महाराष्ट्रातील खासगी प्रवासी वाहतूक सेवा उबर आणि रॅपिडो ह्या एकाच नियमांनुसार काम करणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत महत्वाची घोषणा केली आहे. यामुळे प्रवासी सुरक्षा अधिक मजबूत होईल. वाहतूक व परवाना संबंधित समस्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवता येईल.
नवीन नियामक चौकटीची निर्मिती
14 जानेवारीला मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मंत्री सरनाईक यांनी उबर आणि रॅपिडोसह सर्व खासगी प्रवासी वाहतूक सेवांना एकाच नियामक चौकटीत आणण्याचा निर्णय घेतला. यामुळे सेवा अधिक सुसंगत आणि सुरक्षित होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, या उपक्रमाचा उद्देश प्रवासी सुरक्षा सुधारणा, वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा आणि परवाना संबंधित समस्यांवर उपाय शोधणे आहे.
बैठकीला परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, MSRTC चे उपाध्यक्ष डॉ. माधव कुसेकर आणि विविध वाहतूक कंपन्यांचे प्रतिनिधी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.
महिला चालकांसाठी प्रोत्साहन
सरनाईक यांनी महिलांसाठी विशेषत: बाईक सेवांमध्ये चालक म्हणून काम करण्याचे प्रोत्साहन देण्यावरही जोर दिला. यामुळे महिला सक्षमीकरणासोबतच रोजगाराच्या नवीन संधी देखील मिळू शकतील. तसेच, सर्व वाहतूक सेवा पुरवठादारांना प्रवासी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ठोस सुरक्षा उपाय लागू करणे अनिवार्य असेल.
MSRTC कर्मचार्यांसाठी आरोग्य सेवा सुविधा
राज्यातील अनेक बसस्थानके ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर विकसित करण्यात येत आहेत. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात 25 तर मुंबईतील बोरिवली येथील जागेवर एसटी कर्मचाऱ्यांसाठी 100 खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे यामुळे राज्यातील परिवहन कर्मचार्यांसाठी उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध होईल.
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, हे सर्व उपक्रम राज्य सरकारच्या परिवहन सेवांच्या सुधारणा आणि कर्मचार्यांच्या कल्याणासाठी करण्यात आले आहेत.