शिलाहारांची राजधानी म्हणून मिरवणारं ठाणे शहर त्या काळातलं उत्तम बंदर तर होतंच, पण तीनही बाजूने सागराचा (खाडीचा) वेढा आणि एका बाजूला डोंगर अशा भौगोलिक रचनेमुळे ठाणे शहराची अवस्था एखाद्या बेटासारखीच होती. ठाणे शहरातून कल्याण-पुणे-नाशिक- पनवेल कुठेही जायचं तर आधी खाडी ओलांडावी लागायची. अगदी कळव्यातून ठाण्यात यायलाही होडी किंवा ‘तर’ हाच पर्याय होता. याचं जुनं चित्रही पाहायला मिळतं. अशा परिस्थितीत ठाणं इतर शहरांशी खऱ्या अर्थानं जोडलं जायला 1853 साल उजाडावं लागलं. हे वर्ष खरंतर फक्त ठाण्याच्याच नाही तर जगाच्या इतिहासातील एक महत्वाचं वर्ष ठरलं.
आशियातील पहिली प्रवासी रेल्वे वाहतूक
महाराष्ट्र आणि उर्वरीत भारतावर ब्रिटिशांचा अंमल सुरू होऊन पस्तीस वर्ष उलटली होती. ब्रिटिशांची राजवट भारतात आपली पाळंमूळं घट्ट करत होती. साहजिकच आपल्या व्यापारी आणि लष्करी वाहतुकीसाठी भारतासारख्या खंडप्राय देशात तशीच सर्वव्यापी आणि जलद वाहतुक यंत्रणा उभारायची योजना ब्रिटिश सरकार आखत होतं. त्यातही मुंबईसारख्या बंदराला भारताच्या इतर भागांशी जोडणं अधिक निकडीचं होतं. त्यासाठीच भारतात रेल्वे मार्गाचं जाळं उभारण्याची योजना आखण्यात आली. तसं तर 1832 मध्ये मद्रासमध्ये आणि 1851 मध्ये रुरकी येथे छोटा लोहमार्ग सुरू करुन, त्यावरुन बांधकामासाठी लागणाऱ्या दगडांची वाहतूक सुरू झाली होती. पण आशियातील पहिली प्रवासी रेल्वे वाहतून सुरू झाली ती 16 एप्रिल 1853 या दिवशी. याच दिवशी बोरीबंदर (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ) ते ताना ( ठाणे) अशी रेल्वे धावली आणि ठाणे जगाच्या नकाशावर आलं.

कलकत्त्यावर मुंबईनं मारली बाजी
ब्रिटिशांनी भारतातील प्रवासी रेल्वे वाहतुकीच्या नियोजनाला 1840 च्या दशकातच सुरूवात केली होती. तेव्हा मुंबई आणि कलकत्ता या दोन्ही शहरांसाठी या प्लॅनिंगला सुरवात झाली. पण त्यात बाजी मारली मुंबईने. इंग्लंडमधल्या लीडस या शहरात तयार झालेलं भव्य वाफेचं इंजिन मुंबई ते ठाणे रेल्वे प्रवासासाठी वापरण्यात आलं. मुंबईचे तेव्हाचे गव्हर्नर लॉर्ड फॉकलंड यांच्यावरुन त्या इंजिनाला ‘लॉर्ड फॉकलंड ’ हेच नाव देण्यात आलं. फक्त भारतातल्याच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील पहिल्या प्रवासी रेल्वे मार्गासाठी बोरीबंदर ते ताना असा मार्ग ठरवण्यात आला. म्हणजेच सध्याचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे हा सेंट्रल लोकल लाइनवरचा मार्ग.
हेही वाचा – ठाणे – एक समृध्द बंदर !
सर जमशेदजी जीजीभॉय आणि जगन्नाथ शंकरशेठ यांचे योगदान
हा रेल्वे मार्ग उभारण्यासाठी जी कंपनी स्थापन करण्यात आली तीचं नाव होतं ‘ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे ’. या पहिल्या रेल्वेमार्गाला आणि एकूणच भारतातील रेल्वे प्रकल्पाला पाठबळ देणाऱ्यांमध्ये सर जमशेदजी जीजीभॉय आणि जगन्नाथ शंकरशेठ यांचे योगदान सर्वात महत्वाचे होते. हा रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी सुमारे दहा हजार कामगारांनी मेहनत केली आणि रेल्वे मार्ग उभारणीचा खर्च तेव्हाचे 11 लाख 27 हजार 042 रुपये इतका आला होता. मुंबई ते ठाणे या रेल्वे प्रवासाची तिकिटे तेव्हा प्रथम वर्ग म्हणजे फर्स्ट क्लाससाठी 2 रुपये 10 आणे, द्वितिय वर्ग म्हणजे सेकंड क्लाससाठी 1 रुपया 1 आणा आणि तृतिय वर्ग म्हणजे थर्ड क्लाससाठी 5 आणे 3 पैसे असे होते.
सुरवातीला भायखळा आणि कुर्ला ही दोनचं स्थानकं
बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर धावलेल्या पहिल्या प्रवासी रेल्वेला 14 डबे होते आणि त्यातून एकूण चारशे भाग्यवान प्रवाशांनी प्रवास केला. 16 एप्रिल 1853 हाच तो दिवस ज्या दिवशी ठाण्याचे नाव रेल्वेच्या इतिहासात जागतिक पातळीवर नोंदवले गेले. या दिवशी बोरीबंदर इथून दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी आशियातील पहिली प्रवासी रेल्वे गाडी सुटली. मुंबईचे गव्हर्नर, जगन्नाथ शंकरशेठ आणि मुंबईतील अन्य प्रतिष्ठीत नागरिकांचा समावेश होता. या पहिल्या रेल्वेला खास 21 तोफांची सलामी देण्यात आली आणि तिचा प्रवास सुरू झाला. सिंध, सुलतान आणि साहिब अशी तीन इंजिने या गाडीला जोडलेली होती. तेव्हा बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर फक्त कुर्ला आणि भायखळा ही दोनच स्थानके होती. आपल्या पहिल्या प्रवासात ही रेल्वे सायन इथे पाण्याच्या टाक्या भरण्यासाठी थांबली. 32 किलोमीटरचा प्रवास या रेल्वेनं 1 तास 15 मिनिटांत पूर्ण केला. 4 वाजून 45 मिनिटांनी गाडी ठाणे रेल्वे स्थानकात पोहोचली तेव्हा तिचे स्वागत करण्यासाठी मोठा जनसमुदाय जमला होता. या गाडीने प्रवास केलेल्या लोकांसाठी खास शाही दावत आयोजित करण्यात आली होती.

ठाणे नगरपरिषदेच्याही आधी ठाणे रेल्वे स्थानक
पहिली रेल्वे ठाण्यापर्यंत आली तेव्हाचे ठाणे रेल्वे स्थानक अर्थातच लहानसे होते. आज आपल्या ठाणे स्थानकावर दहा प्लॅटफॉर्मस आहेत, तेव्हा फक्त चार होते. रेल्वे मार्गामुळे ठाण्यातील चेंदणी कोळीवाड्याचे दोन भाग झाले. ठाणे शहरही पूर्व आणि पश्चिम असे विभागले गेले. मात्र रेल्वेमुळेच ठाणे महाराष्ट्रातील अन्य शहरांशी जोडलं गेलं. बोरीबंदर ते ठाणे रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 1854 मध्ये ती कल्याणपर्यंत विस्तारण्यात आली. ठाणे शहराला रेल्वे स्थानक मिळालं तेव्हा, ठाण्याची नगर परिषदही स्थापन झालेली नव्हती. ठाण्यातला पहिला छापखाना आणि वर्तमानपत्र सुरू व्हायचे होते. पुढे ठाणे शहर तर विस्तारत गेलेच पण रेल्वेवरील प्रवाशांची संख्या वाढू लागली. मग ठाणे रेल्वे स्थानक मोठे करण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 लगतचे गावदेवी मंदिर तिथून हलवण्यात आले आणि गोखले रस्त्यावर उभे करण्यात आले. काळ पुढे सरकत गेला,मुंबई-ठाणे वाढत गेलं. मुंबईची लोकल सेवा 1925 मध्ये कोळशाच्या इंजिना ऐवजी इलेक्ट्रिक इंजिनावर धावू लागली.

1853 पासूनची दुपारी 3.30 ची मुंबई-ठाणे लोकल अजूनही सुरू
बदलत्या काळाबरोबर रेल्वे सेवा आधुनिक झाली, नवीन रेल्वे मार्ग सुरू झाले. कोकण रेल्वे आली, ट्रान्स हार्बर लोकल सुरू झाली, मात्र या सगळ्या बदलात एक गोष्ट कायम राहिली. पहिली रेल्वेगाडी बोरीबंदरवरुन ठाण्यासाठी दुपारी 3.30 वाजता निघाली होती, त्या गाडीचा मान म्हणून आजही ती ठाणा लोकल सुरू आहे. रेल्वेच्या वेळापत्रकात कितीही बदल झाले तरी या गाडीचे स्थान अढळ आहे. भारतातील प्रवासी रेल्वेचा आरंभ ठाण्यातून झाला होता, ही भावना सगळ्या ठाणेकरांना नक्कीच सुखावते आणि ठाण्याच्या अभिमानात भर पडते.
हेही वाचा – ठाण्याचं ग्रामदैवत श्री कौपिनेश्वर मंदिर
आज काळाच्या ओघात ठाणे रेल्वे स्थानक आमूलाग्र बदललं आहे. मात्र या स्थानकाच्या आवारात पहिल्या रेल्वेला जोडलेलं वाफेचं इंजिन ठेवण्यात आलं आहे. ते जणू सांगत असतं की, ठाणे रेल्वे स्थानक हा ठाण्याचा वारसा आहे.