29 सप्टेंबर 2024, रोजी डोंबिवली येथील सी.के.पी. सभागृहात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सिद्धार्थ पारधे यांच्या आत्मकथेच्या स्वरूपातील पुस्तक ‘मु.पो. 10 फुलराणी’चे प्रकाशन करण्यात आलं.पाथरवट समाजाचा मुलगा कसा लेखक झाला, याची ही कहाणी आहे.
दुष्काळाची सावली आणि मुंबईचे स्वप्न
1962 साली महाराष्ट्रात दुष्काळ पडला, जालना जिल्ह्यातून अनेक खेडेगावातून लोक पोटापाण्यासाठी मुंबईला आले. त्यात सिद्धार्थचे आई वडील होते. मुंबईत आल्यावर त्यांना बांद्राच्या ‘साहित्य सहवासमध्ये बिल्डिंग बांधण्याच्या कामावर मजुरीचे काम मिळालं. याच ‘साहित्य सहवास’मध्ये सिद्धार्थने शालेय शिक्षण घेतलं.
‘साहित्य सहवास’ हे फक्त एक राहण्याचं ठिकाण नव्हते, तर मराठी साहित्याचे एक उज्ज्वल केंद्र होते. कविवर्य विंदा करंदीकर, म.वि. राजाध्यक्ष, विजयाबाई, रमेश तेंडुलकर, अरुण साधू असे अनेक प्रतिभावंत साहित्यिक येथे राहत होते. सिद्धार्थची आई कोंडाबाई या धुणीभांड्यांचे काम करत होत्या, त्यामुळे या साहित्यिकांशी त्यांचा जिव्हाळा वाढला. या साहित्यिकांच्या प्रेरणेने आणि मदतीने सिद्धार्थने शिक्षण घेतलं.
शालेय जीवनात अनेकदा सिद्धार्थला अपयश आलं तरी विजयाबाईंनी धीर देऊन त्याला शिक्षण चालू ठेवण्यास प्रोत्साहन दिले. महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. या साहित्यिकांच्या मदतीने सिद्धार्थने पदवी प्राप्त केली. त्यानंतर जीवनविमा (LIC) कंपनीत नोकरी मिळाली. त्याने साहित्यिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यायला सुरू केलं.
सिद्धार्थच्या गोड लाघवी स्वभावामुळे रमेश तेंडुलकरांनी त्याला (सचिनचे वडील) मदत केली. इतकेच नव्हे तर त्याचा भाऊ रमेश पारधे हा सचिन तेंडुलकरचा वैयक्तिक स्विय सचिव झाला व तो अजून पर्यंत नोकरी न करता त्यांच्या बरोबर असतो. अशा प्रकारे स्वतःचा व कुटुंबाचा चांगल्या मार्गाने विकास केला. त्याचवेळी त्याच्या आईकडे अनुभवातून उपजत शहाणपण होते तिने सिद्धार्थला अनेक बाबतीत सल्ला देऊन जीवन कसे जगावं हे शिकवले.
सिद्धार्थ पारधे यांचे ‘मु.पो. 10 फुलराणी’ हे पुस्तक केवळ एक आत्मकथा नाही. तर संघर्ष, प्रेरणा आणि यश यांची एक प्रेरणादायी कहाणी आहे. या पुस्तकातून आपल्याला जीवन संघर्षातूनही आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकतो हे शिकायला मिळते.