केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर केल्या. त्यानंतर आज महायुती सरकारने पत्रकार परिषद घेत आपल्या अडीच वर्षातील कामकाजाचा रिपोर्टकार्ड राज्यासमोर ठेवला आहे.
अजित पवार यांनी ‘रिपोर्टकार्ड’ सादर करताना सांगितलं की, “आमचे विरोधक लाडकी बहीण योजनेमुळे गडबडले आहेत. महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होत आहेत, पण ते विरोधकांच्या पचनी पडत नाहीत. त्यामुळे ही योजना निवडणुकीपर्यंत असेल असं विरोधकांकडून सतत सांगितलं जात आहे. पण ही योजना तात्पुरता नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी जनतेला दिली. निवडणुका येतील जातील, पण तुमचे पैसे ठरले आहेत आणि ते कोणीही काढून घेणार नाही, असं ते यावेळी म्हणाले.
आमच्यासाठी निवडणुकीचा हा शंखनाद आहे, मात्र काही जणांसाठी हा ऐलान आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. महाविकास आघाडी सत्तेत असताना कशाप्रकारे अनेक विकासप्रकल्पांना टाळं लावलं गेलं हे स्पष्ट केलं. तसेच महायुती सरकारच्या काळात कृषीक्षेत्र व शेतकरी बांधवांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजना, पायाभूत सोई-सुविधा तसेच उर्जाक्षेत्रातील धोरणात्मक निर्णयांची माहिती दिली.
महविकास आघाडीच्या काळात काय कामं झाली आणि आमच्या काळात काय कामं झाली याचा रिपोर्टकार्ड सादर करण्यासाठी हिंमत लागते. पण ती हिंमत असण्यासाठी कामे देखील करावी लागतात असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला लगावला. यावेळी त्यांनी सरकारने सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली.