यंदाच्या विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या स्थापनेचा 100 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. यानिमित्ताने परंपरेनुसार नागपूर येथील संघ कार्यालयात संचलन व मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी जगभरातील सद्य परिस्थिती, आपल्या देशासमोरील आव्हानं, हिंदू समाजाची सुरक्षा आणि तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी इस्त्रोचे माजी चेअरमन डॉ. के. राधाकृष्णन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आपल्या भाषणात सरसंघचालक भागवत म्हणाले की, जगभरात आज विध्वंसक परिस्थिती निर्माण झाली आहे. विध्वंसक परिस्थितीत अनेकदा दुर्बलांवर हल्ले केले जातात. त्यामुळे जगभरातील हिंदूंनी संघटित राहण्याची गरज आहे. तुम्ही जगात जिथे कुठे असाल तिथे सुरक्षित आणि संघटित राहा. कधी हिंसा, भांडणं करू नका. याचा अर्थ तुम्ही दुर्बल आहात असा नाही. अन्यायाविरूद्ध जरूर आवाज उठवा, पण एकत्रित राहा.
भारताचा ‘स्व’ हाच आपला धर्म
धर्म हा भारताचा ‘स्व’ आहे. भारतामध्ये अनेक रिलीजन आहेत पण भारताचा धर्म हा एकच आहे तो म्हणजे ‘स्व’. भारतमातेला जपणे, तिचे रक्षण करणे हा आपला धर्म आहे. याच धर्मासाठी आत्तापर्यंत इतिहासात अनेक संघर्ष झाले आहेत. अनेकांनी बलिदान दिलं आहे. हा सनातन, सर्वांचा आणि सगळ्यांसाठी असलेला धर्म आहे. याची जाणिव ठेवणं गरजेचं आहे.
आरजीकर हॉस्पीटलमधली घटना लज्जास्पद
ठिकठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. कोलकत्तातील आरजीकर हॉस्पीटलमधली घटना ही अतिशय लज्जास्पद घटना आहे. आपल्या संस्कृतीला कलंकित लावणारी अशी ही घटना आहे. आज कोलकत्त्यातील संपूर्ण समाज डॉक्टरांच्या पाठिशी आहे. मात्र, या अशा घटना घडू नयेत म्हणून सतर्क राहणं, सुरक्षा पुरवणं गरजेचं आहे. द्रौपदीच्या कपड्याला स्पर्श झाला, त्यामुळे इतिहासात महाभारत घडलं. रावणाने सीतेचं हरण केलं त्यामुळं रामायण घडलं. पण आज काय घडतंय? आज अशा घटनांतील आरोपींना संरक्षण दिलं जात आहे. गुन्हेगार आणि राजकारणाचे हितसंबंध जुळले जात आहेत. त्यामुळे आपली संस्कृती भ्रष्ट होत आहे.
बांगलादेश-पाकिस्तानची मैत्री
आज बांगलादेशमध्ये चर्चा आहे की, “भारतापासून आपल्याला धोका आहे. आपला खरा मित्र हा पाकिस्तानच आहे. आज पाकिस्तानकडे अण्वस्त्र ही आहेत. तेच आपली खरी रक्षा करू शकतात.” ही अशी चर्चा आज बांगलादेशमध्ये सुरू असण्याचं कारण काय? यावर विचार केला पाहिजे. ज्या बांग्लादेशच्या निर्मितीमध्ये भारताने निर्णायक भूमिका बजावली, त्या देशाविरोधातच अशी चर्चा केली जात आहे. आत्तापर्यंत आपण बांगलादेशला वेगवेगळ्या पातळीवर मदत केली आहे. कोणतंच वैरभाव आजपर्यंत ठेवलं नाही. तोच बांग्लादेश आता आपल्याविरोधात जाऊ पाहतोय. भारताचा विकास होणं हे जगातील सर्वच देशांना मान्य नाही. बांग्लादेशमधील अशांततेचा आपल्यावर ही नकारात्मक परिणाम व्हावा, अशी आपल्या शत्रूराष्ट्रांची इच्छा आहे.