ऐतिहासिक ठाणे शहर…
मुंबई महानगर क्षेत्रातील ठाणे हा जिल्हा ऐतिहासिकदृष्टीने फार महत्त्वपूर्ण ठरतो. संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक तालुका, शहर हे ऐतिहासिक वैशिष्ट्यांनी व्यापलेले आहे. आणि अशाच ऐतिहासिक ठाण्याला थोर इतिहास अभ्यासकाचा परिस्पर्श लाभणे म्हणजे बात काही औरच म्हणावी लागेल… होय, आणि असे इतिहास संशोधक व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. दाऊद दळवी. ज्यांनी ठाण्यातील अनेक पिढ्यांना इतिहासाची अभ्यासपूर्ण ओळख करून तर दिलीच, शिवाय ठाण्याचा इतिहास अक्षरशः उकरून काढून त्याचा तात्विक आणि संशोधनात्मक पध्दतीने अभ्यास करून तो समस्त जगासमोर आणला.
खोतांचे घराणे…
स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच 20 जानेवारी 1937 रोजी डॉ. दळवी यांचा जन्म झाला, तो ही ठाण्यातच. दळवी यांचं घराणं मूळचे रत्नागिरीमधील परंपरागत खोतांचे. अगदी आदीलशाही, जंजिऱ्याचे सिद्दी ते पेशवे अशा विविध काळात या घराण्याला खोतीच्या सनदा मिळाल्या होत्या. त्यामुळे ऐतिहासिक पार्श्वभूमी असणा-या डॉ. दाऊद दळवी यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हे पुढे इतिहास या विषयाला वाहून घेतले. अत्यंत कंटाळवाण्या वाटणा-या इतिहासाला अतिशय रंजक बनवण्याची किमया डॉ. दाऊद दळवी यांनी केली.
शैक्षणिक कारकीर्द आणि करिअर
ठाण्याच्या प्राथमिक शाळेतून पुढे बैरामजी जीजीभाय शाळेत व नंतर ठाण्यातीलच मो. ह. विद्यालयातून 1954 ला दाऊद दळवी हे मॅट्रिक उत्तीर्ण झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी अगोदर रूईया आणि नंतर एल्फिस्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. 1957 ला बीए झाल्यानंतर 1958 ला त्यांनी इतिहास व राज्यशास्त्र या विषयात एमएची परिक्षा दिली. अभ्यासात अतिशय हुशार असल्याने शैक्षणिक क्षेत्रातच करिअर करण्याचे डॉ. दाऊद दळवी यांनी ठरवले होते. सुरुवातीला ते पार्ले महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पार्ले महाविद्यालयातून नंतर भायखळा इथल्या बुऱ्हाणी कॉलेजमध्ये ते गेले. 13 वर्षांनंतर ठाण्याला नव्यानेच सुरु झालेल्या ज्ञानसाधना महाविद्यालयात ते प्राचार्य म्हणून रुजू झाले. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम पाहणा-या डॉ. दळवी यांनी अनेक पिढ्यांना इतिहासाचे धडे दिले. ज्ञानसाधना महाविद्यालयातून 1998 मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर संपूर्ण ठाणे जिल्हा आणि एकंदरीतरच कोकण इतिहास संशोधनाच्या दिशेने त्यांनी अधिक खोलवर जाण्यास सुरुवात केली. ठाण्याच्या इतिहासासंदर्भात संशोधन करून मराठी व इंग्रजी भाषेत त्यांनी विपुल लेखन केले.
प्राचीन ठाण्याची ओळख…
विसाव्या शतकाच्या मध्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये मोठे परिवर्तन घडून आले. परंतु लोप पावणा-या ठाण्याच्या प्राचीन संस्कृतीचे अभ्यासपूर्ण संवर्धन करण्याचे डॉ. दाऊद दळवी यांनी केले. आणि त्याची नांदी ही विविध पुस्तकांच्या लेखनातून झाली. प्राकृतिक ठाण्याचा अभ्यास करताना ठाणे परिसरातील तत्कालीन बेट, बंदरे, खाडी, नदी-तलाव, जुनी गावे, डोंगर-घाट, वन्यजीव, समाजरचना, भौगोलिक स्थान, मंदिरे, शैली यांची माहिती संकलित करून ठाण्याची ही अपरिचित ओळख संपूर्ण महाराष्ट्राला डॉ. दाऊद दळवी यांनी करून दिली. प्राचीन ठाण्याशी निगडीत शिलालेख, पुरातन वारसा असणा-या मूर्ती, राहणीमान, बखरी, किल्ले यांची पुरेपूर माहिती डॉ. दळवी यांनी येणा-या पिढीसाठी संकलित करून ठेवली.
पहिलं पारितोषिक टेंभी नाक्यावर…
धर्मावरून डॉ. दाऊद दळवी यांना बराच विरोध झाला. परंतु न डगमगता त्यांनी सामाजिक भान जपत अनेक गोष्टींचा सामना केला. परांजपे नावाच्या शिक्षकांनी त्यांना संस्कृत शिकवून त्यांच्याकडून संस्कृत विषयाची पक्की तयारी करून घेतली. डॉ. दाऊद दळवी यांनी ‘माझे अंतरंग’ या आत्मकथनात लिहीले आहे की, “मी परीक्षांना बसलो. उत्तीर्ण झालो. माझे नाव ‘सन्मित्र‘त छापून आले. टेंभी नाक्यावर आचार्यवाडा होता. तिथल्या आचार्य आजींनी ‘दाऊद दळवी‘ हे नाव वाचले. त्यांचे कुतूहल जागृत झाले. त्यांनी माझ्या घरी माणूस पाठवून मला बोलावून घेतले व माझे कौतुक केले. मला श्लोक व करिका म्हणण्यास सांगितल्या. न अडखळता मी त्या म्हणून दाखवल्या. आजी अतिशय प्रभावित झाल्या व त्यांनी आपल्या बटव्यातून पाच रुपयांची कोरी नोट काढली व माझ्या हातात दिली. मला खूप आनंद झाला. माझ्या आयुष्यातले हे पहिले पारितोषिक होते”.
कोकण इतिहास परिषद…
महाराष्ट्राच्या उर्वरीत भागात ऐतिहासिक बाबींचा अभ्यास करण्यासाठी अनेक संस्था आहेत. मात्र आपल्या ठाण्याचा, कोकण प्रांताचा अभ्यास करण्यासाठी अशी एकही संस्था नाही. हा विचार डॉ. दाऊद दळवी यांना स्वस्थ बसून देत नव्हता. याच दृष्टीकोनातून इ. स. 2010 साली कोकण इतिहास परिषदेची स्थापना झाली. रवींद्र लाड आणि सदाशिव टेटविलकर यांच्या नेतृत्वाने कोकणातल्या विविध ठिकाणी भेट देऊन इतिहास परिषदेचा विस्तार केला. या संस्थेचे संस्थापक अध्यक्षपद डॉ. दाऊद दळवी सरांनी भूषवले. ठाणे शहराच्या प्राचीन दुर्लक्षित इतिहासाला नवसंजीवनी देण्याचे काम डॉ. दाऊद दळवी यांनी केले. लेणी महाराष्ट्राची, ठाणे 2020, असे घडले ठाणे आदी पुस्तकांचे दळवी यांनी लेखन केले.
ठाण्याच्या इतिहासाचे जतनकार…
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ठाणे जिल्ह्याचे अध्यक्षपद, समर्थ भारत व्यासपीठ ठाणे अध्यक्ष, ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचे विश्वस्त अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. डॉ. दाऊद दळवी यांचे उभरत्या ठाण्याच्या सामाजिक चळवळीत मोलाचे योगदान आहे. डॉ. दाऊद दळवी सरांच्या कार्याची दखल घेऊन ठाणे महानगरपालिकेतर्फे त्यांना ठाणे भूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठीचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रपती झाकीर हुसेन स्मारक राष्ट्रीय पुरस्कार यासारख्या विविध पातळींवरील पुरस्कार त्यांना मिळाले. 31 ऑगस्ट 2016 रोजी त्यांचे निधन झाले. येणा-या अनेक पिढ्यांसाठी प्राचीन ठाण्याचा इतिहास संशोधनात्मक पध्दतीने शब्दबध्द करणा-या डॉ. दाऊद दळवी यांचे श्रेष्ठत्व प्रत्येक इतिहासप्रेमीसाठी आदर्शवत ठरेल यात मुळीच शंका नाही.