद बेलगावकर यांच्याकडे या पूजेचा मान आहे. दुसरा दाजिबा वीर प्रवीण भागवत यांच्या घरातून निघतो. साधारणतः पाच ते सहा पिढ्यांची परंपरा असलेल्या या दाजीबा वीराच्या मिरवणुकीची सुरुवात पुंजाजी भागवत, दत्तात्रय गोपाळ भागवत यांनी केली होती. जवळपास गेल्या दोन दशकांपासून या मिरवणुकीत मानाच्या दाजीबा वीराचा मान प्रवीण दत्तात्रय भागवत यांच्याकडे आहे.
रात्रभर चालणारी मिरवणूक
दाजीबा वीराचे दरवर्षी मानकरी ठरलेले असतात. त्यांना पारंपारिक पोशाखात सजवलं जातं. धुलीवंदनाच्या दिवशी जुन्या नाशिक परिसरातून बाशिंगे दाजीबा विराची मिरवणूक निघते. नाशिकच्या बुधवारपेठेतून वाजत गाजत निघालेल्या या मिरवणुकीचा समारोप दुसऱ्या दिवशी पहाटे केला जातो.
संपूर्ण जुन्या नाशिक परिसरात ही मिरवणूक फिरवली जाते. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे दाजीबा वीर निघाल्यानंतर शहरातून वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक म्हसरूळ टेक, संभाजी चौक, टाकसाळ लेन, दूधबाजार, मेनरोड, रविवार कारंजामार्गे रामकुंडावर जाते. तिथे विधिवत पूजा होऊन मग पुन्हा परतीच्या मार्गाने बुधवार पेठेत येते.